कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती
कार्यालय) : आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक आघाडीवर आपली भूमिका समर्थपणे
सांभाळताना जनसंपर्क अत्यंत आवश्यक आहे. सुसंवादामुळेच प्रभावी जनसंपर्क घडत असतो,
असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी आज केले.
जिल्हा
परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्र या
दोन दिवशीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन जिज्ञासा गतिमंद मुलांची शाळा येथे आज झाला.
याप्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा राष्ट्रीय न्यास समितीचे सदस्य
अतुल जोशी तसेच जिज्ञासा विशेष शिक्षण आणि
अपंगमती विकास संस्थेच्या कार्यवाह स्मिता दीक्षित उपस्थित होत्या.
समाज
कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी सुरूवातीला स्वागत, प्रास्ताविक करून दोन दिवशीय
प्रशिक्षणाची माहिती दिली. प्रत्येक पंचायत समितीमध्ये दिव्यांग सल्ला व
मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून
दिव्यांगांना आणि त्यांच्या नातेवाईकांना फक्त जबाबदारी आणि कर्तव्य याची माहिती
द्यावी. सामाजिक बांधिलकी आणि भावनेतून सल्ला व मार्गदर्शनाचे काम करावे, असे
आवाहन त्यांनी केले.
येणाऱ्या
प्रत्येक अभ्यागतांचे म्हणने ऐकून घेणे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हेच
जनसंपर्काचे काम आहे, असे सांगून
प्रमुख पाहुणे श्री. सातपुते म्हणाले, आपल्याकडे कामासाठी येणाऱ्या प्रत्येक
माणसांमध्ये आपण सर्वांनी स्वत:ला पहावे. ज्यावेळी आपणाला नोकरी नव्हती, आपल्या
उमेदवारीचा काळ आठवून काम केल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. शासनाची मोहीम
केवळ कागदोपत्री न राबवता समाजाप्रती आत्मियता ठेवून काम केल्यास खऱ्या अर्थाने
आत्मिक समाधान मिळते. दिव्यांगांसाठी काम करण हे पुण्याईचे काम आहे. यामध्ये सराव
आणि सातत्य राहिलं पाहिजे. सराव आपल्याला परिपूर्ण बनवतो. गुणवत्ता टिकवण्याचे सार
आणि तारूण्याचे गुपित म्हणजे सराव. नोकरी ही भाकरी मिळवून देत असते आणि भाकरी आई
करत असते. म्हणजेच एका अर्थाने नोकरी ही आपली आई आहे. त्यासाठी प्रामाणिकपणे
सर्वांनी योगदान द्यावे, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय
भाषणात श्री. जोशी म्हणाले, दिव्यांगांमध्येच देव दिसेल. दुसरीकडे कुठे जायची गरज
नाही. त्यांची सेवा केल्यास निश्चितपणे दैवी आशीर्वाद मिळतील. केवळ शासनाचे काम
करतोय ही भावना न ठेवता सेवाभाव, सेवावृत्ती ठेवून काम करावे. पुढच्या पिढींसमोर,
समाजासमोर प्रेरणा निर्माण करावी. आयुष्यात काहीच कमी पडणार नाही, असे ते म्हणाले.
सामाजिक
कार्यकर्ते सदानंद बगाडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. स्वयम गतिमंद शाळेचे
मुख्याध्यापक प्रमोद भिसे यांनी आभार मानले. यावेळी प्रशिक्षणार्थी
शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. भारत पवार यांनी सूत्रासंचालन केले.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.