कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती
कार्यालय): खरीप हंगाम 2020 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान
शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी/कर्मचारी आणि
कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांच्या शास्त्रज्ञ या सर्वांच्या समन्वयाने
दिनांक 1 ते 7 जुलै 2020 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक गावात कृषी संजिवनी
सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गावांमध्ये गावबैठका, शिवार भेटी, शेतीशाळा या
माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहात
प्रामुख्याने शेतकऱ्यांसोबत गावात कृषी विषयक राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना
भेटी, कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच नाविन्यपूर्ण, प्रयोगशील व उल्लेखनीय काम
करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार व त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे.
कृषी विषयक मोफत
सल्ला व मार्गदर्शनकरीता एम. किमास पोर्टलवर शेतकरी नोंदणी, शेतकरी मासिकाचे
वर्गणीदार वाढविणे, विविध पीक स्पर्धा आणि पुरस्कारांबाबत प्रचार-प्रसिध्दी,
आधुनिक तंत्रज्ञानासंबंधी म्हणी व घोषवाक्ये, सादरीकरणासह तांत्रिक मार्गदर्शन,
पीक उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करणे, प्रधानमंत्री पिक विमा योजना,
हवामान, आधारित फळ पीक विमा योजना आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना,
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, जमीन आरोग्य पत्रिका वितरण, वाचन आणि मार्गदर्शन, बीजप्रक्रिया
प्रात्यक्षिक, बियाणे, उगवण व क्षमता चाचणी प्रात्यक्षिक, कडधान्य आंतरपिक, बहुपीक
पध्दती, हायड्रोफोनिक्स-हिरवा चारा निर्मिती, विविध केंद्र व राज्य शासन पुरस्कृत
कृषी व कृषी संलग्न विभागांच्या योजना, भात, सोयाबीन, मका, ऊस पिकांवरील कडी व रोग
व्यवस्थापन मार्गदर्शन आहे.
तसेच श्री, चारसुत्री,
एस. आर. टी. पध्दतीने भात लागवड, बी-बियाणे, खते, औषधे खरेदी व वापर करताना
घ्यावयाची काळजी, फळबाग लागवड कार्यक्रम, मूलस्थानी जलसंधारण, आपत्कालीन पीक
नियोजन इत्यादी विषयांवर स्थानिक परिस्थितीनुसार तांत्रिक मार्गदर्शन होणार आहे.
गावांमध्ये
दिनांक 1 ते 7 जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहात शेतकऱ्यांनी सहभागी होवून
तांत्रिक मार्गदर्शन घ्यावे. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ
कृषी अधिकारी/ तालुका कृषी अधिकारी/ उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क
साधावा. तसेच सप्ताहात सहभागी होणारे शेतकरी, अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना
विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे,
असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.