कोल्हापूर, दि. ६ (जिमाका) : जलस्त्रोत
प्रदूषित होणार नाहीत याची दक्षता घेऊन ग्राम पंचायत स्तरावर निर्माण करण्यात
आलेल्या पर्यायी व्यवस्थांचा ग्रामस्थांनी उपयोग करुन पर्यावरण संरक्षणामध्ये आपले
योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक व मुख्य
कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.
सन २०१५ पासून जिल्हा परिषदेमार्फत
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. या वर्षीही या उपक्रमामध्ये सर्व
कुटुंबांचा सहभाग मिळण्यासाठी ग्राम पंचायतस्तरावर तयारी करण्यात आली असल्याचे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) प्रियदर्शिनी मोरे यांनी
कळविले आहे.
जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतीमध्ये या
उपक्रमासाठी पूर्व तयारी झाली असून मूर्ती संकलन तसेच मूर्ती विसर्जनासाठी पर्यायी
व्यवस्था, काहिली उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. संकलित मूर्ती तसेच निर्माल्य
यांच्यासाठी जागांही निश्चिती करण्यात आली असून वाहतूक व्यवस्था देखील करण्यात
आलेली आहे.
उपक्रमाच्या
सनियंत्रणासाठी तालुका स्तरावरुन प्रत्येक गावासाठी संपर्क अधिकार्यांची
नेमणूक करण्यात आली आहे. उपक्रमात स्थानिक स्वयंसेवी संस्था, पर्यावरण प्रेमी, तरुण
मंडळे यांचाही सहभाग घेतला जाणार आहे. तसेच जिल्हा स्तरावरुन सर्व तालुक्यांसाठी
जिल्हा परिषद विभागप्रमुख यांची संपर्क अधिकारी नेमणूक करण्यात आली आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.