** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, April 3, 2020

क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना सोई-सुविधा देण्यास प्राधान्य चार अधिकाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती - आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी




            कोल्हापूर, दि. 3  (जि.मा.का) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना नाश्ता, जेवण, आरोग्य तपासण्या आदी सोयी-सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येत असून याबाबीवर नियंत्रण अधिकारी म्हणून महानगरपालिकेच्या चार अधिकाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी आज येथे दिली.
            कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्व त्या उपाययोजना युध्दपातळीवर केल्या जात असल्याचे सांगून महानगरपालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना राहण्यासाठीची व्यवस्था, नाश्ता, जेवणबरोबरच आवश्यक आरोग्य तपासण्या हे काम प्राधान्याने केले जाईल, तसेच या लोकांसाठी समुपदेशनाच्या उद्देशाने आर्ट ऑफ लिव्हिंगचा व हार्ट फुलनेस  या स्वयंसेवी संस्थांमार्फत समुपदेशनाचा उपक्रम राबविता येईल का, याचाही विचार केला जाईल. शहरातील विलगीकरण केंद्राच्या व्यवस्थेवर अधिक लक्ष देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी त्यांच्या विभागीय कार्यालयस्तरावर संपर्क अधिकारी नियुक्त केला असून या संपर्क अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील विलगीकरण केंद्रामधील व्यक्तींच्या सोयी-सुविधेबाबत अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे.
            महापालिकेच्यावतीने शहरामध्ये सहा ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेचे अधिकारी तसेच या केंद्रांच्या ठिकाणी संबंधित विभागाचे अधिकारी यांची जबाबदारी निश्चित केली आहे.  या ठिकाणी मुंबई, पुणे, कर्नाटकासह परजिल्हयातून आलेल्या नागरिकांना या कक्षात ठेवण्यात आलेले आहे. या विलगीकरणाच्या ठिकाणांची आयुक्त डॉ. कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, अधीक्षक अभियंता संभाजी माने  यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच विलगीकरण केंद्रामध्ये दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांचीही पाहणी करुन क्वारंटाईन व्यक्तींची विचारपूस केली. 
            महानगरपालिका आयुक्त डॉ.कलशेट्टी यांनी राजाराम महाविद्यालय अल्पसंख्याक वसतीगृह येथे करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षास भेट दिली. कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी महापालिकेकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. शहरामध्ये शेंडापार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्र येथे 46, अंडी उबवणी केंद्र येथे 38, पंजाबराव देशमुख वस्तीगृह येथे 78, गर्व्हमेंट पॉलिटेक्नीकल मुलांचे वस्तीगृह येथे 51, राजाराम महाविद्यालय अल्पसंख्याक वस्तीगृह येथे 82 असे एकूण 295 नागरिकांना या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. या विलगीकरण केंद्रातील लोकांसाठी  आवश्यक सोयी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यास महापालिकेचे प्राधान्य असून या केंद्रामध्ये लोकांच्या करमणुकीसाठी ध्वनिमुद्रित संगीताची सोय करण्यात येत असल्याचेही  ते म्हणाले. 
            यावेळी सहायक आयुक्त अवधुत कुंभार, डॉ. रमेश जाधव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.