कन्यागत महापर्वकाळात
यापुढेही सर्व यंत्रणांनी सज्ज व सतर्क रहावे
-जिल्हाधिकारी डॉ- अमित सैनी
गृसिंहवाडी, दि. 12 : कन्यागत महापर्वकाळातील आजच्या पहिल्या पर्वणीसाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजना यापुढील काळातही प्रभावीपणे राबवून भाविकांच्या सोईसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज आणि सतर्क रहावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केली.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे भक्त निवासात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय यंत्रणांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, उपजिल्हाधिकारी विजय देशमुख, प्रांताधिकारी अश्विनी जिंरगे, तहसिलदार सचिन गिरी, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी दत्त देवस्थानचे पदाधिकारी, उपसरपंच श्री. जगदाळे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
कन्यागत महापर्वकाळातील आजच्या पहिल्या पर्वणीचा अनेक भाविकांनी लाभ घेतला, उद्या परवाच्या सुट्या आणि कृष्णा नदीची कमी होत असलेली पुराची पातळी यामुळे भाविकांना उपलब्ध होत असलेले घाट यामुळे आगामी काळात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन सर्व यंत्रणांनी विशेषत: नियंत्रण कक्ष, आपत्ती नियंत्रण व्यवस्थापनाने सतर्क रहावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी स्पष्ट केले.
घाटावर भाविकांना स्नान करता यावे यासाठी पाटबंधारे, पोलीस विभागाने दक्षता बाळगावी, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, भाविकांना घाटावर सहजासहजी स्नान करता यावे यासाठीच्या आवश्यक खबरदाऱ्या संबंधित यंत्रणांनी विशेषत: लघु पाटबंधारे विभागाने घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केले. याबरोबरच घाटावरील पाणी जसजसे ओसरत जाईल तसतसी विद्युत यंत्रणा कार्यान्वित करावी. आरोग्य विभागाने स्वच्छतेच्या बाबतीत अधिक दक्षता घेऊन आरोग्य पथके आणि स्वच्छतेबाबतची कार्यवाही तात्काळ करावी, असेही ते म्हणाले.
कन्यागत महापर्वातील आजची पर्वणी सर्वांच्या सहकार्याने सुव्यवस्थीतपणे पार पडली. यामध्ये देवस्थान समिती, ग्रामपंचायत तसेच नागरीक आणि भाविकांचे मोठे योगदान असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी सांगितले. यापुढील काळात सर्व यंत्रणांनी भाविकांच्या सोईसाठी आवश्यक ती दक्षता घेऊन आपापल्या जबादाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. नृसिंहवाडीसह कृष्णाकाठावरील गणेशवाडी, औरवाड, खिद्रापूर, अमरापूर, आलास, गौरवाड, बुबनाळ, कौठेगुलंद आदी गावातील घाटावर सर्व यंत्रणेनी विशेषत: लघु पाटबंधारे विभाग, पोलीस यांनी आवश्यकती दक्षता घ्यावी. तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे स्वतंत्र युनिट ठेवावे, आवश्यक बोटी ठेवाव्यात, वैद्यकीय पथक, अग्नीशमन यंत्रणाही सजग ठेवावी अशी सूचना त्यांनी केली. यापुढील काळातही सर्व यंत्रणांनीे समन्वय ठेवावा.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.