कोल्हापूर दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) :- खासगी अवैध सावकारीमुळे अडलेल्या शेतकरी
वर्गाची कुंचबना होत असते. यासाठी पोलीस विभागाने खासगी अवैध
सावकारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना
गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज दिल्या.
पोलीस अधीक्षक कार्यालयात श्री. देसाई यांनी
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था संदर्भातील आढावा बैठक घेतली. बैठकीस पोलीस
अधीक्षक शैलेश बलकवडे, परविक्षाधिन पोलीस अधीक्षक धीरजकुमार, अपर पोलीस अधीक्षक
तिरुपती काकडे, जयश्री गायकवाड, उप अधिक्षक प्रशांत अमृतकर, श्रीमती पी. एस. कदम
यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, यावर्षी
कोरोना, महापूर आणि नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान
झाले आहे. या आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला
आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन खासगी अवैध सावकारांकडून
शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी पोलीस विभागाने जिल्ह्यात विशेष तपासणी
मोहीम राबवावी. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना श्री.
देसाई यांनी दिल्या.
गृहराज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, दिशा कायद्यासाठी
राज्य शासन संवेदनशील आहे. महिलांना सार्वत्रिक ठिकाणी वावरताना सुरक्षित वाटले
पाहिजे, असे वातावरण निर्माण करावे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आणि गुन्ह्यांचे उकल होण्याच्या वाढत्या
प्रमाणाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पोलीसांना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन
देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. पोलीसांना चांगली वाहने मिळावीत यासाठी
प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागात पोलीस ठाण्यापासून जवळच
पोलिसांना राहता यावे यासाठी पोलीस वसाहतीसाठी प्रस्ताव पाठवावेत. पाठविलेल्या
प्रस्तावाचा पाठपुरावा करुन त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
पोलीस अधीक्षक श्री. बलकवडे यांनी जिल्ह्यातील
कायदा व सुव्यवस्था व पोलीस विभागाकडील कामकाजाबाबत सविस्तर संगणकीय सादरीकरण
केले.
00000


No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.