** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, September 13, 2019

पोलंडच्या नागरिकांनी केले कोल्हापूरच्या भूमीला वंदन !










       कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : दुसऱ्या महायुद्धादरम्यान निर्वासित झालेल्या पोलंडच्या २७ नागरिकांचे  काल भारतात आगमन झाले. आगमन झाल्यानंतर भूमीला वंदन करून वळीवडे कॅम्पच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. 
            वळीवडे येथे 1942 ते 1948 या काळात या निर्वासितांनी बालपण व्यतीत केले आहे. बालपण व्यतीत केलेले नागरिक व त्यांचे सहकारी असे एकूण 27 नागरिक काल दाखल झाले आहेत. हॉटेल सयाजी येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, याज्ञसेनी फत्तेसिंह सावंत, सुमित्रादेवी सुरेश माने, कृतिका संग्रामसिंह चव्हाण, रिमा रवींद्र पाटील यांनी कुंकुमतिलक लावून व पुष्पहार घालून स्वागत केले. 
            उप परराष्ट्र मंत्री प्रिझिदॅज यांच्या नेतृत्वाखाली द्विस्तरीय शिष्टमंडळ आज रात्री कोल्हापुरात दाखल होत आहे. दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता ते कोल्हापूर शहरातील उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. 
            या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले पोलंडचे नागरिक व उपपरराष्ट्र व उच्चस्तरीय सदस्य  वळीवडे येथे भेट देणार आहेत. वळविडे येथे 1942 ते 1948 या काळात आपले बालपण व्यतीत केलेले पोलंडचे १३ नागरिक देखील यामध्ये सहभागी होणार आहेत.  1942 ते 1947 या काळात ते पाच हजार नागरिक निर्वासित म्हणून ज्या भागात राहत होते तेथे उभारण्यात आलेल्या स्मृती स्तंभाचे अनावरण मार्सिन प्रसिदॅज त्यांच्या हस्ते होणार आहे. याच भागात एक कायमस्वरूपी संग्रहालय उभे करण्यात येणार आहे. कॅंप वळीवडे येथील जीवन  आणि काळ यांची आत्ताच्या व पुढील पिढ्यांना माहिती व्हावी हा या संग्रहालय उभारण्याचा उद्देश आहे. या संग्रहालयात त्या काळातील छायाचित्रे, चित्रे, कागदपत्रे, आणि इतर महत्त्वाच्या वस्तू तसेच साहित्य ठेवले जाणार आहेत. येत्या वर्षभरात हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. 
        काल या नागरिकांनी शहरातील गणेशोत्सव विसर्जन सोहळ्याचा आनंद घेतला.
वळीवडेतील बांगडीची लुथांची आठवण
            ळीवडे येथे १९४२ ते १९४८ या कालावधीत लुथा मारिया आईसमवेत रहात असताना आईने वळीवडे येथे कॅम्पमध्ये हातात घातलेली बांगडी पोलंडच्या निर्वासित महिलेने आठवण म्हणून जपून ठेवली आहे. ७२ वर्षा पासून हातात असेलेली बांगडी स्टीलची असून भारतातील शाहू महाराजांच्या भूमीची आठवण जपून ठेवल्याचं लुथा मारिया यांनी सांगितले.
00000





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.