कोल्हापूर दि. २८ : कोल्हापूर शहरांतर्गत आय. आर. बी. कंपनीने तयार केलेल्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याबाबतच्या तक्रारी, टोल वसुलीस जनतेमधून विरोध तसेच जिल्ह्यात पाणी प्रश्न, वीज भारनियमन, गॅस दरवाढ, वाढती महागाई या प्रश्नांवर सर्व राजकीय पक्ष व विविध संघटना यांच्यावतीने होणार्या विविध आंदोलनामुळे कोल्हापूरचे अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय पवार यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अ ते फ व कलम ३७ (३) अन्वये संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी केला आहे. सदरचा बंदी आदेश दि. २८ मार्च २०१२ रोजी रात्रौ ००.०१ वाजलेपासून ते दि. ७ एप्रिल २०१२ रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत खालील वर्तन करण्यास मनाई केली आहे.
शस्त्रे, बंदुका, सोटा, तलवारी, भाले, सुर्या, लाठी अगर काठी किंवा शारिरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा कोणत्याही वस्तु बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्रही पदार्थ किंवा स्फोटके पदार्थ वाहून नेणे, व्यक्ती, अगर त्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन आणि दहन करणे. सार्वजनिक घोषणा देणे आणि वाद्ये वाजविणे. असभ्य हावभाव करणे. ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता आणि नितीविरुद्ध जाऊन निरनिराळ्या जातींच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन त्यांच्यात भांडणे होतील. त्याद्वारे शांततेस आणि कायदा सुव्यवस्थेस धोका निर्माण होईल अशी सोंगे अगर कृती निर्माण करुन त्याचा प्रसार करणे. या मनाई आदेशातून शासकीय अधिकारी, कर्मचारी ज्यांना त्यांच्या कर्तव्यपालनासाठी उपरोक्त वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते त्यांना यातून वगळण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या पूर्वपरवानगीने आयोजित समारंभ, तसेच अंत्ययात्रांसाठी हा मनाई आदेश लागू नाही, असेही अप्पर जिल्हा दंडाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.