कोल्हापूर, दि. ३ : कोल्हापूर
जिल्ह्यातील ज्या गावात बैलगाडी शर्यत होईल त्या गावातील पोलीस पाटलास जबाबदार
धरुन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. असे प्रभारी जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज
यांनी आज प्राणी छळ प्रतिबंधक समितीच्या सभेत सांगितले.
श्री. धुळाज
यांच्या अध्यक्षतेखाली प्राणी छळ प्रतिबंधक समितीची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी
वरील आदेश दिले. त्यांनी सांगितले की, बैलगाडी शर्यतींचे संयोजन करण्यास मनाई आहे. तरीही कोठे
बैलगाडी शर्यतीचे संयोजन झाल्यास त्याबाबतची माहिती संबंधित गावच्या पोलीस
पाटलांनी पोलीस विभागाला कळवायला हवी. पोलीस पाटलांनी माहिती न कळविल्यास
त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
श्री. धुळाज यांनी
सांगितले की, भटक्या
कुत्र्यांच्या नसबंदीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने किमान पन्नास लाख रुपये खर्च
करावेत. त्याचबरोबर सर्व नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांनी भटक्या कुत्र्यांच्या
नसबंदीसाठी आर्थिक तरतूद करावी. अनेक गोपालक गायींना मोकाट सोडून देतात. अशा
गोपालकांविरुध्द १५ ऑगस्ट नंतर कारवाई करण्याची मोहिम हाती घेण्यात येईल.
बैठकीस जिल्हा
पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. बी. कोळी, पन्हाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी पांडूरंग मसलेकर, मलकापूरचे
मुख्याधिकारी पी. एच. सवारबंडे, पशु विकास अधिकारी एस. एस. शिंदे, सुरेश शिप्पूरकर, पांजरपोळचे अध्यक्ष वसंत शहा आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.