इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

शेतकऱ्यांच्या आर्थिक संपन्नतेसाठी गटशेती प्रकल्प उपयुक्त - कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा कृषि तंत्रज्ञान महोत्सव आणि कृषि प्रदर्शनास सुरुवात




कोल्हापूर, दि. 12 : दिवसेंदिवस कमी होत चाललेले शेतीचे क्षेत्र विचारात घेता, यापुढील काळात गटशेती प्रकल्पाद्वारे शेती करुन शेतकऱ्यांनी आर्थिक संपन्नता साधावी, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी केले.
 शासनाचा कृषी विभाग आणि कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि महाविद्यालयात आयोजित केलेल्या कृषि तंत्रज्ञान महोत्सवाचे आणि कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होत. समारंभास जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. किरण कोकाटे, संचालक (संशोधन) डॉ. शरद गडाख, कृषि सहसंचालक महावीर जंगटे आदि मान्यवर उपस्थित होते.
गटशेतीसाठी किमान 20 शेतकऱ्यांनी एकत्र येवून 100 एकरावर गटशेतीच्या प्रकल्प हाती घेतल्यास शासनाकडून अनुदानही उपलब्ध होत असल्याने हा प्रयोग शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चितपणे आर्थिक स्थैर्य निर्माण करु शकतो असा विश्वास व्यक्त करुन डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले, कृषी विद्यापीठाने शेतीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिवर्तनासाठी कृषि संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित केले असून या तंत्रज्ञानाचा आणि नव नव्या बियाणांच्या वानाचा शेतकऱ्यांनी विनियोग करुन शेती क्षेत्रात प्रगती साधावी.
 राज्यातील शेतकऱ्यापर्यंत कृषी विद्यापीठाचे संशोधन आणि तंत्रज्ञान पोहचवून शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी कृषी क्षेत्रातील सर्वानीच प्रयत्न करावेत, असे आवाहन करुन कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले, महाराष्ट्रात कृषी क्षेत्रावर सर्वाधिक भर दिला असून कृषी तंत्रज्ञानाद्वारे लाभदायी शेती करण्याबरोबरच एकात्मिक पीक पध्दतीचाही शेतकऱ्यांनी अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच शेतीबरोबर पशुपालन, कुक्कुटपालन, फलोत्पादन, फळप्रक्रिया असे शेतीपुरक व्यवसाय करुन आर्थिक संपन्नता साधावी.  तसेच कृषी व्यवस्थापनाचाही अवलंब करावा. यापुढील काळात आवश्यकतेनुसार पीक पध्दतीत सुधारणा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच कृषी पदवीधारकांनी यापुढे गावात राहून गावाच्या विकासाची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. राळेगणसिध्दी व हिवरे बाजार प्रमाणेच राज्यातील अन्य गावे विकसित करण्यास कृषी पदवीधारकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले
राहुरी कृषी विद्यापीठाने कृषी संशोधनात लौकिक निर्माण केल्याचे सांगून कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले, कृषी विद्यापीठाने 257 विविध पिकांचे वान विकसित केले असून 3000 हून अधिक कृषी तंत्रज्ञान विकसित केले आहे. कृषी विद्यापीठाचे संशोधन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे, यासाठी कृषी तंत्रज्ञान महोत्सव आयोजित  केल्याचे ते म्हणाले. कृषी विद्यापीठांतर्गत ‍विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियान राबविण्याबरोबरच किमान 5 झाडे लावून कृषी परिसर वृक्षाच्छादीत करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी गटशेती उपयुक्त असून कृषि विद्यपीठाने विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याकामी कृषी विभागाने आणि  कृषी पदवीधारकांनी सक्रिय योगदान देणे गरजेचे आहे. ऊसावरील हुमनी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून 35 लाखाचा निधी देवून कोल्हापूर येथे हुमनी किड नियंत्रण प्रयोग शाळा विकसित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.  कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध वानांचा शेतकऱ्यांनी लाभ घेवून अधिकाधिक शेती उत्पन्न काढावे तसेच बाजार पेठांचा कल विचारात घेवून पीक पध्दतीत सुधारणा करणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
 कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख म्हणाले, कृषी विद्यापीठाने विकसित केलेले संशोधन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन केले असून या महोत्वाचा आणि कृषी प्रदर्शनाचा कोल्हापूर तसेच नजिकच्या जिल्हयातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, या महोत्सवानिमित्त्‍ या परिसरात विविध पिकांच्या 45 वानांच्या प्रात्याशिकांचा अनुभव शेतकऱ्यांना घेता येईल. यामध्ये बियाणांचे वान, विविध खते, औजारे आदींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी विद्यापीठाचे (विस्तार शिक्षण) संचालक डॉ. किरण कोकाटे म्हणाले, शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी विद्यापीठाने‍  विकसित केलेले संशोधन, तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. हवामानातील बदल, तमपान वाढ, अनियमित पाऊस या साऱ्यांवर मात करण्यासाठी शेतकरी प्रथम हा उपक्रम हाती घेतला असून शाश्वत शेतीच्या दृष्टीने हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 या प्रसंगी कृषी सहसंचालक महावीर जंगटे यांनी मनोगत व्यक्त केले. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी.जी.खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रा. तरडे यांनी आभार मानले. या समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषी अधिकारी सुरेश मगदुम, शेतीनिष्ठ शेतकरी संजीव माने यांच्यासह अनेक मान्यवर, कृषी संशोधक, कृषी तंत्रज्ञ, कृषी अधिकारी, शेतकरी, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हुमनी किड नियंत्रण प्रयोग शाळेचे शुभारंभ
ऊसावरील हुमनी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून 35 लाखाचा निधी देवून विकसित केलेल्या हुमनी किड नियंत्रण प्रयोग शाळेचा शुभारंभ कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांच्याहस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होत. समारंभास जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. किरण कोकाटे, संचालक (संशोधन) डॉ. शरद गडाख, कृषि सहसंचालक महावीर जंगटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी आदिजण उपस्थित होते.
कृषी प्रदर्शनास मान्यवरांची भेट
 यावेळी विविध पीकांच्या वानाचे शेती प्रात्यक्षिकांनाही मान्यवरानी भेट देवून या प्लॉटची पाहणी केली. कृषी महाविद्यालय परिसरात आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचे उदघाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये 15 हून अधिक ऊस जातीचे वान, विविध प्रकारच्या बियाणाचे वान, ट्रॅक्टर, टिलर, रोट वेटर, यांत्रिक औजारे, पिकांचे मुल्य वर्धन तंत्रज्ञान, औषधे, किटक नाशके, ब्रुशी नाशके, जैविक खते विविध प्रकारच्या ज्युस तसेच कृषी विद्यापीठाने विकसित  केलेल्या तंत्रज्ञानावर आधारीत प्रात्यक्षिके, कृषी औजारे मांडण्यात आली होती. या प्रदर्शनास शेतकरी आणि नागरीकानी भेट देवून माहिती घेतली.

0 0 0 0 0 0 0

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

पर्यटन विकासासाठी नियोजन समितीतून भरीव निधी श्री अंबाबाई विकासाचा 68 कोटीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्यात -जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार पर्यटन पर्व : पर्यटन जागृती व मार्गदर्शन शिबिर संपन्न




        कोल्हापूर, दि. 9 : कोल्हापुरच्या पर्यटन विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमधुन भरीव निधी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले जात आहे.  श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील 68 कोटीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी  दिली.
            महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, कोल्हापूर हॉटल मालक संघ व कोल्हापूर डिस्ट्रीक्ट कार ऑपरेटर्स असोसिएशनच्यावतीने पर्यटन पर्व कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर पर्यटन जागृती व मार्गदर्शन शिबिराचे उदघाटन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. येथील हॉटेल पॅवेलीयनच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त भुगोल विभाग प्रमुख डॉ. शहाजीराव देशमुख, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाचे कोल्हापूर विभाग अधिकारी दिपक हर्णे, पर्यटन सल्लागार वासिम सरकवास, कोल्हापूर हॉटल मालक संघाचे सचिव सिध्दार्थ लाटकर,  कार ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब गयावळ आदिजण उपस्थित होते.
            कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या समितीतून चालना देण्यात आली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासाची अनेक कामे हाती घेतली आहेत. याबरोबरच श्री अंबाबाई मंदिरावर साडेचार कोटी रुपये खर्चुन आकर्षित विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखड्यांतर्गत 25 कोटींना मान्यता मिळाली असून  श्री अंबाबाई विकास आराखड्यातून 68 कोटीचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे. याबरोबरच पन्हाळा येथे लाईट व साऊंड शो, शाहू जन्मस्थळाचा विकास, ऐतिहासिक माणगाव परिषद विकास आराखडा अशा अनेक पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासाच्या कामांना प्राधान्य दिल्याचेही त्यांनी सांगितले.
            पर्यटन क्षेत्रात कोल्हापुरचे नाव देशाबरोबरच जगाच्या नकाशावर यावे, देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे कोल्हापूर आकर्षण ठरावे, यासाठी कोल्हापूरचा आगामी 100 वर्षाच्या पर्यटन विकासाचे नियोजन करुन काम करणे आवश्यक असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, कोल्हापुरच्या पर्यटन विकासासाठी पायाभुत सुविधा निर्माण होणे गरजेचे असून यासाठी कोल्हापुरच्या जनतेने सक्रिय सहकार्य आणि मदत करण्यात पुढाकार घेणे आवश्यक आहे. यामध्ये कोल्हापूर-नागपूर चौपदरीकरण रस्ता, सातारा-कागल सहापदरी रस्ता, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे, कोल्हापुरची विमान सेवा असे अनेक प्रकल्प मार्गी लावणे गरजेचे असून यासाठी स्थानिकांनी पर्यटन विकासासाठी प्रसंगी त्याग करावा लागला तरी तो करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
            कोल्हापुरला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला असून पर्यटन क्षेत्रात कोल्हापुरची वेगळी ओळख निर्माण होत आहे. कोल्हापुरला पर्यटनाच्या दृष्टीने मोठी संधी असून या क्षेत्रात रोजगाराच्या संधी असल्याने या क्षेत्रात होणारी गुंतवणूक ही पर्यटन विकासाला चालना देणारीच ठरणार असल्याचे मत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले देशातील तसेच परदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कार ऑपरेटर्ससह पर्यटन क्षेत्रातील सर्वांनीच कोल्हापूरात येणाऱ्या पर्यटकाच्या प्रती आस्था पूर्वक वागणूक पर्यटकांचे आपले पाहुणे समजून आदरातीर्थ करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
            शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त भुगोल विभाग प्रमुख डॉ. शहाजीराव देशमुख म्हणाले, कोल्हापूर पर्यटन समृध्द जिल्हा असून येथील पर्यटन स्थळांची इतंभुत माहिती बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना योग्य पध्दतीने मिळणे गरजेचे आहे. पर्यटकांसाठी निवास व दळणवळणाची सुविधा महत्वाची असून याकामी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. पर्यटन विकासासाठी जोतिबा-पन्हाळा स्काय लिफ्टने जोडण्या बरोबरच विशालगड येथे आकाश पाळणा, गगनगड येथे पुष्प पठार आणि मसाई पठार येथे इको गार्डन अशा अनेकविध बाबी हाती घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
             पर्यटन सल्लागार वासिम सरकवास म्हणाले, कोल्हापुरला भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांना पाहुणे म्हणून वागणूक देण्यात कार ऑपरेटर्सनी पुढाकार घ्यावा. कोल्हापुरच्या पर्यटन स्थळाची माहिती आणि महती येथील ऐतिहासिक, सांस्कृतिक, खाद्य संस्कृती अशा सर्वच बाबींची माहिती आदरपूर्वक द्यावी. कार ऑपरेटर्स हे कोल्हापुरच्या पर्यटनाचे ब्रँड अँबॅसिटर असून पर्यटकांना आदरातीथ्याची अनुभूती मिळेल यादृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत आवाहनही त्यानी केले.
            प्रारंभी   कार ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब गयावळ यांनी स्वागत केले, कोल्हापूर हॉटल मालक संघाचे सचिव सिध्दार्थ लाटकर यांनी प्रस्ताविक केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाचे कोल्हापूर विभाग अधिकारी दिपक हर्णे यांनी पर्यटन पर्व उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.  याप्रसंगी अमरजा निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समारंभास हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष उमेश राऊत, पथीक प्रतिष्ठानच्या अरुणा देशपांडे, पल्लवी कोरगावकर, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे,  अरुण चोपदार यांच्यासह अनेक मान्यवर आणि हॉटेल मालक संघ व कार ऑपरेटस असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन समीर देशपांडे यांनी केले.

0 0 0 0 0 0