कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्यामधील आपत्तीत
सापडलेल्या विशेषत: शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाबाबत असणाऱ्या कर्जाची पुनर्गठण
करावे. त्याचबरोबर नवीन कर्जाला सहानुभूतीपूर्वक पात्र ठरवावे, असे निर्देश
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात विशेष जिल्हास्तरीय
बँकर्स समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी अमन
मित्तल,बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रबंधक नितीन देशपांडे, बँक ऑफ महाराष्ट्राचे
विभागीय प्रबंधक किशोर कुमार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा
उपनिबंधक अमर शिंदे, नाबार्डचे नंदू नाईक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने आदी उपस्थित होते.
सुरूवातील अग्रणी जिल्हा प्रबंधक राहूल
माने यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या
निर्देशानुसार आपत्तीग्रस्त भागामधील कर्जदारांसाठी घ्यावयाच्या निर्णयानुसार ही
बैठक बोलवल्याचे सांगून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे परिपत्रकाचे वाचन श्री. माने
यांनी केले.
जिल्हाधिकरी श्री. देसाई यावेळी
म्हणाले, आपत्तीग्रस्त भागातील कर्जदारांबाबत सर्व बँकांनी सहानुभूतीपूर्वक
व्यवहार करावेत. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभे असणारे पीक याबाबत कर्ज, कृषी मुदत
कर्ज, कृषीपुरक व्यवसाय कर्ज तसेच कृषी व्यतिरिक्त इतर अन्य कर्जांचे पुनर्गठण
करावे. बाधित क्षेत्रातील कर्ज खाती एनपीए करू नयेत. इचलकरंजीसारख्या भागात
यंत्रमागधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी संधी द्यावी. नवीन कर्जाची मागणी आली तर ती पूर्ण करा.
विशेषत: शेतकऱ्यांचा ओघ कर्जासाठी राष्ट्रिय बँकेकडे राहील. त्यांना सहकार्य करा,
असेही ते शेवटी म्हणाले.
या बैठकीला युनियन बँक ऑफ इंडियाच्या
क्षेत्रीय व्यवस्थापक सुचित्रा नारकर, फेडरल बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक अजय
देशपांडे यांच्यासह विविध बँकांचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.