वीज
कोसळून होणाऱ्या हानीसंदर्भात आगाऊ सूचना देणारे ‘दामिनी’ हे स्वतंत्र मोबाईल ॲप
हवामान शास्त्र विभागाने विकसित केले आहे. वीजप्रवण क्षेत्रात काय करावे काय करू
नये याबाबतही ‘दामिनी’ मार्गदर्शक ठरत आहे.
सद्या पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस
म्हणजे नवनिर्मिती. पाऊस म्हणजे हिरवाई अन् मनमुराद आनंद ! परंतु, पावसाच्या आधी
आकाशात सौदामिनीचा कडकडाट आलाच. याच तिच्या कडकडाटामुळे आपसुक नुकसान हे आलेच. वीज
कोसळून होणारी हानी टाळता येण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांनी, सामान्य नागरिकांनी
काय करावे काय करू नये यासंदर्भात माहिती देण्यासाठी दामिनी हे ॲप डाऊनलोड करणे
आवश्यक आहे.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक
अभय यावलकर यांनी याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून जिल्हास्तरावर वीज
कोसळून होणाऱ्या हानीसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या आहेत.
IMD व IITMयांनी विकसित केलेल्या दामिनी या
ॲपबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करून त्याचा व्यापक प्रमाणावर प्रचार व वापर
करावा. वीज पडून मृत्यू झालेल्या मनुष्य/ जनावरे यांची योग्यप्रकारे नोंद घेऊन
(स्थान-सविस्तर माहिती) त्यांची माहिती उपलब्ध करून दिलेल्या प्रपत्रामध्ये राज्य
शासनास नियमितपणे सादर करावी. जिल्हा प्रशासनाने वीज कोसळून होणाऱ्या आपत्तीबाबत
कृती आराखडा तयार करावा. IMD /IITM यांच्या संकेतस्थळावर संभाव्य वीजप्रवण
क्षेत्राबाबत सातत्याने सुधारित सूचना प्रसारित केल्या जातात. या सूचनांची नोंद
घेऊन त्यावर त्वरित योग्य ती कार्यवाही करावी.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून
‘वीज कोसळणे’ या आपत्ती संदर्भात काय करावे काय करू नये याबाबत ध्वीनफित व लघुचित्रपट
तयार केले आहेत. त्यांचे मराठी भाषांतर करून ते व्यापक प्रमाणावर प्रसारित करावे.
जिल्हा प्रशासनाने वीज कोसळून होणारी हानी कमी करण्यासाठी विज रोधक यंत्रणा व वीज
प्रवण क्षेत्राबाबत आगाऊ सूचना देणारी व त्या संदर्भात सतर्कता देणाऱ्या सूचना
प्रसारित करणारी यंत्रणा कार्यान्वित करणे यासारख्या दीर्घकालीन उपाययोजना
कराव्यात. जिल्ह्यामधील वीज कोसळून होणाऱ्या हानीबाबतचे केस स्टडी व प्रभावी उपाय
योजनांचे दस्तऐवजीकरण करावे व अहवाल राज्य शासनास सादर करावा.
वीज अपघाताबाबत काय करावे काय करू नये याबाबतची
माहिती विविध प्रसार माध्यमांचा वापर करून नागरिकांपर्यत पोहोचवावी. वीजप्रवण
क्षेत्रांमध्ये समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण आयोजित करून अशा
परिस्थितीमध्ये काय करावे काय करू नये याबाबतचे प्रशिक्षण द्यावे तसेच कोणी वीज
पडून जखमी झाल्यास प्रथम उपचार करण्याबाबतचे प्रशिक्षणही आयोजित करण्यात यावे. वीज
कोसळून होणारी जिवीत हानी नगण्य असेल हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर जिल्हा प्रशासनाने ठेवून
काम करावे.
प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी
कोल्हापूर
000000

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.