** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, March 17, 2020

अन्न धान्य, पेट्रोल-डिझेल, गॅस यांचा जिल्ह्यात पुरेसा साठा नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये-जिल्हाधिकारी



      कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये अन्न धान्य, पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकचा गॅस यांचा पुरेसासाठा आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
        जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात पेट्रोलियम कंपन्या तसेच बाजार समितीचे व्यापारी यांच्या सोबत बैठक झाली.  बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, प्रांताधिकारी वैभव नावडकर, इंधन कंपन्यांचे प्रतिनिधी महेश तोसणीवाल, विशाल गुप्ता, सी.के, नंदकुमार, बाजार समितीचे सचिव मोहन सालपे, व्यापारी अशोककुमार आहुजा, नईम बागवान, विजय कागले आदी उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील साठ्याबाबत सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा हा सुरळीत राहणार आहे. कोणत्याही अफवांना नागरिकांनी बळी पडू नये. प्रत्येक पेट्रोल पंपावर पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याबाबत आणि पेट्रोल पंप सुरु राहणार असल्याबाबत फलक लावावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
          वर्षभर पुरेल एवढा अन्न धान्याचा साठा कोल्हापूरमध्ये असल्याचे व्यापारी असोसिएशनने सांगितल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी यावेळी दिली.
 0 0 0 0  0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.