कोल्हापूर दि. १८ : विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी ३१ मार्चपूर्वी खर्च होईल याची काळजी घ्यावी. निधी परत जाऊ नये यासाठी सर्व विभागांच्या अधिकार्यांनी त्यानुसार नियोजन करावे, अशा सूचना सहकार, संसदीय कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज केल्या.
पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज शासकीय विश्रामधाम येथे सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन निधीबाबत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी वरील सूचना दिल्या.
पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, मंजूर निधी खर्च करीत असतानाच सर्व प्रकारची कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत. कारण कामे गुणवत्तापूर्ण झाली नाहीत तर त्याबाबत लोकभावना तीव्र होतात.
पंचगंगेच्या प्रदूषणाबाबत पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांकडून माहिती घेतली. त्यावर याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, उपायुक्त संजय हेरवाडे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.