** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, January 30, 2020

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या स्थापनेपासून आजअखेर 16 हजार 770 तक्रारीपैकी 15 हजार 467 वर निकाल - अध्यक्ष सविता भोसले





कोल्हापूर, दि. 30 (जि.मा.का.) :  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे स्थापनेपासून 16 हजार 770 मूळ तक्रारी दाखल झाल्या होत्या. यामधील आज अखेर 15 हजार 467 प्रकरणात निकाल देण्यात आला आहे. केवळ 1 हजार 303 न्याय प्रविष्ट आहेत, अशी माहिती मंचच्या अध्यक्ष सविता भोसले यांनी आज दिली.
ग्राहकांच्या हिताच्या संरक्षणासाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या  स्थापनेपासून आजअखेर 16 हजार 770 तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी 15 हजार 467 प्रकरणात निकाल देण्यात आला आहे, असे सांगून श्रीमती भोसले म्हणाल्या, फौजदारी वसुलीच्या 6 हजार 597 दाखल प्रकरणात 5 हजार 904 निकाल देण्यात आले आहेत. दिवाणी वसुलीच्या 388 दाखल प्रकरणात 285 तर किरकोळ स्वरुपाच्या 186 दाखल प्रकरणात 181 निकाल देण्यात आले आहेत.
प्रत्येक नागरिक हा ग्राहक असतो त्याने जागरुक असले पाहिजे, असे सांगून श्रीमती भोसले म्हणाल्या एखादी सेवा घेताना अथवा वस्तू विकत घेताना आपली फसवणूक होते का याविषयी ग्राहकांनी सतर्क असले पाहिजे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे ग्राहक 20 लाखापर्यंतची प्रकरणे दाखल करु शकतात. ग्राहक हक्क संरक्षण कायद्याप्रमाणे ग्राहकांना वकील देण्याची आवश्यकता नाही. ते स्वत: आपली बाजू मांडू शकतात. संपूर्ण कामकाज हे मराठीमधून चालते. किरकोळ 10 रुपयाच्या बिस्कीट पुड्याच्या प्रकरणात 50 हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाई देण्याचे निकालही झाले आहेत. ग्राहकांच्या संरक्षणासाठी आणि हितासाठी मंच आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास अशा ग्राहकांनी मंचाकडे धाव घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
0000000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.