** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, April 4, 2020

संचारबंदीचे उल्लंघन करुन मानवी सुरक्षा धोक्यात आणल्याबद्दल ठेकेदारासह जवाहर सह साखर कारखान्याच्या ॲग्री ओव्हरसियर वर गुन्हा




        कोल्हापूर, दि. 4 (जि.मा.का) :   कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. लॉकडाऊन असतानाही हुपरी येथील जवाहर सह साखर कारखाना लि चे ॲग्री ओव्हरसियर पंकज प्रकाश पाटील आणि ऊसतोड टोळीचे ठेकेदार राजाभाऊ तात्याबा गुजर यांनी निष्काळजीपणे टोळीतील कामगारांच्या नियमांचे उल्लंघन करुन टोळीतील कामगारांची सुरक्षा धोक्यात आणून संचारबंदी चे उल्लंघन केले. याबाबत करवीरचे सहायक निबंधक बाळासाहेब पाटील यांनी हुपरी पोलीसांत फिर्याद दिली.
            या फिर्यादित म्हटले आहे की, जिल्ह्यांतील सर्व साखर कारखान्यांना ऊस तोडणी कामगारांना जेवण, पाणी, निवारा व कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने वैद्यकीय सुविधा पुरविण्याकरिता आदेश देण्यात आले आहेत.  फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १४४(१)(३) प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 
            जवाहर सह साखर कारखान्याकडून ऊस तोडणी कामगारांना कारखान्यातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारखान्याकडून कामगारांच्या जेवणाची, राहण्याची तसेच वैद्यकीय सुविधा करण्यात आलेली आहे. कामगारांना राहत्या ठिकाणी थांबवण्याची जबाबदारी कारखान्याप्रमाणेच  ऊसतोड टोळीचे ठेकेदार यांचीहि आहे. यासाठी यावर लक्ष ठेवण्यासाठी कारखान्याचे अग्री ओव्हरसियर पंकज पाटील यांना नेमण्यात आले आहे. 
            काल दि ३ एप्रिलरोजी रात्री   ८ च्या सुमारास जवाहर सह साखर कारखान्याकडील तळंदगे येथे वास्तव्यास असणारे ठेकेदार राजाभाऊ गुजर व त्यांच्या टोळीतील ऊसतोड कामगार ट्रॅक्टर (क्र. एम एच ०२३ टी २१२६), सह ट्रॉली (क्र. एम एच २३ क्यू ४००२) व (एम एच २३ क्यू ४००३) मधून एकूण २३ कामगार घेवून निघून गेले. मंगसुळी (कर्नाटक ) येथे अपघात होवून १३ कामगार जखमी झाले. 
   या प्रकाराबाबत कारखान्यात चौकशी केली असता, ठेकेदार व कामगार परस्पर निघून गेल्याचे समजले. ठेकेदार राजाभाऊ गुजर(रा. पिंपळवाडी ता. व जि. बीड) यांने संचारबंदी लागू असल्याचे माहीत असतानही  लोकांच्या जिवितास व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आणली. निष्काळजीपणे नियमांचे उल्लंघन केले. तसेच ॲग्री ओव्हरसियर पंकज पाटील (रा. चिंचवाड ता. करवीर) याने दिलेली जबाबदारी पार न पाडल्याने हा प्रकार घडला.   
            याबाबत हुपरी पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला असून, असून सहायक फौजदार रावसाहेब हजारे हे तपास करीत आहेत.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.