कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती
कार्यालय ) : माल वाहतूक
वाहनामधून प्रवासी वाहतूक होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता पोलीसांकडून घेण्यात
येत आहे. जयसिंगपूर जवळील अंकली-उदगाव तपासणी नाक्यामधून काल एका दिवसात दोन हजार
वाहनांचा प्रवेश झाला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज अंकली-उदगाव
तपासणी नाक्याला भेट देवून पाहणी केली. याठिकाणी अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास
घाडगे, पोलीस उप अधीक्षक किशोर काळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून काटेकोरपणे
तपासणी सुरु होती.
अपर पोलीस अधीक्षक श्री. घाडगे यांनी यावेळी माहिती दिली. दुचाकी वाहनांसाठी
स्वतंत्र मार्ग ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर चारचाकी आणि मालवाहतूक
वाहनांसाठीही स्वतंत्र मार्ग ठेवण्यात आला
आहे. जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहन धारकाची वैद्यकीय तसेच प्रवेश
पत्राची तपासणी करण्यात येत आहे. मालवाहतूक वाहनांवर स्टिकर चिकटवण्यात येत आहे.
थर्मल स्कॅनरद्वारेही तपासणी होत आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या 61
रस्त्यांपैकी 19 मार्गावर तपासणी नाके ठेवण्यात आले आहेत. याच ठिकाणी वैद्यकीय
पथकेही ठेवण्यात आली आहेत. दररोज पोलीस आणि वैद्यकीय पथक यांच्याकडून
जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची आणि व्यक्तींची तपासणी करण्यात येते.
विशेषत: मालवाहतूक वाहनातून प्रवसी वाहतूक होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतली
जाते. काल एका दिवसात या नाक्यामधून सुमारे दोन वाहनांचा प्रवेश झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण 19 तपासणी नाक्यांमधून सुमारे 8 हजार वाहने दररोज येत आहेत.
यासर्वांची नोंद ठेवण्यात येत आहे.
परवाना घेवून येणाऱ्या व्यक्तींसाठी तीन प्रतीत स्टिकर बनविण्यात आले आहे. एक
प्रत तपासणी पथकाकडे दुसरी प्रत संबंधिताकडे तर तिसरी प्रत रुग्णालयातील पोलीस
अधिकाऱ्याकडे दिली जाते, असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, संबंधित व्यक्ती
रुग्णालयात तपासणीसाठी गेला का याबाबत क्रॉस चेकिंग केले जाते. त्याचबरोबर
संबंधिताला फोनवरुनही नियंत्रण कक्षामधून विचारणा करण्यात येते. प्रवाशांनीही
अत्यावश्यक कामासाठी परवाना घेवूनच प्रवास करावा. आपली कोणतीही माहिती लपवू नये,
प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
00000







No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.