** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, May 25, 2016




उत्पादित मालाच्या ब्रँड निश्चिती मुळे
शेतकऱ्यांना किफायती दर मिळेल
                                                    -- कृषि सहसंचालक नारायण शिसोदे
कोल्हापूर, दि. 25 : शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाची ब्रँड निश्चितीमुळे त्यांच्या शेत मालाला किफायती दर मिळेल, कोल्हापूरमध्ये 14 शेतकरी कंपन्यांची स्थापना करण्यात आली असून, या कंपन्यांचे उत्पादक शेतकरीच सभासद आहेत. त्यांना कृषि पणन विभागामार्फत उत्पादनवृद्धी, दरांची स्थिरता, निर्यातवृद्धीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन विभागीय कृषि सहसंचालक नारायण शिसोदे यांनी केले.
विभागीय कृषि सहसंचालक, आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयाच्यावतीने जळगावच्या केळी संशोधन केंद्राच्या सहाय्याने हॉटेल पॅव्हेलियन येथे फळे भाजीपाला क्षेत्रातील प्राथमिक केळी उत्पादन केळी निर्यातदार जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी विभागीय कृषि सहसंचालक नारायण शिसोदे यांच्यासह कृषी संचालक गोविंद हांडे, सौ. विनिता सुधांशु मिश्रा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, रविंद्र पवार, प्रा. सुरेश परदेशी, डॉ. विष्णू गरंडे, डॉ. शशिकांत सीआयआय फेस, कृषि उपसंचालक सुरेश मगदूम, पणनचे उप महाव्यवस्थापक सुभाष घुले आदि मान्यवरांसह केळी उत्पादक शेतकरी, प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. नारायण शिसोदे मार्गदर्शन करताना म्हणाले, शेतकरी कंपन्यांच्या उत्पादित मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याबरोबरच त्यांच्या शेतीमालाला किफायती दर देण्यासाठी कृषि विभागाचे सहकार्य करण्यात येईल. ग्राहकांची भाजीपाला उत्पादनांची दैनंदिन आवश्यकता विचारात घेवून गृहनिर्माण संस्था, तसेच अन्य विविध ठिकाणी ग्राहकांची गरज पूर्ण होणे आवश्यक आहे. या गरजांची पुर्तता झाल्यास उत्पादक ते ग्राहक मार्केट मार्जीन शेतकऱ्यांना मिळेल. कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे, सांगली जिल्ह्यातील आटपाडी, सातारा जिल्ह्यातील मसूर आदि ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाची साठवणूक करण्यासाठी केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. कोल्हापूर, पुणे, मुंबईसह देशातील विविध ठिकाणी मालाची निर्यात करण्यासाठी अशी अनेक ठिकाणी केंद्र निर्माण होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाची बाजारातील आवक जास्त झाल्यामुळे दर कमी होतात अशावेळी शेतीमालावर प्रक्रीया करुन उपउत्पादने घेणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल. कोल्हापूरच्या शेतकरी कंपन्यांकडून घेण्यात आलेले किंग्ज ब्रँडचे उत्पादन ही गौरवाची बाब आहे. या उत्पादित मालांना योग्य बाजारपेठ, निर्यातवृद्धीसाठी नेटवर्क निर्माण करण्याबरोबरच अचूक योग्य मार्गदर्शन, सुसुत्रता आणून कोल्हापूर जिल्ह्यातील कार्य राज्यात पथदर्शी प्रकल्प होवू शकतो असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, कागल नगरपालिकेने शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे दर गुरुवारी रविवारी शेतकरी कंपन्या थेट बाजारात मालाची विक्री करतात त्यामुळे शेतकऱ्यांना थेट किफायतशीर दर मिळतो. अशी केंद्रे अन्यत्र मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थेैर्य मिळेल.

केळी उत्पादनात जगात भारत नं. 1
जगात केळीचा वापर खाण्यामध्ये स्टेपल फुड म्हणून केला जातो अशा या केळी पिकवणाऱ्या 130 देशात भारताचे स्थान पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक केळी उत्पादन 81.26 मिलियन टन असून भारताचे एकूण केळी उत्पादन 21.76 मिलियन टन इतके आहे. जागतिक केळी उत्पादनाच्या 27 टक्के उत्पादक भारतात होते. जगातील प्रमुख 10 देशांचे केळी उत्पादन मिलियन टनामध्ये पुढीलप्रमाणे कंसात उत्पादन भारत ( 2 कोटी 17 लाख 66 हजार 400), ब्राझील (69 लाख 72 हजार 408), चायना (73 लाख 25 हजार), फिलीपाईन्स ( 70 लाख), एक्वॉडोर ( 61 लाख 30 हजार), इंडोनेशिया ( 50 लाख ), मेक्सीको ( 22 लाख), को यारिका ( 22 लाख 40 हजार), थायलंड 20 लाख ), कोलोबीया ( 18 लाख ). इतके आहे. भारतात एकूण 565.10 हेक्टर क्षेत्रात केळीचे पिक घेतले जाते. यामध्ये महाराष्ट्रात 73.20 हेक्टर, तामीळनाडू 94.60, गुजराथ 49.20, कर्नाटक 56.40, आंध्रप्रदेश 61.10, बिहार 28, मध्यप्रदेश 15.40,आसाम 47, वेस्ट बंगाल 27.80, इतर राज्यामध्ये 56.20 हेक्टर उत्पादन घेतले जाते.
महाराष्ट्रात 80 हजार 047 हेक्टर क्षेत्रात केळी पिकाचे 55 लाख 13 हजार 369 मेट्रीक टन उत्पादन घेतले जाते. यामध्ये जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 53 हजार 007 हेक्टर, नंदुरबार 1694, नांदेड 9562, हिंगोली 3080 , पुणे 3084, परभणी 1740, बुलढाणा 1025, औरंगाबाद 1000, धुळे 505 ठाणे 550 हेक्टर क्षेत्रात केळीचे पिक घेण्यात येते.
प्रारंभी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी स्वागत प्रास्ताविक केले, यावेळी मान्यवरांच्या हस्ते केळीच्या रोपट्यास पाणी अर्पण करुन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजनामागील पार्श्वभूमि विशद केली.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.