कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : गावा गावात 176 बंद
असणाऱ्या पाणी पुरवठा योजना आठवडाभरात सुरु करा, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त
डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल
यांना केल्या.
पुणे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आज सकाळी
शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड, टाकळीवाडी येथील गुरुदत्त शुगर येथील शिबीर,
नृसिंहवाडी येथील पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रांताधिकारी समीर शिंगटे,
तहसिलदार गजानन गुरव आदी उपस्थित होते. त्यानंतर करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली आणि
अंबेवाडी येथे पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसिलदार सचिन गिरी,
गट विकास अधिकारी सचिन घाडगे आदी उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील कुंभार गल्ली,
शाहूपुरी, व्हीनस कॉर्नर याभागाची सद्यस्थितीची पाहणी केली यावेळी महापालिका
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.
यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री सर्व विभाग प्रमुखांची त्यांनी बैठक
घेतली. याबैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, महापालिका आयुक्त डॉ.
मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी
अधिकारी अमन मित्तल, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय
शिंदे आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांनी सुरुवातील सर्वांचे स्वागत करुन संगणकीय सादरीकरण केले.
पूरपरिस्थितीबाबत घरांची पडझड, बाधित गावे, जनावरांची सद्यस्थिती, वीज जोडण्या,
पाणी पुरवठा, स्वच्छता, पंचनामे, मदत निधी वाटप याबाबत त्यांनी सविस्तर माहिती
दिली. 345 पूर बाधित आणि 30 गावे
अतिवृष्टी बाधित आहेत. 224 संक्रमण शिबीरांमध्ये 15958 शिबीरार्थी संख्या होती. आज
ती 142 शिबीरांमध्ये 33601 इतके झाले आहे.
विभागीय
आयुक्त डॉ. म्हैसेकर यावेळी म्हणाले, आपत्ती ग्रस्तांना रोख रक्कम वाटण्यात येत
आहे अशा ठिकाणी कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस
बंदोबस्त ठेवावा. पंचनामे पथकासोबतही बंदोबस्त द्यावा. विविध सेवाभावी संस्था,
संघटना, लोकप्रतिनिधी यांच्याकडून आलेली मोठ्या प्रमाणात मदत आपत्तीग्रस्त सर्व
गावांना समान पोहोच करावी. कोणतेही गाव
यापासून वंचित राहू नये हे पहावे.
पशूसंवर्धन
विभागाने जनावरांच्याबाबत सतर्क राहून लवकरात लवकर पंचनामे करावेत. याबाबत तक्रार
येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. गावामध्ये 176 बंद
असणाऱ्या पाणी पुरवठा योजना आठवड्यात सुरु करा. कृषी विभागाने तालुकानिहाय
केलेल्या पंचनाम्याचे अहवाल सादर करावेत. एखादा दिवस जादा घ्यावा परंतु चुकीचे
पंचनामे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी दिल्या.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.