कोल्हापूर, दि. २६ : शिखांचे नववे गुरु, 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी नवी मुंबईतील खारघर येथे करण्यात आले आहे. या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व सोहळ्याला कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी, विविध समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे जाहीर आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून तो सामाजिक एकोपा आणि सर्वसमावेशक संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवणारा उत्सव आहे.
या ऐतिहासिक शहीदी समागमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे आयोजन राज्य शासनाचा अल्पसंख्याक विभाग आणि “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेगबहादूर साहिबजी ३५० वी शहीदी समागम समिती यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ प्रमुख समाजांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. यामध्ये शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव वारकरी समाज या सर्व समाज घटकांनी एकत्र येत एकतेचा आणि समतेचा एक नवा आदर्श संपूर्ण समाजासमोर ठेवला आहे.
या महासोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, आध्यात्मिक गुरु आणि राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक नेते उपस्थित राहणार आहेत. खारघर येथील विस्तीर्ण ओवे मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राज्य शासनाकडून भव्य नियोजन करण्यात आले असून, प्रशासकीय स्तरावरही याला मोठे महत्त्व दिले जात आहे. विविध सरकारी कार्यालये आणि सामाजिक संस्थांनी या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला असून, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय असावी यासाठी पालकमंत्र्यांनी विशेष सूचना दिल्या आहेत.
कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच पुरोगामी विचारांचा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्यांचा जिल्हा राहिला आहे. गुरु तेगबहादूर साहिबजी यांनी दाखवून दिलेला धैर्याचा आणि त्यागाचा मार्ग आजही आपल्याला प्रेरणा देणारा आहे, त्यामुळे या राष्ट्रीय स्तरावरील ऐतिहासिक शहीदी समागमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी नियोजित वेळेत खारघर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकाश आबिटकर यांनी शेवटी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.