** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, November 1, 2019

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घ्यावा - विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे




कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 1 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना ही आंबिया बहार 2019-20 साठी द्राक्षे, डाळिंब, केळी, आंबा व काजू या प्रमुख फळपिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येत आहे. तरी या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे यांनी केले आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत द्राक्ष व केळी पिकासाठी 7 नोव्हेंबर 2019, काजू पिकासाठी 30 नोव्हेंबर 2019, आंबा पिकासाठी 31 डिसेंबर 2019 तर डाळिंब पिकासाठी 14 जानेवारी 2020 आहे.
  ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरुपाची आहे. अधिसूचित क्षेत्रातील फळपिक खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. ही योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा म्हणून भारतीय कृषि विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत अवेळी/जादा पाऊस, जास्त/कमी तापमान, वेगाचा वारा व गारपीट यासारख्या हवामान धोक्यापासून विमा संरक्षण पुरविण्यात येते. महावेध प्रकल्पांतर्गत कार्यान्वित हवामान केंद्रामार्फत प्राप्त होणाऱ्या हवामान आकडेवारीनुसार नुकसान भरपाई देय होईल.
पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता रक्कम, सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच योजनेच्या अटी व शर्थींच्या माहितीसाठी कृषी विभागाचे क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी/कर्मचारी, अर्जदार शेतकऱ्यांचे बॅक खाते कार्यरत असणाऱ्या बॅक शाखेशी अथवा भारतीय कृषि विमा कंपनीशी (फोन नं- 022- 61710912  टोल फ्री नं- 1800116515 ई-मेल आय डी- mhwbcis@aicofindia.com) संपर्क साधावा.
 0 00 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.