इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ७ ऑगस्ट, २०१७

तलाठी सजे व सर्कल कार्यालये अद्ययावत करणार - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील




कोल्हापूर, दि. 7 : ग्रामीण भागातील जनतेचा त्रास कमी व्हावा, वेळ व खर्चात बचत व्हावी, सातबारासाठी चावडीत हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी ऑनलाईन सातबारा संगणकीकरण करण्यात आला आहे. सध्या राज्यात 12 हजार तलाठी असून आणखी 4 हजार तलाठी सजे व 500 सर्कल नव्याने वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे तलाठी कार्यालयांमधून अधिक चांगली सेवा ग्रामीण भागातील जनतेला मिळेल, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्हा नियोजन समितीकडील सन 2015-16 च्या निधीमधून बांधण्यात आलेल्या भुदरगड तालुक्यातील गंगापूर येथील चावडी इमारतीचे उद्घाटन व ऑनलाईन सातबारा अज्ञावलीचा उद्घाटन समारंभ  महसूलमंत्री  आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, पंचायत समितीच्या सभापती सरिता वरंडेकर, जिल्हा परिषद सदस्या रेश्मा देसाई, पंचायत समिती सदस्य संग्रामसिंह देसाई, कार्यकारी अभियंता एन.एम. वेदपाठक, उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, गोकुळचे संचालक बाबा देसाई, सरपंच संगीता केणे, प्रविण सावंत, नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द असून नव्याने तलाठी सजे व  सर्कल वाढविण्याच्या निर्णयाने शेतकरी व ग्रामीण जनता यांना चांगली सुविधा निर्माण होणार आहे. अनेक ठिकाणी तलाठी कार्यालये नाहीत, त्यामुळे 16 हजार अद्यायावत तलाठी कार्यालये बांधण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. गंगापूर येथे नव्याने उभारण्यात आलेली चावडीची इमारत अत्यंत प्रशस्त असून यातून लोकांना गुणवत्तापूर्ण सुविधा ‍मिळाली.
सरकार जनतेच्या प्रती असणारे आपले कर्तव्य बजावत असतेच पण गावातील लोकांनीही शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावेत. ठिबक सिंचन पध्दती, कोल्ड स्टोरेजमधील मालावर तारण कर्ज योजना यासारख्या अनेक योजनांचा लाभ घेऊन आपले उत्पादन दुप्पट करावे. शेतीत वेगवेगळे प्रयोग करुन आपली श्रीमंती आपणच वाढविली पाहिजे. त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.
आमदार आबिटकर यांनी राधानगरी, भुदरगड, आजरा या आपल्या मतदार संघातील अनेक तलाठी कार्यालयांना इमारती नाहीत. ती मिळावीत. सातबारा संगणकीकरणात देवस्थान जमिनीबाबतच्या नोंदी व्हाव्यात, तसेच चाळण उडालेल्या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी संपत खिलारे यांनी केले. आभार तहसिलदार अमर वाकडे यांनी मानले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते संगणकीय सातबाराचे वितरण करण्यात आले. तसेच पीओएस मशीनव्दारे धान्य वितरण, शिधापत्रिका वितरण, स्मार्ट मतदान ओळखपत्र याचे वितरण करण्यात आले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.