** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, September 15, 2022

सोमवारी महिला लोकशाही दिन

 


कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) :  माहे सप्टेंबरचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी  सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती एस.व्ही.पाटील यांनी दिली आहे.

या लोकशाही दिनास महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक तक्रारींचे अर्ज स्व‍िकारले जाणार नाहीत, असे आवाहनही श्रीमती पाटील यांनी केले आहे.

00000

मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातील कुक्कुट पक्षांची विक्री

 

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका): मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातील 72 आठवडे पूर्ण झालेल्या ब्लॅक ॲस्ट्रलॉर्प जातीच्या कुक्कुट पक्षांची (10 मादीमागे 1 नर) वजनानुसार मादी पक्षी रुपये 75 प्रती किलो (जीवंत वजन) व नर पक्षी रुपये 100 प्रती किलो (जीवंत वजन) प्रमाणे विक्री करण्यात येणार आहे.           दि. 16 सप्टेंबर पासून पहिला लोट व 22 सप्टेंबर पासून दुसरा लोट सुरु होणार आहे. गरजुंनी सहायक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. प्रविण नाईक यांनी केले आहे.

कुक्कुट पक्षी विक्रीची वेळ सकाळी 10 ते 12 व दुपारी 3 ते 5 (शासकीय सुट्टी सोडून) अशी राहील. अधिक माहितीसाठी 0231-2651729 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

000000

महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेने जप्त केलेल्या स्थावर संपत्तीचा लिलाव -तहसलिदार शीतल मुळे-भामरे

 


कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कोल्हापूर यांच्याकडून रुपये 1 लाख 42 हजार इतक्या रक्कमेच्या वसुलीसाठी क करवीर सि.स.नं. 1055 ब, ए वॉर्ड पैकी महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोल्हापूर यांच्या हिस्सेचे क्षेत्र रक्कम वसूल करण्यासाठी स्थावर संपत्ती जप्त करण्यात आली आहे. विक्रीसाठी निश्चित केलेल्या दिवसापूर्वी पूर्वोवत एकूण रुपये 1 लाख 42 हजार अधिक व्याज जमा केले नाही तर जप्त मालमत्ता तहसिलदार कार्यालय, करवीर येथे दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 3 वाजता जाहिर लिलावाने विकली जाईल, असे करवीरच्या तहसिलदार शीतल मुळे- भामरे यांनी कळविले आहे.

लिलावाच्या शर्ती पुढीलप्रमाणे-

१. क करवीर रि.स.नं. १०५५ ब पैकी महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांच्या हिस्स्याचे क्षेत्र ०.२०.०० चौ.मी. या मालमत्तेची मुल्यांकन किंमत रु. १० लाख ७२ हजार ६००  या मालमत्तेच्या मुल्यांकन इतकी असून यापेक्षा कमी बोली स्विकारली जाणार नाही.

2. लिलाव मंजूर अंतरावर पूर्ण केला जाईल.

3. ज्यांच्या नावे लिलाव पूर्ण होईल त्याने 1/4 रक्कम तात्काळ भरावयाची आहे.

4.लिलाव मंजूर झाल्यानंतर तीन दिवसात उर्वरित ३/४ रक्कम जमा करायची आहे.

५. उर्वरित ३/४ रक्कम जमा न केल्यास फेरलिलाव केला जाईल व त्यात बोली कमी आल्यास अशी कमी पडणारी रक्कम पूर्वी जमा केलेल्या १/४ रकमेतून वजा केली जाईल.

६. थकबाकीदाराने लिलाव पुकारल्यानंतर ३० दिवसाच्या आत संपूर्ण थकबाकी, नोटीस फी, लिलाव पुकारलेचा खर्च इत्यादी खर्च जमा करून लिलाव रद्द करण्यास सक्षम अधिकाऱ्याकडे विनंती केल्यास लिलाव ज्याच्या नावे मंजूरी अंतरावर पूर्ण केला आहे. त्यास बोली रक्कमेच्या ५ टक्के रक्कम मानधन म्हणून अदा करावी लागेल.

७. सक्षम अधिकाऱ्याकडून लिलाव मंजूर झाल्यानंतर विक्री प्रमाणपत्र दिले जाईल त्या आधारे लिलाव धारकास

मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा देण्यात येईल.

00000

'जात प्रमाणपत्र वाटप करताना घ्यावयाची दक्षता व त्यातील महत्वाच्या बाबी' विषयावर कार्यशाळेचे आयोजन


कोल्हापूर, दि. 15 (जिमाका): जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार (संबंधित कामकाज पाहणारे अधिकारी, कर्मचारी) यांच्यासाठी दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 'जात प्रमाणपत्र वाटप करताना घ्यावयाची दक्षता व त्यातील महत्वाच्या बाबी' या विषयावर प्रशिक्षण/कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य उमेश घुले यांनी कळविले आहे.

 सदर कार्यशाळा जिल्हा जात प्रमाणपत्र समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुसरा मजला, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर येथे असून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे.

00000

Monday, September 12, 2022

जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज शैक्षणिक संस्थेच्या शिफारशीसह समितीकडे ३० नोव्हेंबर पर्यंत सादर करावेत

 


कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): सन २०२२-२३ या चालू शैक्षणिक वर्षात इ.१२ वी विज्ञान शाखेमध्ये व पदविका (डिप्लोमा) तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज समितीकडे त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशीसह दि. ३० नोव्हेंबर पर्यंत सादर करावेत. शैक्षणिक संस्थांनीही विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करुन समितीकडे मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य उमेश घुले यांनी केले आहे.

 समितीस प्राप्त अर्जावर विहीत मुदतीत नियमानुसार कार्यवाही पुर्ण करुन समिती निर्णय, जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करता येईल. अर्जदारांनी bartievaldity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा. महाविद्यालयीन शिफारस पत्र,  १५ A फॉर्मवर प्राचार्यांची सही, शिक्का व चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीविषयक सर्व पुरावे व विहीत नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्र ऑनलाईन अपलोड करावे व ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्डकॉपी कागदपत्रांच्या, पुराव्यांच्या साक्षांकित प्रतीसह समितीकडे सादर करावे.

अर्ज सादर करतेवेळी अर्जदार, पालक समक्ष मुळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे. अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या ई-मेलवर प्रस्तावातील त्रुटी, सुनावणी याबाबत कळविले जाते, तसेच या ई-मेलवर जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध होणार असल्याने अर्जदाराने स्वतःचे, पालकांचे अचूक ई-मेल अॅड्रेस नमुद करण्याची दक्षता घ्यावी. तसेच अर्जदाराच्या जातीच्या दाखल्यावरील तपशीलाप्रमाणेच ऑनलाईन फॉर्ममध्ये माहिती भरावी. ऑनलाईन फॉर्ममध्ये जातीच्या दाखल्याचा जो तपशील भरला जातो त्यानुसारच जात वैधता प्रमाणपत्राची ऑनलाईन प्रणालीमध्ये निर्मिती होते. त्यामुळे जातीच्या दाखल्यावरील तपशील व ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी दिलेली माहिती दोन्ही समान असल्याची खात्री अर्जदाराने करावी.

 महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांचे जातीचे प्रमाणपत्र देणे व पडताळणी करणे अधिनियम २००० चे कलम ८ प्रमाणे जाती दावा सिध्द करण्याची जबाबदारी अर्जदाराची आहे. अपुरे पुरावे असलेली प्रकरणे जाती प्रमाणपत्र पडताळणी नियमावली मधील कलम १७(२) १७(३) अन्वये निकाली काढली जातील, असेही श्री. घुले यांनी कळविले आहे.

00000

जात वैधता प्रमाणपत्रासाठी तात्काळ ऑनलाईन अर्ज करावेत

 


कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): सन २०२२-२३ या वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेले नाहीत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज तात्काळ सादर करावेत, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या असल्याने चालू शैक्षणिक वर्षांत वैधता प्रमाणपत्रा अभावी मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला नाही त्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा व त्या अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडून ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे त्याच जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे विलंबाबाबतच्या हमीपत्रासह त्वरित सादर करावा. जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यास आरक्षणातून प्रवेश मिळाला नाही तर त्यास जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जबाबदार राहणार नाही असे हमीपत्र अर्जदाराने अर्जाच्या प्रतीसोबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. हमीपत्राचा नमुना बार्टीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे हमीपत्राचा नमुना उपलब्ध आहे.

00000

कृषि पणन मंडळाच्या मॅग्नेट प्रकल्पांतर्गत निवडीसाठी 10 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करावेत

 

 

कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): मॅग्नेट प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात शेतकरी उत्पादक संस्था, मा.वि.म. स्थापित लोकसंचलित साधन केंद्र, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियांनाअंतर्गत स्थापित प्रभाग संघ, उत्पादकांच्या सहकारी संस्था, प्रक्रियादार, निर्यातदार, ॲग्रिगेटर, मध्यम व मोठ्या रिटेल विक्री संस्था, कृषि तंत्र वा आर्थिक तंत्र संस्थांनी दि. 10 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाई अर्ज करावेत, असे आवाहन कृषि पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक  सुभाष घुळे  यांनी केले आहे.

पात्र अर्जांचे मुल्यांकन करुन मुल्यांकन निकषानुसार पहिल्या 60 लाभार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यात निवड करण्यात येणार आहे. यामध्ये 40 शेतकरी उत्पादक संस्था व 24 मुल्य साखळी गुंतवणुकदार यांची निवड करण्यात येणार आहे. राज्यातील फळे,भाजीपाला व फुलांच्या उत्पादनावर प्रक्रियेसह विपनन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात मॅगनेट प्रकल्प कार्यान्वित.  उत्पादन ते ग्राहक अशा एकात्मीक मुल्य साखळ्यांच्या विकासासाठी या प्रकल्पाची आखनी केली आहे. मॅग्नेट प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत करण्यात येत आहे.

मॅगनेट प्रकल्पाचा मुख्य उद्देश मुल्य साखळ्यांमध्ये खासगी गुंतवणूक आकर्षित करणे, काढणी पश्चात नुकसान कमी करणे, साठवणुक क्षमता वाढविणे, मागणीनुसार मालाची मुल्यवर्धी करणे, अन्नाची वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे व शेतकरी उत्पादक संस्थाचा मुल्यसाखळीतील सहभाग वाढविणे.

शेतकरी उत्पादक संस्थाचा क्षमता विकास, काढणी पश्चात सुविधांसाठी अर्थसहाय्य व निवडलेल्या पीकासाठी मुल्य साखळ्या विकसन हे मॅग्नेट प्रकल्पाचे प्रमुख तीन घटक आहेत. प्रकल्पाअंतर्गत विभागातुन पहिल्या टप्यात 4 शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 1 सहकारी संस्थेची निवड करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्याना प्रकल्प खर्चाच्या अधिकतम 60 टक्केपर्यंत अर्थसाह्य देण्यात येणार आहे. हा प्रकल्प 1 हजार 67 कोटी रुपयांचा असुन त्यापैकी  746 कोटी रु. (70टक्के) आशियाई विकास बँकेकडून कर्ज स्वरुपात असणार आहेत. उर्वरित 30 टक्के रक्कम 321 कोटी रुपये राज्य शासनाचा स्वनिधी असणार आहे.

कोल्हापूर विभागातील डाळींब, केळी, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (हिरवी व लाल), फुलपिके इ. पिकांचा मॅग्नेट प्रकल्पात समावेश आहे. प्रकल्पाचा कालावधी सहा वर्षाचा असून सन 2026-27 पर्यंत हा प्रकल्प राज्यात राबविण्यात येणार आहे.  महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळच्या संकेत स्थळावर अर्जासाठी लिंक देण्यात आली आहे.

अर्ज सादर करण्यासाठीचा नमुना www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

अर्जदाराची नोंदणी करून अर्ज व मार्गदर्शक सुचना लिंक डाउनलोड करून लाभार्थ्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे ऑनलाईन जमा करावीत. ईमेलद्वारे सादर केलेले लाभार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून चेकलिष्ट प्रमाणे आवश्यक कागदपत्रांसह कृषि पणन मंडळाच्या कोल्हापूर येथील विभागीय कार्यालयात सादर करावेत.

000000

Thursday, September 8, 2022

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी रोजगार मेळावा

 

 

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका): पीएमएनएएम (PM National Apprenticeship Mela (PMNAM)) अंतर्गत सोमवार दि. 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा येथे शिकाऊ उमेदवार भरती तथा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयटीआय उत्तीर्ण व शिकाऊ उमेदवारी उत्तीर्ण तसेच इतर पदवी व पदविकाधारक, दहावी उत्तीर्ण, दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी गुणपत्रिका व आधारकार्ड घेवून मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अंशकालीन प्राचार्य रविंद्र मुंडासे यांनी केले आहे.

या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील किमान 50 नामांकित आस्थापना सहभागी होणार आहेत. प्रशिक्षणार्थींनी https://dgt.gov.in/appmela2022/candidate_registration.php या संकेतस्थळावरुन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असून औद्योगिक आस्थापनांनी https://dgt.gov.in/appmela2022/establishment.php  या संकेतस्थळावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे, असेही श्री. मुंडासे यांनी कळविले आहे.

00000

पन्हाळा तालुक्यातील उद्योजक व नवउद्योजकांसाठी मंगळवारी मार्गदर्शन कार्यक्रम नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन


कोल्हापूर, दि. 8 (जिमाका): शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ पन्हाळा तालुक्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, याउद्देशाने कोडोली हौसिंग सोसायटी सांस्कृतिक हॉल, एमएसईबी फाटा जवळ कोडोली येथे मंगळवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 3 पर्यंत ‘उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम' आयोजित केला आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थित रहावे व शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

            या कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या विभागाचे माहिती पत्रक, सर्व योजनेचे कर्ज मागणी अर्ज, ऑनलाईन योजनेसाठी संबंधित तपशील व संपूर्ण माहिती घेऊन या सर्व योजनांचा लाभ घेतलेल्या यशस्वी उद्योजकांसह उपस्थित राहतील. जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी विभाग राज्य स्तर, नाबार्ड, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान विभाग, जिल्हा रेशीम कार्यालय, मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सारथी संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ आदी विभाग यात सहभागी होणार आहेत.

           

 

 

तालुक्यातील अर्जदारांनी जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म तारखेचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांची मूळ प्रत व एक झेरॉक्स प्रत घेऊन उपस्थित राहावे. विभागाचे अधिकारी त्यांच्या विभागांच्या योजनाबद्दल माहिती सविस्तरपणे देतील. माहिती पत्रक व कर्ज मागणी अर्ज उपलब्ध करून देतील तसेच आवश्यकतेनुसार त्याच ठिकाणी कर्ज प्रस्ताव दाखल करून घेतील किंवा उर्वरित कागदपत्राबद्दल मार्गदर्शन करतील. शासनाच्या अनेक कर्ज पुरवठा योजनांची माहिती एकाच छताखाली त्याच वेळी मिळणार आहे.

000000

15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान स्वच्छता सेवा अभियान यशस्वीपणे राबवा -संजयसिंह चव्हाण

 

 

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये दि. 15  सप्टेंबर  ते  2  ऑक्टोंबर  या कालावधीत स्वच्छता ही सेवा’ या मोहीमेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार  आहेत.  यावर्षी  स्वच्छता  ही  सेवा अभियानात गावांची दृश्यमान स्वच्छता ही थीम घेऊन  हे  अभियान गावागावात  राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग घेवुन "स्वच्छता ही सेवा" मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे  मुख्य  कार्यकारी  अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

 जिल्ह्यात शाश्वत स्वच्छता राहावी व आरोग्य संपन्न गावे निर्माण व्हावी, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या  सुचनेनुसार दि. 15 सप्टेंबर ते दि. ऑक्टोंबर कालावधीत "स्वच्छता ही सेवा" अभियानअंतर्गत  गावांमध्ये  दृष्यमान स्वच्छतेसाठी एक राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येणार आहे. 

या कालावधीत पुढील उपक्रम राबविण्यात येणार आहेत-

       गावांमध्ये दृष्यमान स्वच्छता राखणेगावातील कचरा कुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई करणे

कचरा निर्मितीच्या ठिकाणी (सुका व ओला) वेगळे करण्यासाठी जनजागृती करणेकचरा संकलन आणि 

विलगीकरण केंद्र निर्माण करणेप्लॅस्टिकसारखा अविघटनशील कचरा एकत्रित करुन नियोजन करणे

पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण करणेएकल प्लॅस्टिक वापराच्या दुष्परिणामांबद्दल सभा आयोजित करुन यापूर्वी प्लॅस्टिक वापरावर बंदीबाबत घेतलेल्या ठरावांची  अंमलबजावणी  करणे,  हागणदारीमुक्त  अधिक  घटकांवर  ‘सरपंच संवाद’  आयोजित करणेकचरा  न  करणे याविषयावर घोषवाक्य  लेखन, प्रतिज्ञा  घेणे  तसेच  स्वच्छता  व  प्लॅस्टिक  बंदी  या  विषयावर वक्तृत्व,निबंध,रांगोळी, सजावट  स्पर्धेचे  आयोजन  करण्यासाठी  मंडळांना आवाहन करणे.  या  उपक्रमांसोबतच स्थानिक परिस्थितीनुसारपाणी व स्वच्छतेविषयक अन्य कल्पक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

   या अभियानात गावातील सरपंच, सदस्यगावातील समाजसेवी संस्था व ग्रामस्थ यांनी सहभागी होवुन स्वच्छता ही सेवा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही श्री.चव्हाण यांनी केलेआहे.

0000000