कोल्हापूर दि. 12 : यंदाच्या गणेशात्सवात कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने बहुतांशी घरगुती गणेश मुर्तींचे आणि निर्माल्याचे पर्यावरणपूरक विसर्जन करुन जलप्रदुषण रोखण्यात महत्वाची भुमिका घेतल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.तसेच जिल्ह्यात डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा केल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.
यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पुरक करुन जल आणि वायूप्रदूषण रोखण्यासाठी यंदा जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांनी गणेशमुर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यास सक्रीय पुढाकार घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या 12 तालुक्यातील 1200 हून अधिक गावे आणि कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 2 लाख 92 हजार 842 मुर्तींचे दान केले आणि 1 हजार 541 इतके ट्रॅक्टर निर्माल्य यंत्रणेकडे जमा केले. यामध्ये 12 तालुक्यातून 2 लाख 35 हजार 889 मुर्ती तर 1322 ट्रॅक्टर निर्माल्याचा समावेश आहे.
गतवर्षीही कोल्हापूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक पध्दतीने गणेशोत्सव साजरा करुन प्रदुषण रोखण्याकामी कोल्हापूरवासियांनी दिलेल्या योगदानाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात कोल्हापूरवासियांचे कौतूक केले. मा. पंतप्रधानांची हीच भूमिका भक्कम करत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या आवाहनास जिल्ह्यातील जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद देवून,घरगुती गणपती तसेच निर्माल्य याचे पर्यावरणपूरक विसर्जन करुन महाराष्ट्रासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
घरगुती गणेशमुर्ती आणि निर्माल्य नदी व तलावात विसर्जन न करता ते पर्यावरणपुरक पध्दतीने विसर्जन करण्याच्या आवाहनास कोल्हापूरवासियांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे कळंबा तलाव आणि पंचगंगा नदीचे प्रदुषणापासून संरक्षण केले. ही कोल्हापूरवासियांच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. घरगुती गणेशमुर्ती, निर्माल्यांचे पर्यावरणपूरक पध्दतीन विसर्जन केले त्याचपध्दतीने जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही पर्यावरणपूरक गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यास सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.