कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : आपत्तीग्रस्त भागात
झालेल्या घरांच्या नुकसानीबाबत डाटा एन्ट्रीचे काम प्राधान्यांने पूर्ण करावे, असे
निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
आपत्तीग्रस्त भागातील पडझड झालेल्या घरांच्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी
श्री. देसाई यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ
कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे
अधिक्षक अभियंता संभाजी माने, म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील, निवासी
उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी गावनिहाय
आढावा घेतला. जिल्हाधिकारी म्हणाले, 90
टक्क्यापेक्षा जास्त भाग ग्रामीण मधला आहे. अभियंत्यांनी अधिक दक्षतेने काम करावे.
याबाबत आचारसंहितेचा कोणताही बाऊ करु नये. जिल्हयातील सर्व नगरपरिषदांच्या
मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या नगरपरिषदेबाबतची समग्र माहिती बाळगणे गरजेचे आहे. तसेच
जिल्हास्तरीय बैठकीस सर्व मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: सर्व माहितीसह उपस्थित रहावे,
अशी सूचनाही त्यांनी केली. सीओंनी आपल्या
शहराची नगरपालिकेची जबाबदारी आपण घ्यायला हवी, फिल्डवर जाऊन प्रत्यक्ष कामांची
तपासणी करा. कोणाचीही तक्रार माझ्याकडे येता कामा नये. पूर्ण पडलेल्या घरांबाबत
प्राधान्याने काम करा, असेही ते म्हणाले.
गडहिंग्लजमधील 100 टक्के ऑनलाईन एन्ट्री
झाल्याबद्दल तसेच कोल्हापूर शहर मधील झालेल्या घरांच्या सर्वेक्षण अहवालाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी
समाधान व्यक्त केले. आपल्या नगरपालिका हद्दीतील दुकाने, कारखाने, शेती यांच्या नुकसानीचे
सर्वेक्षण करा, तसेच दोन दिवसांत प्राधान्याने डाटा एन्ट्रीचे काम पूर्ण करण्याचे
निर्देशही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिले.
00000
00000


No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.