इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६




छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन
राज्य शासनाची वाटचाल
                                           --  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
श्रीभुदरगड किल्ल्याच्या विकासासाठी 11 कोटीची योजना-- पालकमंत्री

कोल्हापूर दि. 27: छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविलेला मार्ग आणि प्रशासकीय नितीचा अवलंब करुन राज्य शासनाची वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिवप्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या श्रीरांगणाकड ते श्रीभूदरगड धारातीर्थ यात्रा मोहिमेचा सांगता समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गारगोटी येथे मौनी विद्यापीठाच्या मैदानात झाला. समारंभास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, संभाजीराव भिडे (गुरुजी) आदि मान्यवर उपस्थित होते.  
छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक होते, आदर्श राजे होते. त्यांनी जीवनभर सर्वसामान्य जनता डोळयासमोर ठेवून राज्यकारभार केला. सामान्य माणसामध्ये आपल्या कार्याने राष्ट्रतेज निर्माण करण्याचं महान कार्य केले. अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला बरोबर घेवून, उत्तम प्रशासन केले. त्यांनी त्याकाळी जलनियोजन, सागरी सुरक्षा नियोजन, सागरी किनारपट्टींचं संवर्धन आणि संरक्षण, जंगल नियोजन, सामान्यांचं हित अशा सर्व गोष्टींचे सुक्ष्म नियोजन करुन राज्यकारभार केला. राष्ट्रासमोर ज्यावेळी आव्हाने उभे राहतात त्यावेळी छत्रपतींचे कार्य, विचार आणि निती आदर्श मानून त्या आव्हानांचा सामना करण्याचा मार्ग मिळतो. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर राज्य शासनाची वाटचाल असल्याचेही ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणूस, शेतकरी संघटीत करुन त्यांना स्वराज्याचा मंत्र देवून त्यांच्यात राष्ट्रतेज जागृत केले. त्यातून स्वराज्य निर्मिती झाली. त्यांचा आदर्श डोळयासमोर ठेवून सर्वांनी वाटचाल करणे राष्ट्रहिताचे  असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सामाज्याला आपल्या नितीने आणि कतृत्वाने शह देवून स्वराज्य मिळविले. त्यांचा पुतळा गारगोटी येथे उभा करण्यासंदर्भात प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल.
            छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळयासमोर ठेवून तरुणांमध्ये शिस्त आणि राष्ट्रतेज जागृत करण्याचं काम शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे. तरुणांमध्ये देशाभिमान, धर्माभिमान निर्माण व्हावा, तसेच देश, धर्म संस्कृती विषयी अभिमानही निर्माण व्हावा या हेतूने शिवप्रतिष्ठानने हाती घेतलेले काम महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
श्रीभुदरगड किल्ल्याच्या विकासासाठी 11 कोटीची योजना-- पालकमंत्री
            याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाचा अभिमान असणारा तरुण निर्माण करण्याचा प्रयत्न शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असून धारातीर्थ यात्रा मोहिमेचा हाती घेतलेला उपक्रम महत्वाचा आहे. प्रतिष्ठानच्या या कार्याला राज्य शासन सहयोग देईल असेही ते म्हणाले.
            राज्यातील सर्व गड किल्ल्यांवर जीवंतपणा निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, श्रीभुदरगड किल्ल्याच्या विकासासाठी 11 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करुन ती पर्यटन मंत्रालयाला सादर केली आहे. ही योजना मार्गी लावण्याच्यादृष्टीने निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल. श्रीभुदरगड किल्ल्यावरील तलावाच्या सुशोभिकरणासाठी 44 लाखाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. गडावरील सर्व रस्त्यांची कामे प्राधान्यक्रमाने हाती घेतली जातील, असेही ते म्हणाले.
            संभाजीराव भिडे गुरुजी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, शिस्त आणि निती डोळयासमोर ठेवून काम होणे गरजेचे आहे. गावागावात तालमींची निर्मिती करुन कुस्तीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनामार्फत विशेष योजना हाती घ्यावी अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
            याप्रसंगी पुढील वर्षाच्या मोहिमेसाठी दौडीत ध्वज धरण्याचा मान मिळविणारे पंडीतराव कट्टीकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला. सुरुवातीला देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी आमदार बजरंग देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब बेडगे यांनी आभार मानले. समारंभास माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि शिवप्रेमी तरुण उपस्थित होते.
           

000000

बुधवार, ६ जानेवारी, २०१६

                                     
                                       
                                           पत्रकारितेत सामाजिक बांधिलकी महत्वाची

                                                                                    - डॉ. सुधीर गव्हाणे
                                             शिवाजी विद्यापीठात पत्रकार दिन संपन्न
     कोल्हापूर, दि. 6 : पत्रकारितेत विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी महत्वाची असल्याचे प्रतिपादन औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांनी आज येथे बोलतांना केले.
     पत्रकार दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन आणि वृत्तपत्र विद्या संवादशास्त्र विभाग, विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि ऐतवडे खुर्द येथील वारणा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डिजीटल मीडिया आणि प्रसारमाध्यमे विकास या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. समारंभाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर, माहिती अधिकारी एस. आर. माने आणि वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, डॉ. रत्नाकर पंडीत आणि वृत्तपत्रविद्या संवादशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि मास कम्युनिकेशन विभागाच्या समन्वयक डॉ. निशा पवार आदीजण उपस्थित होते.
     पत्रकारितेत ध्येय आणि निष्ठा महत्वाची बाब असल्याचे स्पष्ट करुन डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकारीतेशी तसेच सामाजिक बांधिलकीशी नातं जोडून पत्रकारांनी लेखन करणे काळाची गरज आहे. वृत्तपत्रांनी बातमी आणि जाहिरात यामध्ये संतुलन असणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे विचार आजच्या पिढीने आत्मसात करुन पत्रकारिता करावी, असेही ते म्हणाले.
     डिजीटल इंडिया हा नाविन्यपूर्ण आणि दिशादर्शक प्रकल्प असल्याचे स्पष्ट करुन डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, डिजीटल इंडियामुळे अद्ययावत तंत्रज्ञान, माहिती सर्वदुर पोहचण्यास मदत होणार असून या तंत्रज्ञानावर विद्यार्थ्यांची पत्रकारांची मांड असणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. या उपक्रमामुळे विकासाची नव-नवी दालने सामान्य माणसाला उपलब्ध होणार असून पारदर्शकतेसाठी डिजीटल इंडिया उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचेही ते म्हणाले. विकासात्मक पत्रकारितेसंदर्भातही त्यांनी सविस्तर विवेचन केले.
     या प्रसंगी समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर, डॉ. प्रताप पाटील, डॉ. रत्नाकर पंडीत, माहिती अधिकारी एस. आर. माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
      प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वृत्तपत्रविद्या संवादशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि मास कम्युनिकेशन विभागाच्या समन्वयक डॉ. निशा पवार यांनी स्वागत प्रस्ताविक केले. शेवटी डॉ. सुमेधा साळुंके यांनी आभार मानले. या कार्यक्रमास पत्रकार तसेच प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि पत्रकारितेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.
 0 0 0 0 0 0


शनिवार, २ जानेवारी, २०१६





जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत डिसेंबरअखेर 68 टक्के खर्च
उर्वरित निधी मार्चअखेर खर्च करावा 
                                    -- पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पीडब्ल्यूडीचे रस्ते 31 जानेवारीनंतर खड्डेमुक्त -- ना. पाटील

कोल्हापूर, दि. 2 :  यंदा जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या सर्वसाधारण, विशेष घटक योजना आणि ओ. टी. एस. पी. साठी 321 कोटी 76 लाखाच्या मंजूर नियतव्ययापैकी 218 कोटी 39 लाखाचा निधी वितरीत केला असून डिसेंबरअखेर 149 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. उर्वरित निधी येत्या मार्चअखेर सर्व कार्यान्वीत यंत्रणांनी करावा असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
जिल्हा नियोजन समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर, आमदार राजेश क्षीरसागर,आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार गायकवाड यांच्यासह समितीचे सन्माननीय सदस्य, सदस्या उपस्थित होते.
चालू आर्थिक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजना आराखड्यांतर्गत देण्यात आलेल्या निधीचा योग्य विनियोग त्या त्या योजनांवर वेळेतच करावा, अशी सूचना करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, डिसेंबरअखेर 68.24 टक्के इतका खर्च करण्यात आला आहे. यंदाच्या नाविण्यपूर्ण योजनेसाठी उप जिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे व्हेंटीलेटरसाठी 23 लाख 44 हजार, अंगणवाडीसाठी इलेक्ट्रानिक्स वजन काटे, कुपोषित आकलन प्रणालीसह मशीन खरेदीसाठी 40 लाख 42 हजार, भूम अभिलेख कार्यालयासाठी इलेक्ट्रानिक टोटल स्टेशन मशीन खरेदीसाठी 30 लाख आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई माध्यमिक, शैक्षणिक गुणवत्ता अभियानासाठी 5 लाखाच्या तरतुदीचा समावेश आहे.
जिल्हा वार्षिक योजना 2016-17 साठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि ओटीएसपीच्या 318 कोटी 81 लाखाच्या प्रस्तावित आराखड्याला या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 216 कोटी 19 लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 100 कोटी 81 लाख आणि ओटीएसपीसाठी 1 कोटी 81 लाखाच्या तरतुदीचा समावेश आहे. याशिवाय 93 कोटी 60 लाखाची प्रस्तावित अतिरिक्त तरतुदीच्या प्रस्तावासही यावेळी मान्यता देण्यात आली. यामध्ये कृषि विभागाकडील सुक्ष्मसिंचन योजना, पशुवैद्यकीय सेवांचा विस्तार बळकटीकरण, वनसंरक्षण संवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, ग्रामपंचायतींचे स्मशानशेड बांधकाम, लघुसिंचन, अपारंपारिक उर्जा विकास कार्यक्रम, उद्योगकता प्रशिक्षण बीज भांडवल, रस्ते आणि साकव विकास, यात्रा स्थळांचा विकास, प्राथमिक शाळांची विशेष दुरुस्ती कार्यक्रम, आय. टी. आयसाठी यंत्रसामुग्री आधुनिकीकरण, कौशल्य विकास कार्यक्रम, सार्वजनिक आरोग्य सुविधांचा विस्तार बळकटीकरण, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम, नगरोत्थान महाअभियान, अंगणवाड्या बांधकाम आणि नाविण्यपूर्ण योजनेसाठीही विशेष तरतूद करण्यात आल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
पीडब्ल्यूडीचे रस्ते 31 जानेवारीनंतर खड्डेमुक्त करणार-- पालकमंत्री
कोल्हापूर जिल्ह्यात रस्ते विकासाचा युनिक प्रोजेक्ट सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोल्हापूर जिल्ह्‌यातील कोणत्याही रस्त्यावर 31 जानेवारीनंतर एकही खड्डा राहणार नाही असा शासनाचा संकल्प असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते विकासासाठी मोठा निधी उपलब्ध होत असून, रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 31 जानेवारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर खड्डा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरकडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. याबरोबरच जिल्हा परिषदेकडील रस्ते दुरुस्तीच्या खर्चाचा सविस्तर प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांनी तात्काळ तयारकरुन द्यावा, त्यानुसार शासन स्तरावर अधिकाधीक निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
राज्य शासन 7 वर्षाचा समयबध्द कालावधी रस्ते विकासाचा सुमारे 4 हजार कोटीचा प्रस्तावित कार्यक्रम तयार करणार असून 2019 पर्यंत राज्यातील प्रत्येक गाव रस्त्याने जोडले जाईल, असे सांगून पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या प्रस्तावानुसार शासनाने प्राधान्यक्रम निश्चित केला असून, लोकप्रतिनिधींनी त्यांच्या तालुक्यामधील जिल्हा परिषदेचे कोणतेही रस्ते पी.डब्ल्यूडीकडे वर्ग करावयाचे आहेत. याची यादी तात्काळ द्यावी. राष्ट्रीय महामार्गामध्ये जे रस्ते समाविष्ट व्हावे असे वाटतात, अशा रस्त्यांची यादी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे द्यावी.
आगामी काळात टंचाईची वाढती तीव्रता लक्षात घेवून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात टंचाई संदर्भात विशेष बैठक घेतली जाईल, असे सांगून पालकमंत्री बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यासाठी 5 कोटी 18 लाखाचा टंचाई आराखडा तयार केला असून, टंचाई निवारणाच्या उपाययोजना अधिक गतिमान केल्या जातील. टंचाई निवारणाच्या कामास शासनाने प्राधान्य दिले असून, यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच जिल्हा योजना आराखड्यातील शिल्लक निधी पुनर्विनियोजनाद्वारे टंचाई कामासाठी वापरण्याची सूचनाही त्यांनी या बैठकीत केली.
कोरडे तलाव पाण्याने भरुन घेणार
जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती लक्षात घेता कोरडे पडलेले तलाव जवळच्या उपसासिंचन योजनेद्वारे भरुन घेण्याचा विशेष कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यासाठीचे बीज बील भरण्याबाबतही उपाययोजना कराव्यात असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत यंदा 20 गावांची निवड करण्याचे शासनाने सुचविले असून, या गावांची निवड लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानात अधिकाधीक लोकसहभाग घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
राज्य शासनाच्या कोल्हापूर टोलमुक्तीच्या निर्णयाबद्दल शासनाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमलताई पाटील यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी जिल्हा वार्षिक योजना आराखडा 2015-16 चा खातेनिहाय खर्चाचा आढावा घेण्यात आला. तसेच 2016-17 च्या प्रारुप आराखड्यासही  मान्यता देण्यात आली. प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी स्वागत करुन बैठकीसमोरील विषय विषद केले.

000000