** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, June 7, 2021

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘पाऊस पाणी संकलन व भूजल प्रदूषण’’ विषयावर वेबिनार संपन्न


            कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेस पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. 5 जून रोजी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाच्या संयुक्त विद्यमाने पाऊस पाणी संकलन व भूजल प्रदूषण या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भूजलाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता राज्यातील 1 लाख भूगोल, भूशास्त्र, कृषी पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी तसेच नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वेबिनारद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी स्वागत करून वेबिनारची प्रस्तावना सादर केली. शिवाजी  विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. दिगंबर शिर्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या उपक्रमाचे कौतुक करून या उपक्रमास शिवाजी  विद्यापीठ  संपूर्ण सहकार्य करेल, असे सांगितले. तसेच, भूजलाची उपयुक्तता, त्याचे संवर्धन करणे काळानुसार गरजेचे असल्याचे त्यांनी  सांगितले.

डॉ. कलशेट्टी यांनी  गेल्या  पन्नास वर्षांमध्ये भूजल उपश्यामध्ये झालेली वाढ, भूजल पुनर्भरण याबाबत सविस्तर आकडेवारीसह माहिती दिली. तसेच पाणलोट  निहाय सध्याची भूजल स्थितीची सविस्तर माहिती दिली. राज्यातील अति शोषित, शोषित पाणलोट क्षेत्रे व तेथील पाण्याच्या पातळीत झालेली घट भरून काढण्यासाठी  पाऊस, पाणी संकलन आणि भूजल पुनर्भरण ही काळाची गरज आहे असे सांगितले. येत्या मान्सून  पूर्वी  राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भूजल पुनर्भरण, पावसाचे पाणी संकलन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

वॉटर फील्ड रिसर्च फाउंडेशनचे  व्यवस्थापकीय संचालक संदीप अध्यापक यांनी पाऊस पाणी संकलन व भूजल पुनर्भरण या विषयावर सविस्तर माहिती दिली. तसेच पावसाच्या पाणी संकलनासाठी  कोणती जागा योग्य आहे, सर्वेक्षण कसे करावे, पाऊस पाणी संकलन कसे करावे, भूजल पुनर्भरण करणे किती आवश्यक आहे, ते करत असताना कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर तांत्रिक माहिती  दिली.

 

 

ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड  यांनी भूजल व  भूपृष्ठावरील पाणीसाठे व प्रदूषण, नागरी  वस्त्यांमुळे होणारे प्रदूषण, औद्योगिकरणामुळे होणारे भूजलाचे प्रदूषण, शेतीमध्ये वापरली  जाणारी  रासायनिक  खते, कीटकनाशके, तणनाशके यामुळे होणारे जल प्रदूषण याचे दुष्परिणाम याबाबत माहिती  देवून प्रदूषण रोखणे गरजेचे असल्याचे सांगितले.

शिवाजी  विद्यापीठाचे भूगोल विभाग प्रमुख संभाजी शिंदे यांनी आभार मानले.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.