कोल्हापूर, दि. 26 : राजर्षी छत्रपती शाहु
महाराजांनी आपल्या जीवनात सामान्य माणसासाठी अभुतपूर्व काम केले असून शाहूंचे हे कार्य
आणि विकास विषयक विचार नव्या पिढीस अनुकरणीय आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ
पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे केले.
राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज
यांच्या 143 व्या
जयंतीनिमित्त
येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा 'राजर्षी शाहू
पुरस्कार' यंदा ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना येथील
शाहू स्मारक भवनमध्ये आज श्रीमंत शाहू छत्रपती
महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री
चंद्रकांत पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर हसिना फरास, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.
देवानंद शिंदे, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार, डॉ.
अशोक चौसाळकर, सौ. वैशाली माशेलकर,
ट्रस्टचे सचिव व जिल्हा पुरवठा
अधिकारी विवेक आगवणे
आदि मान्यवर उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी
शिक्षण आणि भविष्य ओळखून 21 सप्टेंबर 1917 रोजी सक्तीच्या शिक्षणाचा हुकूमनामा जारी
केला. हा हुकूमनामा शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक असल्याचे स्पष्ट
करुन पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, शाहूंच्या या हुकूनाम्याला 21 सप्टेंरला
100 वर्ष पूर्ण होत असून हा दिवस सर्वांनी साजरा करणे आवश्यक आहे. शाहूंचे कार्य आणि
विचारांचा वारसा जोपासणे आवश्यक असून त्यांचे विचार 21 व्या शतकातही मोलाचे आणि प्रेरणादायी
असून शाहूंच्या कारर्कीदीवर आधारीत 'अखंड प्रेरणा शाहू विचाराची' हे पुस्तक लिहिले
जावे, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी
आर्थिक आणि सामाजिक विकासाचे बहुमोल काम केले असल्याचे सांगून पद्मविभुषण डॉ. रघुनाथ
माशेलकर म्हणाले, शाहू महाराजांनी शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग यांचा समन्वय साधून कारभार
केला. शिक्षण सक्तीचे करुन शिक्षणाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवली. योग्य
शिक्षण हे महत्वाचे असून आजच्या शिक्षण पध्दतीत बदल होणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
समता, न्याय, कला, क्रिडा, आरक्षण, शिक्षण, शेती, सहकार, जलसिंचन अशा विविध क्षेत्रात
राजर्षी शाहूंनी राबविलेली धोरणे आजही उपयुक्त आणि मार्गदर्शक असल्याचेही ते म्हणाले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या
कार्यामुळे देशात कोल्हापूरची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. त्याकाळी शाहूंनी राबविलेले कार्य व धोरण जगाच्या
पुढेच असून कोल्हापूरही जगाच्या पुढे आहे, हा संदेश नव्या पिढीला देणे गरजेचे आहे.
ध्येयवादी, समता प्रेमी, सामान्यांचा कैवारी अशा द्रष्ट्या लोकराजा शाहू महाराजांच्या
नावाने मिळालेला पुरस्कार आपल्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार असल्याचेही पद्मविभुषण
डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
शाहूंनी जीवनभर सामान्यांच्या सुखाचाच विचार केला-- पालकमंत्री
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत
पाटील यावेळी बोलताना म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जीवनभर सामान्य माणसाचा
विकास आणि सामान्य माणसाच्या सुखाचा आणि सन्मानाचाच विचार केला. सामाजिक समतेचा आणि
सार्वत्रिक शिक्षणचा विचारही त्यांनी प्रत्यक्षात राबविला. विधवा विवाह, आंतरजातीय
विवाह, आरक्षण अशी क्रांतीकारी पाऊले शाहूंनी आपल्या राज्यात त्यावेळी टाकली. अशा द्रष्ट्या
लोकराजाचे विचार आणि कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी
आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे
म्हणाले, शेतकऱ्याला स्वत:च्या पायावर उभ करण्याचं काम राजर्षी छत्रपती शाहूंनी त्याकाळी
केले. सामान्य माणसाच्या शेतीला पाणी मिळावे, शेतीचं उत्पादन वाढावे, शेती उत्पादनाला
बाजार पेठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी राबविलेले धोरण सर्वार्थाने महत्वाचे आहे.
राज्य शासनानेही राजर्षी शाहुंचा हाच विचार डोळ्यासमोर ठेवून राज्यातील शेतकऱ्यांसाठी
34 हजार कोटीची कर्जमाफी केली आहे. शाहूंनी जीवनभर सामान्यांचाच विचार केला, अशा या
दुरदृष्टी लोकराजाचे विचार आणि कार्य आदर्शावतच असल्याचे ते म्हणाले.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज याप्रसंगी
बोलताना म्हणाले, शिक्षणाने माणूस घडतो, याची प्रचीती डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या रुपाने
जगासमोर आली आहे. कष्ट आणि जिद्दीने शिक्षण घेवून डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी देशातच
नव्हे तर जगभरात लौकिक प्राप्त केला आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी देशाचे प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांनी डॉ. माशेलकर यांच्यावर सोपविलेली जबाबदारी ही सुध्दा देशवासीयांनसाठी
महत्वाची बाब आहे. संपूर्ण देशभर स्वच्छ भारत अभियान गतिमान झाले असून यापुढे शहरे
आणि महामार्गावरील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्नही या अभियानातून हाती घेणे गरजेचे
असल्याचेही ते म्हणाले.
प्रारंभी ट्रस्टचे अध्यक्ष तथा
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार
यांनी स्वागत
व प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात
त्यांनी राजर्षी शाहूंच्या विचाराने दैदीप्यमान व उतुंग
कार्य करणाऱ्या व्यक्तीला राजर्षी शाहू पुरस्कार प्रत्येक वर्षी देण्यात येत
असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रस्टच्या माध्यमातून
सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे काम होत असल्याचे ते म्हणाले. शाहीर आझाद नायकवडे यांच्या शाहू गौरव गीताने सुरुवात
झालेल्या या सोहळ्यात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी पाहुण्यांचा
परिचय करुन दिला. सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी मानपत्राचे वाचन
केले. शेवटी विश्वस्त डॉ. अशोक चौसाळकर यांनी आभार प्रदर्शन केले.
या समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी
संजय शिंदे, प्रांताधिकारी संगीता चौगुले यांच्यासह
अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी आणि
शाहूप्रेमी नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
000000