कोल्हापूर दि. ३ : कोल्हापूर जिल्ह्यातील शालेय पटपडताळणीस आज सुरवात झाली. पटपडताळणी मोहिमेच्या आजच्या पहिल्या दिवशी सुमारे ११०० हून अधिक शाळांतील पटपडताळणी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली.
श्री. देशमुख यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व वर्गांची पटपडताळणी आजपासून सुरु झाली. ही पटपडताळणी ४ आणि ५ ऑक्टाबर पर्यंत सुरु राहणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने ५१६ पथके तयार केली आहेत. या पथकांसाठी वाहन आणि विशिष्ट नमुन्यातील प्रपत्रे देण्यात आली आहेत. जिल्ह्यात ३६ भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. ज्या शाळांबाबत तक्रारी आहेत अशा शाळांची तपासणी ही भरारी पथके करतील. या भरारी पथकात उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, इतर विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश आहे.जिल्ह्याच्या सीमेवरील गावातील नाकेबंदी कालपासूनच करण्यात आली आहे.
पटपडताळणी बरोबरच शाळांतील भौतिक सुविधांचीही तपासणी केली जात असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले. या पटपडताळणी तपासणी मोहिमेतून पटसंख्याबाबत माहिती मिळेल त्याचबरोबर जिल्ह्यातील शैक्षणिक परिस्थिती कशी आहे याचेही चित्र स्पष्ट होईल, असेही जिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.