** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, June 30, 2020

31 जुलै अखेर शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी सहभाग नोंदवावा -कृषि सहसंचालक श्री. दशरथ तांभाळे



      कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): खरीप हंगाम सन 2020-21 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यातील भात, ज्वारी, नाचणी, भुईमूग सोयाबीन या पिकासाठी लागू आहे. पीक नुकसानीची जोखीम पीक विम्याच्या माध्यमातून उचलून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे कार्य या योजनेतून होत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिनांक 31 जुलै 2020 अखेर मुदतीत सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर विभागीय कृषि सहसंचालक श्री. दशरथ तांभाळे यांनी केले आहे.
         सर्व शेतकऱ्यांसाठी कर्जदार अथवा बिगर कर्जदार ऐच्छिक असून खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीसुध्दा योजनेत भाग घेण्यासाठी पात्र राहतील. योजनेतील सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के इतका राहणार असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामातील पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के, रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5 टक्के तर नगदी पिकासाठी 5 टक्के इतका आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै 2020 अखेर आहे.
         कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही योजना राबविण्यासाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे.
            प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी, लावणी झाल्यामुळे (एकुण पेरणी क्षेत्राच्या 25 टक्क्यापेक्षा कमी पेरणी झाल्यास) होणारे नुकसान तसेच पिकांच्या हंगामामध्ये (सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत) पूर, पावसातील खंड, दुष्काळ..इ. सारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल, तर होणाऱ्या नुकसानीपासून विमा संरक्षण पुरविण्यात येत आहे.
          याशिवाय पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड रोग इ. बाबीमुळे उत्पन्नात येणारी घटीमुळे होणारे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीनंतर 14 दिवसापर्यंत नुकसानसाठी विमा संरक्षण आहे.
         शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याकरिता नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड/आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांसाठी करारनामा/सहमतीपत्र, पेरणी स्वयंघोषणापत्र, बॅंक पासबुक प्रत या आवश्यक कागदपत्रांसह त्यांचे खाते कार्यरत असणारी बॅंक शाखा/ प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, संबधित विमा कंपनी कार्यालय, आपले सरकार सेवा सुविधा केंद्राशी संपर्क साधावा.
         याशिवाय पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करुनही शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात. योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषि विभागाचे क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी/कर्मचारी अथवा संबंधित विमा कंपनी प्रतिनिधीशी संपर्क साधावा, असे कळविले आहे.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.