इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७


जोतिबा मंदीर परीसर विकास आराखडा : 25 कोटी मंजूर
माणगाव, शाहू जन्मस्थळ, पंचगंगा घाट, पन्हाळा विकासासही निधी
                 -पालकमंत्री चंद्रकांत पाटील
लाईट व साऊंड शो - दर्जेदार, आकर्षक  व्हावा : पालकमंत्री
कोल्हापूर दि.26 :  श्री क्षेत्र जोतिबा मंदीर, वाडी रत्नागिरी परीसर विकास आराखड्‌या अंतर्गत पहिल्या टप्यातील 25 कोटीच्या तर माणगाव परिसर विकास आराखड्‌यापैकी पहिल्या टप्यातील 2 कोटी, पंचगंगा घाट विकास आराखड्यास 4 कोटी 78 लाख, शाहू जन्मस्थळ विकास 2 कोटी 10 लाख, पन्हाळा लाईट व साऊंड शोसाठी 4 कोटी 50 लाख निधीस शासनाने मान्यता दिली असून ही पर्यटन विकासाची कामे वेळेत, दर्जेदार आणि देखणी करावीत, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
 पर्यटन विषयक जिल्हास्तरीय समितीची बैठक सर्कीट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, सदसय्‍ आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
 श्री  क्षेत्र जोतिबा मंदीर, वाडी रत्नागिरी परीसर विकासाचा 155 कोटीचा आराखडा शासनास सादर केला असून पहिल्या टप्यात 25 कोटीच्या आराखड्यास शासनाने मान्यता दिली आहे.  यामध्ये दर्शन मंडप, सेंट्रल प्लाझा, पार्किंग, टॉयलेट काँम्प्लेक्स, सांडपाणी आदी कामांचा समावेश असून ही कामे देवस्थान समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.  यामधील अंडर ग्राऊंड वायरिंग, भक्त निवास आदींचा 4.50 कोटींचा सुधारित प्रस्ताव तात्काळ सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.  माणगांव परिसर विकासाच्या 5 कोटीच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्यात  2 कोटीच्या निधीस शासनाने मान्यता दिली यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्यावर भाषणावर आधारित होलोग्राफिक शो तसेच तक्याची सुधारणा आदी कामे प्राधान्याने करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
राजर्षि छत्रपती शाहू महाराज जन्म स्थळ, लक्ष्मी विलास पॅलेस, कोल्हापूर वस्तुसंग्रहालय विकास आराखडा यावर सविस्तपणे चर्चा करण्यात आली. संग्रहालयाचा 13 कोटी 42 लाखाचा आराखडा तयार केला असून पहिल्या टप्यात 2 कोटी 10 लाखास मान्यता मिळाली आहे. ही कामे दर्जेदार आणि गुणात्मक, वेळेत करण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. या बैठकीत पंचगंगा घाट विकासाचा 26 कोटी 85 लाखाचा बृहत आराखडा तयार केला असून पहिल्या टप्यात 4 कोटी 78 लाख रुपयास शासनाने मान्यता दिली आहे, यामध्ये प्रवेशद्वार, रस्ता, बगिच्या, जुन्या घाटाचे संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन केंद्र आदी विकास कामांचा समावेश आहे.
 किल्ले पन्हाळागड येथे लाईट व साऊंड शोसाठी 4 कोटी 50 लाखाचा आराखडा मंजूर झाला असून यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.  पन्हाळ्यावर लाईट आणि साऊंड शो दर्जेदार आणि गुणात्मक काम करण्याबरोबरच संपूर्ण किल्ले पन्हाळागडाचा इंटीग्रेटेड प्लॅन तयार करुन एक मिशन पन्हाळ्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्याची सूचना याबैठकीत करण्यात आली. यावेळी मसाई पठार, काळम्मावाडी धरणावरील बगिचा विकास, राधानगरी, येवळणजुगाई मंदिर आदींच्या विकासाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. याबैठकीत बड्याचीवाडी येथील काळभैरव मंदिर परिसराचा विकास 7 लाख, पट्टणकोडोली येथील भक्तीनिवासासाठी 8 लाख, कलानंदीगड परिसर विकासासाठी 20 लाख, तळेमाऊली मंदिर विकासासाठी  40 लाख, किल्ले सामानगड विकासासाठी 10 लाखाच्या आराखड्यांना मंजूरी मिळाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
पर्यटन विकासांतर्गत कोल्हापूर जिल्हा अग्रेसर बनविण्यासाठी शासनामार्फत टप्या टप्याने पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून या निधीतून कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन विकासाची नव नवी कामे हाती घेतली जात आहेत. ही कामे वेळेत, दर्जेदार, देखणी करण्यावर सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक भर द्यावा, यासाठी निष्णात आणि नामांकित कंत्राटदाराकडून कामे करुन घ्यावीत, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.
भवानी मंडप, महालक्ष्मी मंदिर तसेच पन्हाळ्यावर लाईट व साऊंड शो - दर्जेदार, आकर्षक  व्हावा : पालकमंत्री
पर्यटन विकासांतर्गत भवानी मंडप, महालक्ष्मी मंदिर तसेच पन्हाळागडावर तयार करण्यात येणारा लाईट व साऊंड शो हा दर्जेदार, आकर्षक आणि देखणा करण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, अशी सूचनाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
या बैठकीत मान्यवर लोकप्रतिनिधींनीही आपापल्या सूचना केल्या. प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी स्वागत केले. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाची अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील, श्री. वेदपाठक, सामाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, सहायक नियोजन अधिकारी भुषण देशपांडे यांच्यासह मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पर्यटन समितीचे सदस्य आणि सर्व संबंधित विभांगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

                                                                  0 00 0 0 0 0

रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज व सजग मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया जिल्ह्यात 2450 मतदान केंद्रे तर 21 लाख 38 हजार मतदार






कोल्हापूर, दि.5 : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पारपडाव्यात यासाठी निवडणूक यंत्रणा व पोलीस यंत्रणा सज्ज आणि सतर्क असल्याने मतदारांनी कोणत्याही दबावाला आणि प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे,  असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कामकाजाचा राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार तसेच मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. राजेश देशमुख, निवडणूक निरीक्षक अजित पवार, नंदकुमार काटकर, तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते.                             
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची सर्व यंत्रणांनी जागृकपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन करुन सहारिया म्हणाले, मतदारांवर दबाव टाकणे तसेच प्रलोभन दाखविणाऱ्या प्रवृत्तीवर पोलीस दलाने आणि निवडणूक यंत्रणेने अंकुश ठेवावा. तसेच निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे.
निवडणूक यंत्रणेने निवडणूक कळात सर्वांना समान वागणूक देण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचना करुन राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया म्हणाले, आचारसंहितेचे कशाही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. आचारसंहिता कक्ष 24 तास कार्यरत ठेवावा, जिल्ह्यात येणारी खाजगी विमाने आणि हेलिकॅप्टर्स तसेच जिल्ह्यात येणाऱ्या रेल्वेंची तपासणी जिल्ह्याच्या एंट्री पॉइंटलाच करावी अशी सूचनाही त्यांनी केली. भरारी पथकाबरोबरच स्थीर सर्वेक्षण पथकेही आवश्यकतेनुसार वाढविण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.       
निवडणूक संबंधाने तसेच उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या अनुषंगाने सोशल मिडियावर असलेल्या जाहिराती व पोस्टबाबत आचारसंहिता कक्षाने तसेच सोशल मिडियासाठी नियुक्त केलेल्या जिल्हास्तरीय पथकाने दक्ष राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी सूचना करुन ज.स. सहारिया म्हणाले, सोशल मिडियासाठी नेमलेल्या पथकामध्ये सायबर सेल प्रतिनिधीचाही समावेश करावा.
श्री. सहारिया यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे महत्व विषद करुन सविस्तर मार्गदर्शन केले. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने  मतदार जागृतीचा प्रभावी कार्यक्रम हाती घेतला आहे.  जिल्ह्यात मतदारांना विविध माध्यमातून  जागृत करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्याने निवडणूक प्रक्रीया सुरळीत होण्यासाठी भरारी पथके, आचारसंहिता कक्ष, व्हिडीयो पथके, चेक पोस्ट इत्यादी प्रकारच्या उपाययोजना प्राधान्य क्रमाने कराव्यात. निवडणूक काळात होणाऱ्या मोठया  आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी बँकांची मदत घ्यावी. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती करुन त्याठिकाणी जास्तीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात असे सांगून उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर कटाक्षाने लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्याचे व नियमबाह्य बाबी दिसून आल्यास कठोर कारवाई करावी असेही आयुक्त श्री. सहारिया म्हणाले.
निवडणुकीमधील उमेदवारांनी दाखल केलेले शपथपत्र व त्यातील माहिती देणारे फ्लेक्स संबंधित मतदान  केंद्रावर 4x3 आकारात उभे करावेत अशी सूचना त्यांनी यावेळी केली. यंदा प्रथमच मतपत्रिकेतील मजकूराचा फाँट वाढविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना राज्यभर 40 स्टार प्रचार आणि इतरांना 20 स्टार प्रचारक आणण्याची मुभा देण्यात आल्याचेही श्री. सहारिया यांनी सांगितले. निवडूण आलेल्या उमेदवारांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र 6 महिन्यात सादर करणे बंधनकारक असून याबाबत जात पडताळणी प्रमाणपत्र समिती मार्फत यागोष्टी प्राधान्य क्रमाने व्हाव्यात, यासाठी विभागीय आयुक्तांना निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले.
2450 मतदान केंद्रे तर 21 लाख 38 हजार मतदार
जिल्ह्यात येत्या 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 2 हजार 450 मतदान केंद्रे निश्चित केली आहे. तर या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 21 लाख 38 हजार 80 इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी 16 हजार 260 मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 248 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती, आचारसंहिता आणि कायदा व सुव्यवस्था नियंत्रण कक्ष, 40 भरारी पथके, 39 स्थीर सर्वेक्षण पथके, 56 व्हीएसटी पथके आणि 14 व्हीव्हीटी पथके याबरोबरच पेड न्युज, जाहिरात प्रसारण, सोशल मिडिया तसेच खर्च तपासणी पथके कार्यरत केली असून वाहतूक आराखडा, साहित्य वितरण आराखडा तसेच मतदान जागृती कार्यक्रमावरही अधिक भर दिला असल्याचे  जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले. उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने 20 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ऑनलाईन नामनिर्देशनपत्रे भरण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरु आहे. 
यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व समित्यांचा तसेच पथकांच्या कामाचा राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी आढावा घेतला. या बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, आयकर विभागाचे सहायक आयुक्त महेश शिंगटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी इंद्रजित देशमुख, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे नोडल अधिकारी विवेक आगवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी.टी.पवार, विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. नांदिवडेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी गणेश देशपांडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा कोषागारे अधिकारी रमेश लिथडे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी शशिकांत किणिंगे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक श्री. भानप महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक श्री. आंधळे यांच्यासह सर्वसंबंधित विभागाचे अधिकारी, सर्व समित्या आणि पथकांचे प्रमुख अधिकारी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.
नामनिर्देशन प्रक्रियेची पाहणी
राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी करवीर तालुक्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुरु असलेल्या नामनिर्देशनपत्र भरण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. उमेदवार तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी निवडणूक प्रक्रियेविषयी चर्चा केली. 

000