कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): भारतीय टपाल विभागातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील 'ढाई आखर' पत्र लेखन स्पर्धेत कोल्हापूर डाक विभागातील पत्राची राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकासाठी 'उत्कृष्ट पत्र' म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर डाक विभागाचे अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी दिली.
विजन फॉर इंडिया 2047 या विषयांतर्गत भारतीय टपाल विभागातर्फे 'ढाई आखर' पत्र लेखन स्पर्धेचे जुलै 2022 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 18 वर्षाखालील व 18 वर्षावरील असे 'आंतरदेशीय पत्र' 500 शब्द मर्यादा आणि ए-4 साईज कागद 1 हजार शब्द मर्यादा असे दोन गट करण्यात आले होते. स्पर्धेत राज्य स्तरावर प्रथम क्रमांक 25 हजार रुपये, व्दितीय क्रमांक 10 हजार रुपये व तृतीय क्रमांक 5 हजार रुपये तसेच राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक 50 हजार रुपये, व्दितीय क्रमांक 25 हजार रुपये व तृतीय क्रमांक 10 हजार रुपये व प्रमाणपत्र असे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पूर्ण देशपातळीवर लाखो स्पर्धक सहभागी झाले हेाते.
स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून राज्य पातळीवर कोल्हापूर डाक विभागास प्रथम क्रमांकाची दोन बक्षीसे तर व्दितीय क्रमांकाचे एक बक्षीस प्राप्त झाले. तसेच राष्ट्रीय स्तरावर 'आंतरदेशीय पत्र' गटात कोल्हापूर डाक विभागामधील न्यू कॉलेजची विद्यार्थिनी कु. पुजा अरविंद पवार हिच्या पत्राची राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकासाठी उत्कृष्ट पत्र म्हणून निवड करण्यात आली.
प्रथम क्रमांक विजेती पुजा पवार हिला कोल्हापूर डाक विभागाचे अधीक्षक अर्जुन इंगळे यांच्या हस्ते 50 हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अधीक्षक डाकघर, कोल्हापूर येथे पार पडला असून कार्यक्रमास न्यू कॉलेजचे हिंदी विभाग प्रमुख अविनाश पाटील, बालकल्याण संकुलच्या अधिक्षीका नजीरा नदाफ, डाक निरीक्षक नीलकंठ मंडल व सर्व डाकघर कर्मचारी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.