कोल्हापूर दि. ६ : कोल्हापूर जिल्ह्यातील परिसरासाठी व तालुक्यांसाठी शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्वानुसार नवीन अतिरिक्त घाऊक साखर नॉमिनी परवाना द्यावयाचा आहे. तरी नवीन घाऊक साखर नॉमिनी परवान्यासाठी ज्यांना अर्ज करावयाचा असेल त्यांनी संबंधित तहसिलदार कार्यालय येथे दि. २२ मार्च २०१२ पर्यंत अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. असे जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
कोल्हापूर शहर, करवीर, पन्हाळा, गगनबावडा, शाहुवाडी, आजरा, चंदगड, इचलकरंजी शहर, भुदरगड, कागल आणि गडहिंग्लज पूर्ण तालुक्यासाठी नवीन घाऊक नॉमिनी मंजूर करावयाचे आहेत. शासन पत्र दि. ९ ऑक्टोबर २००१ मध्ये दिलेली प्राधान्य सूची खालीलप्रमाणे आहे.
सहकारी क्षेत्रातील तालुका खरेदी विक्री संघ, अनुसूचित जाती/जमाती सदस्यांच्या सहकारी संस्था, जिल्हास्तरीय घाऊक सहकारी ग्राहक संस्था, इतर सहकारी संस्था, स्वातंत्र्य सैनिकांची विधवा पत्नी अथवा माजी सैनिकांची विधवा पत्नी, इतर महिला, माजी सैनिक, अपंग व्यक्ती आणि इतर व्यक्ती अशी प्राधान्य सूची आहे.
अर्जातील अटी पुढीलप्रमाणे आहेत. केंद्ग शासनाने नियतन केलेल्या नियंत्रित साखरेची उचल करुन वाटपासाठी राज्यातील, जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याच्या गोदामातून तालुक्यामधील मध्यवर्ती ठिकाणच्या स्वतःच्या गोदामापर्यंत लेव्ही साखर उचल करणे आवश्यक आहे. लेव्ही साखर आणण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सबळ म्हणजेच किमान २० ते २५ लाखाचे आर्थिक स्थिती दाखविणारा बँकेचा चालू तारखेचा दाखला जोडणे आवश्यक, मंजूर झालेल्या नॉमिनीस प्रथम साखर कारखान्याचा एक्स फॅक्टरी दराप्रमाणे डी. डी. ची रक्कम गुंतवावी लागेल. ज्या जागेत घाऊक वितरण करण्यात येणार आहे त्या जागोचा चालू प्रॉपर्टी कार्डाचा उतारा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार व्यतिरिक्त / जागा इतरांचे मालकीची असेल तर अर्जदारांनी जागा मालकाचे शंभर रुपये स्टॅम्पपेपरवर मालकाचे संमतीपत्र सक्षम अधिकारी यांचे समोर करुन जोडणे आवश्यक आहे. निवड केलेल्या जागेत घाऊक साखर नॉमिनी म्हणून साठा करण्यास ग्रामपंचायत/नगरपालिका ना हरकत दाखला आवश्यक असून तो सोबत जोडला पाहिजे. ज्या जागेत घाऊक साखर नॉमिनी म्हणून साठा करणार ती जागा चिन्हांकित दाखविणे आवश्यक असून समजुतीच्या नकाशावर अर्जदार यांची स्वाक्षरी आवश्यक आहे. कोणत्याही कारखान्यातून साखर वाहतूक ठेकेदार आपले गोदामामध्ये साखर वाहतूक करतील त्यांना आलेल्या वाहतुकीची रक्कम द्यावी लागेल. साखर गोदामात साठा केल्यानंतर जिल्हाधिकारीᅠयांच्याकडून विहित केलेल्या दराने तहसिलदार यांच्याकडून दिलेल्या परमिटप्रमाणे रास्त भाव दुकानदार यांना साखर देण्याची आहे. साखर विक्रीबाबत नमुन्यात दिलेली रजिस्टर व पावत्या ठेवणे आवश्यक राहील. या कार्यालयाकडून मंजूर होणारा कोठा दि. ५ पूर्वी ८० टक्के व उर्वरित दि. १० पर्यंत प्रत्येक महिन्यात उचल करावा लागेल. साखर उचल विक्री याबाबतचे लेखे सादर केल्यानंतर ९० टक्के रक्कम या कार्यालयाकडून व १० टक्के रक्कम शासन स्तरावरुन मंजूर झाल्यानंतर देणे अनुज्ञेय राहील. प्रति क्विंटल रु. २३.६० किंवा शासनाने सुधारणा केल्यास या दराने मार्जिन म्हणून रक्कम दिली जाईल. तसेच विक्री होऊन येणारी दर फरकाची येणे / देणे रक्कमा शासन नियमाप्रमाणे प्रतिपूर्ती करण्यात येईल. नियंत्रित साखर साठा करण्यासाठी विमा उतरविण्याची जबाबदारी नॉमिनीवर राहील. त्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिपूर्ती केली जाणार नाही. पोलीस अधिक्षक यांचा दंड दोष झाले नसल्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र, सहकारी संस्थेच्याबाबत जिल्हा निबंधक यांच्याकडून घेतलेले रजिस्टर प्रत, ऑडीट इत्यादी कागदपत्रांची छायांकित प्रत असणे आवश्यक आहे. नियंत्रित साखर विक्री फक्त रास्त भाव दुकानदार यांचेच परमिटवर करता येईल, इतरांना वाटता येणार नाही. नियंत्रित साखरेचे नियतन जिल्हाधिकारी / शासन मंजूर आदेशाप्रमाणे राहील. अप्पर जिल्हाधिकारी / शासनाने घालून दिलेल्या अटींचा भंग झाल्यास परवाना रद्द करण्यात येईल. या कार्यालयाकडून नियुक्त केलेल्या साखर वाहतूक ठेकेदाराकडूनच साखर उचल करावी लागेल. घाऊक नॉमिनी म्हणजे साठा करणे, विक्री करणे असे कामाचे स्वरुप राहील. अर्ज मंजूरीचा आदेश हा शासनाने ठरविलेल्या अग्रक्रमानुसार राहील असेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.