** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, June 30, 2016



विशेष लेख 
चला हरित जिल्हा घडवूया ..

हरित महाराष्ट्राचा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी राज्य शासनाने 1 जुलैरोजी 2 कोटी झाडे लावण्याचा महत्वाकाक्षी कार्यक्रम संपूर्ण राज्यभर शासन यंत्रणा आणि लोकसहभागातून हाती घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हयात किमान 8 लाखाहून अधिक झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. कोल्हापूर जिल्हाही हरीत जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी  जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी व्यक्तीश लक्ष केंद्रीत केल्याने वृक्ष लागवडीची लोकचळवळ नव्या जोमाने उभी राहील, यात मात्र शंका नाही.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, या उक्तीनुसार मानव आणि पर्यावरणाचे अनन्यसाधारण महत्व विाचारात घेऊन वक्षारोपणावर अधिक लक्ष केंद्रीत करुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी वक्षारोपणाव्दारे वनांची समध्दी आणि जलसाक्षरतेव्दारे हरित महाराष्ट घडविण्याचा निर्धार केला असून राज्यातील जनतेकडूनही वक्षारोपणाच्या या कार्यक्रमात बहुमोल असा लोकसहभाग मिळू लागला आहे. आज याना त्या कारणांनी पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, हवामानात होत असलेला बदल यासाया गोष्टी पाहता  झाडे लावून त्यांची जोपासना करणे काळाची गरज बनली आहे.
सघ्या राज्याचे वनक्षेत्र वृक्षाच्छादन 20.04 टक्के आहे, हे वनक्षेत्र 33 टक्यापर्यंत वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र कार्यक्रमाची आखणी केली असून येत्या 1 जुलै रोजी राज्यात 2 कोटीहून अधिक झाडांची लागवड होईल. कोल्हापूर जिल्ह्यात येत्या 1 जुलैरोजी  सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 8 लाखाहून अधिक झाडांची लागवड करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या वृक्षलागवड कार्यक्रमाचे ऑनलाईन नियंत्रण करण्यात येणार असून यासाठी आवश्यक असणाऱ्या संगणकीय आज्ञावल्या विकसित केल्या आहेत. यामध्ये वृक्षलागवडीसाठी निश्चित केलेली अक्षांश-रेखांशासह  ठिकाणे, रोपे लावण्यासाठी तयार करण्यात आलेले खड्डे, वृक्ष लागवडीचे छायाचित्र, ज्याच्या हस्ते वृक्ष लागवड झाली त्या व्यक्तीचे छायाचित्र, वृक्षांची संख्या, स्वरुप, वृक्ष प्रजाती अशी सर्व माहिती या आज्ञावलीमध्ये अपलोड केली जाणार आहे.
या वृक्षलागवडीमध्ये वन आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत 4 लाख 5 हजार तर अन्य शासकीय विभागांच्या माध्यमातून जवळपास 4 लाखाहून अधिक झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय जिल्हयात यंदा अधिकाधिक झाडे लावण्यासाठी जिल्हा, तालुका ते गांवपातळीवर अधिक लोकसहभाग घेण्यात येत आहे. यासाठी वन सामाजिक वनीकरण विभाग तसेच खाजगी रोपवाटिकांमध्ये पुरेशी रोपे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. मात्र यंदाच्या वनमहोत्सवामध्ये लावलेली झाडे जगविण्याची जबाबदारीही संबंधितांवर निश्चित केली आहे. वृक्ष लागवडीनंतर वृक्षांचे जगण्याचे प्रमाणही किमान 80 ते 90 टक्यापर्यंत राहण्यासाठी पहिल्या चार वर्षांपर्यतच्या उपाययोजना सुचविल्या आहेत. लावलेल्या झाडाला जैविक किंवा तारांचे कुंपण, कायमस्वरुपी देखभाल आणि निगा याही बाबी महत्वाच्या ठरविल्या आहेत.



रोपदानातून करा पुण्यसंचयन
        गेल्या काही वर्षात घटलेले पर्जन्यमान, वाढलेले तापमान घटलेली भूजलपातळी हा पर्यावरण बदल लक्षात घेता वृक्ष लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे. वृक्ष लागवडीची इच्छा असूनही  पैशाअभावी रोप विकत घेता येत नाही ज्यांना रोप विकत घेऊन जागेअभावी वृक्ष लागवड करता येत नाही अशांसाठी रोपदान पुण्यसंचय योजना राबविण्यावर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी भर दिला आहे. या योजनेत रोपदान करणाऱ्या व्यक्ती, संस्थांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिका, तहसिल कार्यालय तसेच उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालय येथे रोपदान करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले असून या आवाहनास जिल्हयातील जनतेनेही उर्त्स्फुत प्रतिसाद दिला आहे. दहा किंवा अधिक रोपे दान करणाऱ्या व्यक्ती, संस्थेस जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिकाधिक व्यक्ती संस्थांनी रोपदान करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. या रोपदानातून पुण्यसंचय योजनेतून दान करण्यात येणारी रोपे करवीर तालुक्यात विचारे माळ, कागल तालुक्यात कागल मध्यवर्ती रोपवाटिका, पन्हाळा तालुक्यात पिंपळे तर्फे सातवे (माले), हातकणंगले तालुक्यात मौ. नरंदे, राधानगरी तालुक्यात मौ. फराळे, गडहिंग्लज तालुक्यात मौ. हाडलगे, चंदगड तालुक्यात मौ. भोगोली, भुदरगड तालुक्यात मौ. तिरवडे, शाहूवाडी तालुक्यात मौ. वालूर, गगनबावडा तालुक्यात मौ. साळवण आजरा तालुक्यात मौ. सुळगाव येथेही रोपे स्विकारली जाणार आहेत. अधिक माहिती उपंसचालक, सामाजिक वनीकरण विभाग, मुख्य पोस्ट ऑफिस जवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 0231-2653207 येथे मिळेल.
वनमहोत्सवाच्या कार्यक्रमाव्दारे मोठयाप्रमाणावर झाडे लावून कोल्हापूर जिल्हा हरीत जिल्हा घडविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार आणि पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक टी. पी. पाटील  यांनी सर्वार्थाने भर दिला आहे. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे काम खऱ्या अर्थाने लोकसहभागातून करण्यावर जिल्हयात भर दिला आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी आपापल्या शेतात आणि परिसरात अधिकाधिक झाडे लावून वृक्ष लागवडीव्दारे आपला परिसर हरित घडवूया.
वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाच्या मोहिमेत जिल्हयातील सर्वच प्रशासकीय यंत्रणांचे सहकार्य घेण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने वन आणि सामजिक वनीकरण विभागाबरोबरच जिल्हा परिषदेकडील सर्व विभाग, कृषी विभागासह अन्य शासकीय यंत्रणांचा सहभाग वाढविला आहे. जिल्हयाला लाभलेल्या निसर्गसंपदेचे रक्षण करण्याबरोबरच  यंदाच्या  वनमहोत्सवानिमित्त शासन योजना आणि लोकसहभागातून मोठया प्रमाणात झाडे लावून 1 जुलैची वृक्षलागवड मोहिम एक लोकचळवळ म्हणून राबवून संपूर्ण जिल्हा हरीत जिल्हा घडविण्याकामी चला सर्वानीच योगदान देऊया..
                                                                                                - एस. आर. माने,
                                                                      - माहिती अधिकारी, कोल्हापूर.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.