** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, July 7, 2012

ज्ञानच सध्याच्या युगातील भांडवल केंद्गीय कृषि मंत्री शरद पवार


कोल्हापूर, दि. ७ - ज्ञान हेच सध्याच्या युगात खरे भांडवल आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मुलांनी गुणवत्तापुर्ण शिक्षण घेऊन ज्ञान संपादन करायला हवे आणि त्याजोरावर नवनव्या क्षेत्रात जायला हवे, असे प्रतिपादन केंद्गीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज केले.
कागल तालुक्यातील अर्जुननगर येथील जनता शिक्षण मंडळाचा सुवर्णमहोत्सव आणि संस्थापक देवचंद शाह यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगपती दीपचंदभाई गारडी होते. यावेळी व्यासपीठावर कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, कोल्हापूरच्या महापौर कादंबरी कवाळे आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, देशातील ८५ टक्के शेतकर्‍यांची जमीन पाच एकरच्या आत आहे. त्यापैकी साठ टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे  शेतीवरील भार कमी होण्यासाठी शेतकर्‍यांच्या मुलांनी शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान संपादन करून विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवायला हवे. कुटुंबातील एकच व्यक्ती शेतीत असणे व्यवहार्य होणार आहे. कारण जमीनधारणा कमी होत असल्यामुळे शेती करणे दिवसेदिवस व्यवहार्य होणार नाही.
आपल्या देशात  सध्या तरूणांची संख्या मोठी आहे. ही संख्याच आपल्या देशांचे खरे भांडवल आहे. पण या तरुणाना चांगले आणि गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्याची गरज आहे. याची जबाबदारी महाविद्यालय आणि शाळांतील शिक्षकांची आहे, असे सांगून श्री. पवार म्हणाले, ज्ञान ही कोणाचीही मक्तेदारी नाही. प्रत्येकाला संधी मिळाली तर ते ज्ञानाच्या जोरावर चांगली कामगिरी करू शकतात. महिलांना संधी मिळाली तर त्याही उत्तम प्रकारचा कारभार करू शकतात.
आपण सध्या अनेक देशांना अन्न-धान्य निर्यात करू लागलो आहे. त्यामुळे आपला देश आता अन्न पुरविणारा देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, असे सांगून श्री. पवार म्हणाले, देशातील शेतकर्‍यांची क्रयशक्ती वाढायला पाहिजे यासाठी गेल्या काही वर्षात सातत्याने शेती मालाला चांगली किंमत देण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे.
यावेळी कर्नाटकचे कृषीमंत्री उमेश कत्ती, खासदार प्रभाकर कोरे, खासदार रमेश कत्ती, आमदार के. पी. पाटील, आमदार चंद्गदीप नरके, आमदार वीरकुमार पाटीस, आमदार काकासाहेब पाटील, माजी खासदार निवेदीता माने, माजी खासदार श्रीनिवास पाटील, जनता शिक्षण मंडऴाचे अध्यक्ष आशिष शाह  आदी उपस्थित होते.
                                     

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.