कोल्हापूर,दि.
28 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील ग्रामसमिती, प्रभागसमिती, लोकप्रतिनिधी,
प्रशासन या सर्वांनी मिळून कोरोनावर चांगले नियंत्रण ठेवले आहे. त्याबाबत पुढील
काळातील नियोजन आणि त्याबाबतची योग्य तयारीही ठेवली आहे. तासाभरात अहवाल मिळणाऱ्या
ॲन्टीजेन टेस्ट सुरू करून संस्थात्मक अलगीकरणावर अधिक भर द्यावा, अशी सूचना
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केली.
येथील शासकीय विश्रामगृहातील छत्रपती राजर्षी शाहू
सभागृहात आज कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा
बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन
मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय
मंडलीक, आमदार पी.एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील, आमदार
ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, महापौर निलोफर आजरेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक
डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ
कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख
उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी संगणकीय
सादरीकरण करून जिल्ह्यातील कोरोनाबाबतची सद्यस्थिती, उपाययोजना आणि भविष्यातील
तयारी याबाबत माहिती दिली. रूग्णांच्या डिस्चार्जबाबत राज्यामध्ये कोल्हापूर जिल्हा
अग्रेसर असल्याचे सांगून एकूण 814 पैकी ग्रामीण भागात 728, शहरी भागात 73, इतर जिल्ह्यामधील
13 असल्याचे आणि मृत्युदर अवघा 1 टक्का असल्याचे सांगितले. पीपीई कीट, एन 95
मास्क, सर्जीकल मास्क, ग्लोव्हज आदीचा साठा पुरेशा प्रमाणात असल्याचेही ते
म्हणाले.
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके
यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे तसेच पोलीस अधिक्षक डॉ. देशमुख यांनी कोल्हापूर
जिल्ह्याचे संगणकीय सादरीकरण करून कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती दिली.
गृहमंत्री श्री. देशमुख यावेळी म्हणाले
जिल्ह्यामध्ये 3 मे पर्यंत 14 रूग्ण संख्या होती. जिल्ह्याच्या सीमा उघडल्यानंतर
त्यामध्ये वाढ झाली. जिल्ह्यातील 38 हजार परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात
पाठविण्यात आले आहे. हे मजूर आता पुन्हा जिल्ह्यामध्ये परत येणार आहेत. त्यामुळे
जिल्ह्यावर मोठा ताण असणार आहे. या श्रमिकांचे दक्षता घ्यावी लागणार आहे. संस्थात्मक
अलगीकरण वाढवून त्यावर अधिक भर द्या. त्याचबरोबर अवघ्या तासाभरात अहवाल मिळणाऱ्या
ॲन्टीजेन टेस्ट घ्यायला सुरूवात करा.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाबत चांगले
नियंत्रण आणि योग्य नियोजन करण्यात आले आहे. प्लाझ्मा थेरेपीचा चांगला वापर करण्यात
आला आहे. पल्स ऑक्सीमीटरवर भर दिला आहे. या सर्वामुळे जिल्ह्यातील संक्रमण फार कमी
आहे. रेमडेझीवीअर या औषधांची खरेदी करून साठा ठेवावा. कोरोनाचे संक्रमण वाढू देऊ
नका त्याबाबत दक्षता घ्या, असेही ते म्हणाले.
लवकरच 8 हजार पोलीस भरतीला गती देणार
असल्याचे सांगून गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले, मागणीप्रमाणे गृहरक्षक दल पुरविण्यात
आले असून यापुढेही देण्याची तयारी आहे. चंदगड
तालुक्यात नव्याने पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबत प्रस्ताव पाठवा. सद्याची दुकानांच्या
5 वाजेपर्यंत असणाऱ्या वेळेत वाढ करण्याबाबत जिल्ह्यातील तीनही मंत्री आणि
जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
आमदार राजेश पाटील यांनी चंदगड तालुक्यात
पोलीस ठाणे देण्याबाबत तसेच पोलीसांची संख्या वाढविण्याबाबत मागणी केली. आमदार
प्रकाश आबीटकर यांनी जिल्ह्यामध्ये पुणे, मुंबई सारखे सक्त नियम न लावता थोडी शिथिलता
असायला हवी, अशी मागणी केली. आमदार ऋतुराज पाटील यांनी दुकानाची वेळ 2 तासांनी
वाढविण्याबाबत तसेच पोलीस आयुक्तालय होण्याबाबत मागणी केली. आमदार चंद्रकांत जाधव आणि
आमदार पी.एन.पाटील यांनीही यावेळी जिल्ह्यात येणाऱ्यांचे स्वॅब घेण्याबाबत
सांगितले. अतिरिक्त पोलीस तिरूपती काकडे यांनी यावेळी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
योगेश साळे, प्रभारी अधिष्ठाता आरती घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त
पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार शीतल
मुळे-भामरे उपस्थित होते.
सोबत : फोटो जोडला आहे.
0 0 0 0 0 0