गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

माध्यमांमधील विविध प्रवाह एकमेकांना पूरक - आलोक जत्राटकर




            कोल्हापूर, दि. 16 :    स्वयंनियमन, गुणवत्तापूर्ण पत्रकारिता आणि विश्वासार्हता ही आजच्या काळात माध्यमांची फार मोठी गरज आहे. काल सुसंगतता टिकवत ज्या माध्यमांनी नवं तंत्रज्ञानाचा झपाट्याने स्वीकार केला अशीच माध्यमे काळाच्या ओघात टिकून आहेत. माध्यमामध्ये एकीकडे स्पर्धा वाढत असली तरी मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक व सामाजिक हे माध्यम प्रवाह एकमेकांना परस्पर पुरक ठरत आहेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी केले.
            राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे 'माध्यमासमोरील आव्हाने'  या विषयावरील कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती उपसंचालक सतीश लळीत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, सहायक संचालक एस.आर.माने, विश्वास पाटील, गुरुबाळ माळी, समीर मुजावर, विजय कुंभार यांच्या अन्य मान्यवर उपस्थित होते.
            वाढत्या गतीमानतेशी जुळवून घेण्याबरोबरच गुणवत्ता, वैशिष्ट्यपूर्ण, मुल्याधिष्ठीत आशय जपणे हे आज प्रत्येक माध्यमासमोरील आव्हान असल्याचे सांगून आलोक जत्राटकर म्हणाले, प्रत्येक व्यवस्थापनासमोर बदल हा अपरिहार्य झाला आहे. सध्याच्या काळत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा पगडा वाढत असला तरी मुद्रीत माध्यमांचे महत्व अबाधित आहे. प्रत्येक टप्यावर आलेल्या आव्हानांना समर्थपणे तोंड देत मुद्रीत माध्यमे टप्याटप्याने वाढतच गेली आहेत. ज्या वर्तमानपत्रांचे जनमानसात स्थान टिकून आहे त्यामध्ये नव तंत्रज्ञानाची स्वीकारार्हता हा भाग अत्यंत महत्वाचा ठरला आहे. सध्याच्या काळात साखळी वर्तमान पत्रे मोठ्या संख्येने वाढत आहेत त्याचा फायदा वाचक, जाहिरातदार या साऱ्यांच होत आहे. पण त्याचवेळी गुणवत्तापूर्ण वार्तामुल्यासाठी उत्तम विश्लेषण क्षमता असणाऱ्या माध्यमांची नितांत गरज निर्माण झाली आहे.  शब्दमर्यादांमुळे व्यक्त होण्यांवरही मर्यादा येत आहेत. अनेक प्रकारची कामे हाताळू शकणाऱ्या मनुष्यबळाची माध्यम जगताला गरज असून सोशल मिडिया हे फार मोठे व्यासपीठ म्हणून उदयाला येत आहे. यातून माहितीचा प्रस्फोट होत असतानाच अत्यंत संवेदनशील असणारे हे माध्यम कसे हाताळावे याबाबतचे ज्ञान देणे आवश्यक आहे.
            गतीमानता हा आजच्या जीवनाचा स्थायीभाव असला तरी माणसाच्या जीवनाची सुरुवात आणि शेवट हा माध्यमांच्या गराड्यातच होणे ही माध्यमांची ताकद असल्याचे सांगून माहिती उपसंचालक सतीश लळीत म्हणाले, सशक्त लोकशाहीसाठी समर्थ माध्यमांचे महत्व फार मोठे आहे. वृत्तपत्रांची आर्थिक उतरंड सध्याच्या काळात महत्वाची ठरत असून अशावेळी लहान, जिल्हा वर्तमान पत्रांना टिकून राहण्यासाठी आधार देणे हे शासनाबरोबरच वाचकाचे कर्तव्य आहे. माध्यमे ही सरकारला दिशा देण्याचे, लोकमत अधोरेखित करण्याचे महत्वाचे काम करीत असतात त्यामुळे चांगल्या लोकशाहीसाठी वर्तमानपत्राचे अस्तित्व महत्वाचे आहे.
            इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या तुलनेत मुद्रीत माध्यमांनी आपली विश्वासहर्याता मोठ्या प्रमाणात जपली आहे, असे सांगून सतीश लळीत म्हणाले सध्याचा सोशल मिडिया हा मोठ्या चर्चेचा विषय आहे. या माध्यमाने गांभिर्य आणि विश्वासार्हता जपली नाही तर ते फार मोठी झेप घेवू शकणार नाही. अत्यंत चांगले व्यासपीठ असूनही अनेकदा निष्काळजीपणे हाताळल्याने अनेक गंभीर प्रसंग निर्माण होवू शकतात.
            कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले. सूत्रसंचालन सहायक संचालक एस.आर.माने यांनी केले.

         000000

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७

गरिबी दूर करण्यासाठी विविध घटकांनी एकत्र यावे - पालकमंत्री चंद्रकांत पाटील



कोल्हापूर, दि. 11 : समाजातील दुर्बल घटक सक्षम होवून गरिबी दूर व्हावी यासाठी विविधस्तरातील  घटकांनी निरपेक्ष भावनेने एकत्र येवून प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य, गरीब कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी कोल्हापूर शहरानजिक मोठी निवासी वसाहत लवकरच उभी करण्यासाठी प्रयत्नशिल असून या प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून सी.ए. शरद सामंत या निष्कलंक, चारित्र्यवान व्यक्तीमत्वाने काम पहावे, अशी इच्छा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
दि महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट या विश्वस्थ संस्थेच्या सामंत परिवार समाज सेवा निधीतर्फे सी.ए. शरद सामंत शैक्षणिक पुरस्कारांचे सुमारे 40 दिव्यांग, मतिमंद, अनाथ, ग्रामीण विद्यार्थी, विद्यार्थींनीना 2 लाखांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू इन्सिटट्यूट (सायबर) चे अध्यक्ष डॉ. रणजितसिंह शिंदे होते. यावेळी संस्थेचे नुतन अध्यक्ष सी.ए. गिरीष सामंत, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, अरुण नरके, बाळ पाटणकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सी.ए. शरद सामंत हे निष्कलंक आणि चारित्र्यवान व्यक्तीमत्व असून त्यांच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सामाजातल्या दुर्बल घटकांना मदत करण्याचे  शरद सामंत यांचे काम आदर्शवत आहे. समाजातल्या विविधस्तरातील घटकांनी गरिबी दूर करण्यासाठी निरपेक्ष भावनेने एकत्र येणे व त्यासाठी टार्गेट ओरिएंटेड काम करणे आवश्यक आहे. कोल्हापूर शहराच्या जवळपास सर्व सामान्य माणसाला स्वत:चे हक्काचे घर उपलब्ध व्हावे यासाठी मोठी निवासी वसाहत उभी करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असून त्यामध्ये शरद सामंत यांनी अध्यक्ष म्हणून काम करावे अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. दि महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट या संस्थेच्या इमारतीसाठी जागेचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शरद सामंत यांचा सपत्नीक सत्कार झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रणजितसिंह शिंदे यांनी शरद सामंत यांचे मार्गदर्शन सदैव महत्वाचे असल्याचे सांगून त्यांच्या प्रदिर्घ सामाजिक कार्याचा गौरव केला.
शरद सामंत यांनी सामाजिक संस्थांमध्ये वर्षानुवर्षे कार्यरत ज्येष्ठांनी स्वत: बाजूला होवून तरुण, उत्साही कार्य करणाऱ्यांचा मार्ग मोकळा करुन देणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी त्यानी संस्थेच्या इमारतीसाठी 35 लाख  रुपयांची तरतुद करण्यात आल्याचे सांगून आपल्या 66 व्या वाढदिवसानिमित्त मातृ संस्थेस 66 हजारांची देणगी दिली.
यावेळी चेतना विकास संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सी.ए. गिरीष सामंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. चेतना संगीत शास्त्र विभागासाठी 40 हजार रुपयाचा निधी देण्यात आला तर हेल्पर्स ऑफ दि हँडीकॅप्ड संस्थेचे 10, अवनी संस्थेचे 5, सायबरचे 6, बाल संकुलातील 10 यांच्यासह अत्यंत दुर्बल घटकातील विद्यार्थी, विद्यार्थींना शैक्षणिक प्राविण्य व गुणवत्ता यासाठी प्रोत्सहानात्मक पुरस्कार देण्यात आले. यावेळी कोल्हापूर शहरातील सामाजिक क्षेत्रातील विविध नामवंत उपस्थित होते.

000000

अद्ययावत क्रीडा संकुल लवकरच सुरु होणार - पालकमंत्री चंद्रकांत पाटील


·         शुटींग रेंज साहित्य लवकरच उपलब्ध होणार
·         जलतरण तलावाचा प्रश्नही मार्गी लागणार

 कोल्हापूर, दि. 11 : शुटींग रेंज व जलतरण तलाव वगळता अन्य क्रीडा प्रकारांची क्रीडांगणे तयार आहेत त्यांच्या वापरासाठी विविध क्रीडा संस्थांशी समन्वय साधून ती खेळाडूंना वापरण्यास द्यावीत.  त्यामुळे तेथे खेळाडूंचा वावर वाढून क्रीडांगणांचा वापर सुरु होईल, असे सांगून खेळाडूंसाठी विभागीय क्रीडा संकुलाच्या रुपाने अद्ययावत क्रीडा संकुल लवकरच सुरु होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
विभागीय क्रीडा संकुल समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी        डॉ. कुणाल खेमणार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील, क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले, केएसडीआयचे सुजय पित्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रीडा क्षेत्रात अधिक गुंतवणूक केल्यास अनेक गुणवंत खेळाडू उदयास येतील व ते राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीयस्तरावर गौरवशील कामगिरी करतील असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे उभारण्यात आलेल्या विभागीय क्रीडा संकुलातील शुटींग रेंज व जलतरण तलाव वगळता सर्व क्रीडांगणांची कामे पूर्ण झाली आहेत त्यांच्या वापर होणे आवश्यक असून त्यासाठी क्रीडा संस्थांमार्फत या क्रीडागणांचा वापर खेळाडूंसाठी व्हावा. जस जशी या ठिकाणी खेळाडूंची संख्या वाढेल तसे काही त्रुटी समोर आल्यास त्या त्रुटीही दुर करणे सोईचे होईल, असे सांगितले.
तसेच कोल्हापूर स्पोर्टस डेव्हलपेंट इनिशिएटीव्ह (केएसडीआय) या संस्थेने जलतरण तलावातील पाण्याचा निचरा करुन तज्ञांकडून मत घ्यावे व हा प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करुन सादर करावा. त्यावर शासकीय समितीने त्यांच्या निर्णय घ्यावा व तद्नंतरच जलतरण तलावाचे पुढील काम करावे असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खेळाडूंसाठी अडथळा ठरत असल्यास रनिंग ट्रॅकवर फिरण्यास बंदी घालावी, असेही सांगितले. महानगरपालिकेने दुधाळी शुटींग रेंजचा प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, 10 मीटर शुटींग रेंज लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्यक असून यासाठी शुटींग साहित्य खरेदीबाबत नियुक्त केलेल्या तंज्ञसमितीतील तेजस्वीन सावंत, राही सरनोबत, युवराज साळुंखे, अजित पाटील यांच्यामध्ये एकमत करुन त्यानुसार साहित्य खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात येईल व एकल पध्दतीने खरेदी होणार असल्याने तो प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल यासाठी पुढच्या आठ दिवसात विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे तज्ञ समितीची बैठक घेण्यात येईल.  25 व 50 मीटर शुटींग रेंजचेही सर्व स्ट्रक्चर तयार असून या रेंजचाही वापर होऊ शकतो तशी मागणीही आहे. त्यामुळे या शुटींग रेंजसाठीही साहित्य खरेदीचे प्रस्ताव मार्गी लावण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्य प्रवेशद्वार व स्वच्छता गृह, कंत्राटी पध्दतीने कर्मचारी नियुक्ती, पहिल्या टप्यातील निविदेतील अपूर्ण कामे आदींचा सविस्तर आढावा घेवून ही सर्व कामे 1 डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच पहिल्या टप्याच्या निविदाबाह्य परंतु अत्यावश्यक कामांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.
याबैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी शिंगणापूर येथील राजर्षी शाहू क्रीडा प्रशालेसाठी आवश्यक असणाऱ्या मल्टी पर्पज हॉलसाठी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली.

0 0  0 0 0 0 0 0

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

45 वी कोल्हापूर परिक्षेत्रिय पोलीस क्रीडा स्पर्धा महिलांमध्ये कोल्हापूर तर पुरुषांमध्ये सांगलीला सर्वसाधरण विजेतेपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पारितोषिक देवून खेळाडूंचा गौरव





कोल्हापूर, दि. 10 : 45 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा कोल्हापूर येथे  उत्साहात पार पडली या स्पर्धेत पुरुष गटामध्ये सांगली जिल्ह्याला तर महिला गटामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला सर्वसाधारण विजेते पदाचा मान मिळाला. या स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील संतोष विजय माळी तर कोल्हापूर जिल्ह्यातील जयश्री शिवशंकर बोरगी हे बेस्ट ॲथलेट ठरले. सोलापूर शहरच्या संघाने शिस्तबध्द संघाचा मान मिळविला. ॲथलॅटीक्स चँम्पियनशिपचा मान पुरुष गटात  सांगली जिल्ह्याने तर महिला गटात कोल्हापूर जिल्ह्याने मिळविला. या सर्वांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
यावेळी विविध विभागांतर्गत कार्यरत कर्मचारी क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करतील तर अशा खेळाडूंनी अंतरराष्ट्रीयस्तरावर कांस्यपदकापर्यंतची कामगिरी केल्यास त्यांना वर्ग एक व राष्ट्रीयस्तरावरील क्रिडास्पर्धांमध्ये कांस्यपदकापर्यंतची कामगिरी केल्यास वर्ग दोनची नियुक्ती कोणत्याही लोकसेवा अथवा राज्य सेवा परीक्षांशिवाय मिळावी यासाठी निश्चितपणे प्रयत्न करु असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
 45 व्या कोल्हापूर परिक्षेत्रिय पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप समारंभ कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील पोलीस क्रीडांगणावर झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, महापौर हसिना फरास, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अपर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, रुस्तम ए हिंद अमल बुचडे, अविनाश धस यांची प्रमुख उपस्थिती होती.

अत्यंत उत्साहत व शिस्तबध्द झालेल्या या क्रीडा स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन कोल्हापूर परिक्षेत्रातील खेळाडूंनी राज्यस्तरावरील जनरल चॅंम्पियनशिप जिंकून राष्ट्रीयस्तरावरही उज्वल कामगिरी करावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच कोल्हापूर जिल्ह्याने उत्कृष्टपणे यजमानपद सांभाळल्याबद्दल पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांचे अभिनंदनही केले. 

रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७

गेल्या तीन वर्षात पोलीस दल अधिक सक्षम आणि अद्ययावत करण्यावर भर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील





       कोल्हापूर, दि. 5 : राज्याचे पोलीस दल अधिक सक्षम आणि अद्ययावत करण्याबरोबरच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासही राज्य शासनाने गेल्या तीन वर्षात सर्वाधिक भर दिला असल्याचे महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले.
          स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या मेळाव्याचे उदघाटन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती हे उपस्थित होते. या समारंभास स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अभयकुमार साळुंखे, असोसिएशनचे राज्य अध्यक्ष निवृत्त पोलीस उप महासंचालक डी.एन.जाधव, कार्याध्यक्ष तथा निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक खंडेराव शिंदे, असोसिएशनचे अन्य पदाधिकारी रामराव वाघ, गुलाबराव पोळ, पी.टी.लोहार, सिताराम न्यायनिर्गुने, सुखानंद सापते आदी मान्यवर उपस्थित होते.
          पोलीस हा समाज व्यवस्थेतील महत्वाचा घटक असल्याचे सांगून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पोलीस दलासाठी आवश्यक पायभुत सेवा सुविधा आणि साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्याबरोबरच पोलीसांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यास मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य दिले आहे. कोल्हापूर पोलीस वसाहतीतील पोलीसांच्या घरांच्या दुरुस्तीसाठी गेल्या वर्षी 10 कोटीचा निधी मंजूर करुन ही घरे अद्ययावत करण्यात आली आहेत. तसेच पोलीसांच्या मुला-मुलींसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र कार्यान्वित केले आहे.
          निवृत्त पेालीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांच्या सोडवणुकीसाठी लवकरच असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची मा. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेवून निश्चितपणे मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. निवृत्त पोलीसांचे घर आणि आरोग्याचा प्रश्न महत्वचा असून निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा ही योजना राबविण्याबाबत काय उपाययोजना करता येतील याबाबत पाठपुरावा करु असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
          पोलीस दलासाठी शासन सदैव कटिबध्द आहे मात्र पोलीस दलानेही आपल्या कार्यकर्तुत्वाने आाणि अपुलकीच्या वागणुकीने समाजात वेगळी प्रतिष्ठा निर्माण करण्याची गरज असल्याचेही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
          खासदार संभाजीराजे छत्रपती याप्रंसगी बोलताना म्हणाले, निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्नांच्या सोडविणुकीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करु. कोल्हापुरातील शिवाजी पुलाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी युध्दापातळीवर प्रयत्न सुरु असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
       असोसिएशनचे राज्य अध्यक्ष निवृत्त पोलीस उप महासंचालक डी.एन.जाधव म्हणाले, पोलीसांनी आपल्या चांगल्या वागण्यातून नवी संस्कृती निर्माण करणे गरज आहे. समाजात पोलीसा विषयी आदर आणि अपुलकी निर्माण होईल यादृष्टीने वाचन, लेखन यासह चांगल्या वागण्याची सवय जोपासावी असे आवाहन केले. निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि प्रश्न सनदशिल मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न राहील.
          प्रारंभी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मदन चव्हाण यांनी स्वागत केले. महासचिव सुखानंद सापने यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सिताराम न्यायनिर्गुने, सचिन कुंभार आदींचे भाषणे झाली. शेवटी श्री. पांढरे यांनी आभार मानले. समारंभास निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

0 00 0 0 0 0 0

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

शेतकऱ्यांच्या आर्थिक संपन्नतेसाठी गटशेती प्रकल्प उपयुक्त - कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा कृषि तंत्रज्ञान महोत्सव आणि कृषि प्रदर्शनास सुरुवात




कोल्हापूर, दि. 12 : दिवसेंदिवस कमी होत चाललेले शेतीचे क्षेत्र विचारात घेता, यापुढील काळात गटशेती प्रकल्पाद्वारे शेती करुन शेतकऱ्यांनी आर्थिक संपन्नता साधावी, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी केले.
 शासनाचा कृषी विभाग आणि कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि महाविद्यालयात आयोजित केलेल्या कृषि तंत्रज्ञान महोत्सवाचे आणि कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होत. समारंभास जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. किरण कोकाटे, संचालक (संशोधन) डॉ. शरद गडाख, कृषि सहसंचालक महावीर जंगटे आदि मान्यवर उपस्थित होते.
गटशेतीसाठी किमान 20 शेतकऱ्यांनी एकत्र येवून 100 एकरावर गटशेतीच्या प्रकल्प हाती घेतल्यास शासनाकडून अनुदानही उपलब्ध होत असल्याने हा प्रयोग शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चितपणे आर्थिक स्थैर्य निर्माण करु शकतो असा विश्वास व्यक्त करुन डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले, कृषी विद्यापीठाने शेतीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिवर्तनासाठी कृषि संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित केले असून या तंत्रज्ञानाचा आणि नव नव्या बियाणांच्या वानाचा शेतकऱ्यांनी विनियोग करुन शेती क्षेत्रात प्रगती साधावी.
 राज्यातील शेतकऱ्यापर्यंत कृषी विद्यापीठाचे संशोधन आणि तंत्रज्ञान पोहचवून शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी कृषी क्षेत्रातील सर्वानीच प्रयत्न करावेत, असे आवाहन करुन कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले, महाराष्ट्रात कृषी क्षेत्रावर सर्वाधिक भर दिला असून कृषी तंत्रज्ञानाद्वारे लाभदायी शेती करण्याबरोबरच एकात्मिक पीक पध्दतीचाही शेतकऱ्यांनी अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच शेतीबरोबर पशुपालन, कुक्कुटपालन, फलोत्पादन, फळप्रक्रिया असे शेतीपुरक व्यवसाय करुन आर्थिक संपन्नता साधावी.  तसेच कृषी व्यवस्थापनाचाही अवलंब करावा. यापुढील काळात आवश्यकतेनुसार पीक पध्दतीत सुधारणा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच कृषी पदवीधारकांनी यापुढे गावात राहून गावाच्या विकासाची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. राळेगणसिध्दी व हिवरे बाजार प्रमाणेच राज्यातील अन्य गावे विकसित करण्यास कृषी पदवीधारकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले
राहुरी कृषी विद्यापीठाने कृषी संशोधनात लौकिक निर्माण केल्याचे सांगून कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले, कृषी विद्यापीठाने 257 विविध पिकांचे वान विकसित केले असून 3000 हून अधिक कृषी तंत्रज्ञान विकसित केले आहे. कृषी विद्यापीठाचे संशोधन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे, यासाठी कृषी तंत्रज्ञान महोत्सव आयोजित  केल्याचे ते म्हणाले. कृषी विद्यापीठांतर्गत ‍विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियान राबविण्याबरोबरच किमान 5 झाडे लावून कृषी परिसर वृक्षाच्छादीत करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी गटशेती उपयुक्त असून कृषि विद्यपीठाने विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याकामी कृषी विभागाने आणि  कृषी पदवीधारकांनी सक्रिय योगदान देणे गरजेचे आहे. ऊसावरील हुमनी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून 35 लाखाचा निधी देवून कोल्हापूर येथे हुमनी किड नियंत्रण प्रयोग शाळा विकसित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.  कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध वानांचा शेतकऱ्यांनी लाभ घेवून अधिकाधिक शेती उत्पन्न काढावे तसेच बाजार पेठांचा कल विचारात घेवून पीक पध्दतीत सुधारणा करणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
 कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख म्हणाले, कृषी विद्यापीठाने विकसित केलेले संशोधन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन केले असून या महोत्वाचा आणि कृषी प्रदर्शनाचा कोल्हापूर तसेच नजिकच्या जिल्हयातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, या महोत्सवानिमित्त्‍ या परिसरात विविध पिकांच्या 45 वानांच्या प्रात्याशिकांचा अनुभव शेतकऱ्यांना घेता येईल. यामध्ये बियाणांचे वान, विविध खते, औजारे आदींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी विद्यापीठाचे (विस्तार शिक्षण) संचालक डॉ. किरण कोकाटे म्हणाले, शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी विद्यापीठाने‍  विकसित केलेले संशोधन, तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. हवामानातील बदल, तमपान वाढ, अनियमित पाऊस या साऱ्यांवर मात करण्यासाठी शेतकरी प्रथम हा उपक्रम हाती घेतला असून शाश्वत शेतीच्या दृष्टीने हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 या प्रसंगी कृषी सहसंचालक महावीर जंगटे यांनी मनोगत व्यक्त केले. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी.जी.खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रा. तरडे यांनी आभार मानले. या समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषी अधिकारी सुरेश मगदुम, शेतीनिष्ठ शेतकरी संजीव माने यांच्यासह अनेक मान्यवर, कृषी संशोधक, कृषी तंत्रज्ञ, कृषी अधिकारी, शेतकरी, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हुमनी किड नियंत्रण प्रयोग शाळेचे शुभारंभ
ऊसावरील हुमनी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून 35 लाखाचा निधी देवून विकसित केलेल्या हुमनी किड नियंत्रण प्रयोग शाळेचा शुभारंभ कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांच्याहस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होत. समारंभास जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. किरण कोकाटे, संचालक (संशोधन) डॉ. शरद गडाख, कृषि सहसंचालक महावीर जंगटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी आदिजण उपस्थित होते.
कृषी प्रदर्शनास मान्यवरांची भेट
 यावेळी विविध पीकांच्या वानाचे शेती प्रात्यक्षिकांनाही मान्यवरानी भेट देवून या प्लॉटची पाहणी केली. कृषी महाविद्यालय परिसरात आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचे उदघाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये 15 हून अधिक ऊस जातीचे वान, विविध प्रकारच्या बियाणाचे वान, ट्रॅक्टर, टिलर, रोट वेटर, यांत्रिक औजारे, पिकांचे मुल्य वर्धन तंत्रज्ञान, औषधे, किटक नाशके, ब्रुशी नाशके, जैविक खते विविध प्रकारच्या ज्युस तसेच कृषी विद्यापीठाने विकसित  केलेल्या तंत्रज्ञानावर आधारीत प्रात्यक्षिके, कृषी औजारे मांडण्यात आली होती. या प्रदर्शनास शेतकरी आणि नागरीकानी भेट देवून माहिती घेतली.

0 0 0 0 0 0 0

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

पर्यटन विकासासाठी नियोजन समितीतून भरीव निधी श्री अंबाबाई विकासाचा 68 कोटीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्यात -जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार पर्यटन पर्व : पर्यटन जागृती व मार्गदर्शन शिबिर संपन्न




        कोल्हापूर, दि. 9 : कोल्हापुरच्या पर्यटन विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमधुन भरीव निधी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले जात आहे.  श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील 68 कोटीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी  दिली.
            महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, कोल्हापूर हॉटल मालक संघ व कोल्हापूर डिस्ट्रीक्ट कार ऑपरेटर्स असोसिएशनच्यावतीने पर्यटन पर्व कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर पर्यटन जागृती व मार्गदर्शन शिबिराचे उदघाटन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. येथील हॉटेल पॅवेलीयनच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त भुगोल विभाग प्रमुख डॉ. शहाजीराव देशमुख, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाचे कोल्हापूर विभाग अधिकारी दिपक हर्णे, पर्यटन सल्लागार वासिम सरकवास, कोल्हापूर हॉटल मालक संघाचे सचिव सिध्दार्थ लाटकर,  कार ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब गयावळ आदिजण उपस्थित होते.
            कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या समितीतून चालना देण्यात आली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासाची अनेक कामे हाती घेतली आहेत. याबरोबरच श्री अंबाबाई मंदिरावर साडेचार कोटी रुपये खर्चुन आकर्षित विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखड्यांतर्गत 25 कोटींना मान्यता मिळाली असून  श्री अंबाबाई विकास आराखड्यातून 68 कोटीचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे. याबरोबरच पन्हाळा येथे लाईट व साऊंड शो, शाहू जन्मस्थळाचा विकास, ऐतिहासिक माणगाव परिषद विकास आराखडा अशा अनेक पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासाच्या कामांना प्राधान्य दिल्याचेही त्यांनी सांगितले.
            पर्यटन क्षेत्रात कोल्हापुरचे नाव देशाबरोबरच जगाच्या नकाशावर यावे, देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे कोल्हापूर आकर्षण ठरावे, यासाठी कोल्हापूरचा आगामी 100 वर्षाच्या पर्यटन विकासाचे नियोजन करुन काम करणे आवश्यक असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, कोल्हापुरच्या पर्यटन विकासासाठी पायाभुत सुविधा निर्माण होणे गरजेचे असून यासाठी कोल्हापुरच्या जनतेने सक्रिय सहकार्य आणि मदत करण्यात पुढाकार घेणे आवश्यक आहे. यामध्ये कोल्हापूर-नागपूर चौपदरीकरण रस्ता, सातारा-कागल सहापदरी रस्ता, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे, कोल्हापुरची विमान सेवा असे अनेक प्रकल्प मार्गी लावणे गरजेचे असून यासाठी स्थानिकांनी पर्यटन विकासासाठी प्रसंगी त्याग करावा लागला तरी तो करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
            कोल्हापुरला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला असून पर्यटन क्षेत्रात कोल्हापुरची वेगळी ओळख निर्माण होत आहे. कोल्हापुरला पर्यटनाच्या दृष्टीने मोठी संधी असून या क्षेत्रात रोजगाराच्या संधी असल्याने या क्षेत्रात होणारी गुंतवणूक ही पर्यटन विकासाला चालना देणारीच ठरणार असल्याचे मत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले देशातील तसेच परदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कार ऑपरेटर्ससह पर्यटन क्षेत्रातील सर्वांनीच कोल्हापूरात येणाऱ्या पर्यटकाच्या प्रती आस्था पूर्वक वागणूक पर्यटकांचे आपले पाहुणे समजून आदरातीर्थ करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
            शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त भुगोल विभाग प्रमुख डॉ. शहाजीराव देशमुख म्हणाले, कोल्हापूर पर्यटन समृध्द जिल्हा असून येथील पर्यटन स्थळांची इतंभुत माहिती बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना योग्य पध्दतीने मिळणे गरजेचे आहे. पर्यटकांसाठी निवास व दळणवळणाची सुविधा महत्वाची असून याकामी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. पर्यटन विकासासाठी जोतिबा-पन्हाळा स्काय लिफ्टने जोडण्या बरोबरच विशालगड येथे आकाश पाळणा, गगनगड येथे पुष्प पठार आणि मसाई पठार येथे इको गार्डन अशा अनेकविध बाबी हाती घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
             पर्यटन सल्लागार वासिम सरकवास म्हणाले, कोल्हापुरला भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांना पाहुणे म्हणून वागणूक देण्यात कार ऑपरेटर्सनी पुढाकार घ्यावा. कोल्हापुरच्या पर्यटन स्थळाची माहिती आणि महती येथील ऐतिहासिक, सांस्कृतिक, खाद्य संस्कृती अशा सर्वच बाबींची माहिती आदरपूर्वक द्यावी. कार ऑपरेटर्स हे कोल्हापुरच्या पर्यटनाचे ब्रँड अँबॅसिटर असून पर्यटकांना आदरातीथ्याची अनुभूती मिळेल यादृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत आवाहनही त्यानी केले.
            प्रारंभी   कार ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब गयावळ यांनी स्वागत केले, कोल्हापूर हॉटल मालक संघाचे सचिव सिध्दार्थ लाटकर यांनी प्रस्ताविक केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाचे कोल्हापूर विभाग अधिकारी दिपक हर्णे यांनी पर्यटन पर्व उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.  याप्रसंगी अमरजा निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समारंभास हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष उमेश राऊत, पथीक प्रतिष्ठानच्या अरुणा देशपांडे, पल्लवी कोरगावकर, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे,  अरुण चोपदार यांच्यासह अनेक मान्यवर आणि हॉटेल मालक संघ व कार ऑपरेटस असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन समीर देशपांडे यांनी केले.

0 0 0 0 0 0 

बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

स्वच्छ भारत मिशनमधील कोल्हापूर जिल्ह्याच्या कामगिरीबद्दल अभिमान -पालकमंत्री चंद्रकात पाटील


                     कोल्हापूर दि. 27 : देश स्वच्छ रहावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षापूर्वी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. यामध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्यांना गुणांकनाच्या आधारे राष्ट्रीय स्तरावरील पारीतोषिके देऊन गौरविण्यात येत आहे. यामध्ये यावर्षी कोल्हापूर जिल्ह्याने नेत्रदिपक कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. जिल्ह्याचे हे यश अत्यंत अभिमानास्पद व आनंददायी आहे. अशा भावना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.
                      2 ऑक्टोबर,2017 या महात्मा गांधी जयंती निमित्ताने केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता दर्पण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणा-या कामांवर आधारित याचे गुणांकन केले गेले असून यामध्ये कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आहे. 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छता दर्पण पुरस्काराने कोल्हापूरसह  महाराष्ट्रातील 5 तर देशातील 47 जिल्ह्यांना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
                      पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हा प्रथम स्थानी आहे. यामध्ये जिल्ह्यातील नागरिक आणि प्रशासन यांचा महत्वाचा वाटा आहे. स्वच्छता या विषयामध्ये कोल्हापूर राष्ट्रीय पातळीवर सातत्याने अधोरेखीत होत आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या लोगो निर्मितीच्या स्पर्धेतही कोल्हापूरचे सुपूत्र अनंत खासबागदार यांनी निर्माण केलेला महात्मा गांधीजींचा चष्मा असणारा लोगो स्वच्छ भारत अभियानाचा लोगो म्हणून निवडला गेला आणि आता तर त्याला नोटेवरही स्थान मिळाल्याने तो प्रत्येकाच्या हातात गेला आहे. या जिल्ह्यात प्रचंड कल्पकता आणि समर्पण आहे. नकारात्मकता बाजूला ठेवून करवीर निवासीनी अंबाबाईच्या या जिल्ह्यात सर्वांनी मिळून एकत्र येवून कार्य केल्यास जिल्हा सर्वार्थाने प्रथम क्रामांकावर राहील. दरडोई उत्पन्नामध्ये देशात चंदीगड अग्रेसर आहे. कोल्हापूर गेली पाच वर्ष सातत्याने दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वानी मिळून एकत्र येवून काम केल्यास आपण प्रथम क्रमांकावर येवू शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

00000

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम



                     कोल्हापूर दि. 26 : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे उल्लेखणीय काम झाले असून             स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आला आहे. येत्या 2 ऑक्टेाबर रोजी  राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमात स्वच्छता दर्पण पुरस्काराने कोल्हापूर जिल्हयास गौरविले जाणार आहे.
                          2 ऑक्टोबर,2017 या महात्मा गांधी जयंती निमित्ताने केंद्र शासनाच्या पेयजल  व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता दर्पण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणा-या कामांवर आधारित याचे गुणांकन केले गेले असून यामध्ये कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आहे.              
                          स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार जिल्हयाला 90 % इतके गुण मिळाले आहेत.दि.25 सप्टेंबर,2017 रोजी पर्यंत झालेल्या कामगिरीवर हे गुणांकन ठरले आहे. केंद्र शासनाकडून या स्पर्धेसाठी कामगिरी, शाश्वत्ता आणि पारदर्शकता या तीन घटकांवर आधारित जिल्हयांचे गुणांकन केले आहे. कोल्हापूर जिल्हयाला कामगिरीमध्ये 50 पैकी 50 गुण मिळाले आहेत तसेच शाश्वत्ता या घटकासाठी 25 पैकी 15 गुण मिळाले आहेत तसेच पारदर्शकतेसाठी 25 पैकी 25 गुण मिळाले आहेत.
                          स्वच्छता दर्पण पुरस्कारासाठी पुणे विभागातील कोल्हापूर,सांगली व सातारा हे तीन ही जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत.या उत्कृष्ट काम केलेल्या जिल्हयांचा 2 ऑक्टेाबर,2017 रोजी राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमावेळी गौरव केला जाणार आहे.
                          कोल्हापूर जिल्हा प्रथम स्थानावर येण्यासाठी जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छता विभाग, तालुकास्तर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रा.पं),गटसंसाधन केंद्रातील कर्मचारी, आणि ग्राम पंचायत स्तरावर ग्रामसेवक आणि ग्राम पंचायत कर्मचा-यांनी मेहनत घेतली. या कामगिरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचे मार्गदर्शन लाभले. तर काम वेळेत पुर्ण करून घेण्यासाठी उपमुख्य  कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, व या विभागातील तज्ञ व सल्लागार यांनी विशेष परिश्रम घेतले.

000000

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

मंदिरावरील रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरेल - पालकमंत्री चंद्रकांत पाटील






                कोल्हापूर, दि. 21 : सर्व धार्मिक स्थळांचा विकास करुन पर्यटन विकासासाठी शासन प्रयत्नशिल आहे. करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरास केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसरातील वातावरणाची प्रसन्नता वाढून पर्यटकांचा ओघ वाढेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
            श्री करवीर निवासनी अंबाबाई मंदिरास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्‍यवस्थापन समिती व जिल्हा नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमनातून करण्यात आलेल्या अर्किटेक्चरल इल्युमिनेशन कामाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. यावेळी महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदिप नरके, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्ष वैशाली क्षिरसागर, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासासाठी 78 कोटी रुपयांचा विकासा आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्यात आहे. यामध्ये दर्शन मंडप, भक्त निवास पार्किंग, सुरक्षा आदी सुविधा देण्यात येणार आहेत. मंदिरावर करण्यात आलेल्या आकर्षक रोषणाईमुळे मंदिर परिसरातील वातावरणाची प्रसन्नता अधिक वाढणार असून देवीला ज्या रंगाची साडी नेसवली जाईल त्याच रंगाची रोषणाई राहणार आहे. पर्यटक व भाविकांसाठी हे चांगले आकर्षण ठरणार असून त्यामुळे भाविकांचा ओघही वाढेल असे विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
            श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून भाविकांना अधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. देवस्थान समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवावेत. परिसरात सदैव स्वच्छता रहावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            खासदार धनंजय महाडिक यांनी अलिकडच्या काळात मंदिरातील वातावरण अधिकाधिक समाधानकारक होत असल्याने भाविक व पर्यटक समाधानी होत आहेत. त्यामुळे देश विदेशातील पर्यटकांचा व भाविकांचा     ओघही वाढणार आहे, असे सांगून सुवर्ण पालखीसाठी सर्वस्तरातील भाविकांनी दान दिल्याने 8 कोटी रुपयांची सुवर्ण पालखी तयार झाल्याचेही यावेळी ते म्हणाले.
            देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मंदिरातील पाच शिखरे व सर्व कमाने या ठिकाणी एलईडी झळकणार असून त्यासाठी सुमारे 2 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यातील 50 टक्के रक्कम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात आल्याचे सांगून शारदीय नवरात्र उत्सव अत्यंत उत्साहात, शांततेत व नेटकेपणाने पार पाडण्यात येईल, असे सांगितले. नवरात्र उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दररोज रात्री 9.30 वाजता पालखीची मिरवणूक निघेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            या कार्यक्रमात आकर्षक रोषणाई बद्दल बजाज इलेक्ट्रीकल्स लि.चे अधिकारी व कर्मचारी व सुवर्ण पालखीबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, भाविक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

 0 0 0 0 0 0 0 0

राजर्षी शाहूंचे निर्णय आजही राज्याला दिशादर्शक - पालकमंत्री चंद्रकांत पाटील




कोल्हापूर, दि. 21 :  राजर्षी शाहू महाराजांनी अत्यंत क्रांतीकारक असा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 100 वर्षांपूर्वी केला. त्यांचे सर्व निर्णय आजही कल्याणकारी राज्यांसाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
            राजर्षी शाहू शिक्षण क्रांतीदिन 2017 शताब्दी समारंभ विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे. यामध्ये राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टद्वारे प्रकाशित व डॉ. जयसिंगराव पवार संपादित राजर्षी शाहू छत्रपतींचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा या पुस्तिकेचे प्रकाशन शाहू स्मारक भवन येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार होते.  यावेळी महापौर हसिना फरास, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, शिवाजी विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. अशोक चौसाळकर, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे सचिव व जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोणताही कायदा कसा डिझायिन करावा याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कायदे होत. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याच्या समाधानकारक अंमलबजावणीपर्यंत आपण आजही पोहोचू शकलो नाही. पण राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला होता. केवळ कायदे करुनच चालत नाही तर त्याच्या यशस्वीतेसाठी वाटचालीतील अडथळे दुर करण्यासाठीही त्यांनी उपाय योजना केल्या होत्या. अशा द्रष्ट्या राजाचे आपण वारस आहोत हे अत्यंत अभिमानास्पद आहे. असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आजही केरळ सारखे एखादेच राज्य 100 टक्के साक्षर आहे. महाराष्ट्रात एकूण बजेटच्या 30 टक्के म्हणजे जवळपास 47 हजार कोटी रुपये शिक्षणावर खर्च करुनही आपण 100 टक्के साक्षर होऊ शकलो नाही. याबाबतचे या निमित्ताने चिंतन होणेही आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
            डॉ. जयसिंगराव पवार यांनी विद्येचा महिमा पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगणारे महापुरुष म्हणजे महात्मा फुले होय तर शिक्षणाची मक्तेदारी मोडून काढून शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही हे सांगून बहुजनांचे उध्दार करणारे दुसरे महात्मा म्हणजे राजर्षी शाहू महाराज असे सांगून ते म्हणाले, शिक्षण हे सुसंस्कृत राष्ट्राच्या गरजा भागवते या विचारातून 97 टक्के जनसमुदायासाठी राजर्षी शाहूनी शिक्षणाची दारे खुली केली. 1917 ला संस्थांनचे उत्पन्न 15 लाख रुपये होते त्यावेळी प्राथमिक शिक्षणासाठी 1 लाख रुपये खर्च केला. त्यामुळेच 1922 पर्यंत 22 हजार विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत होते. 1922 ला महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी 3 लाख रुपये खर्च केले होते. राजर्षी शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रात्र शाळा चालू केल्या. त्यांनी केलेला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा हा माणसाला मनुष्यत्व प्रदान करणारा कायदा आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
            यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली तसेच अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये जनतेने हिरहिरीने सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
            जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी राजर्षी शाहू महाराजांची शिक्षणाबद्दलची सकारात्मक जाण व त्याद्वारे समाजातील सर्व घटकांमध्ये एकोपा निर्माण करण्याचे पर्यत्न हे अद्वितीय होते असे सांगून शिक्षणातून जनकल्याणाचा हेतु साध्य करण्यासाठी शिक्षणाच्या गुणवत्तेवर अधिक भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी सर्व शाळा व ग्रामपंचायतींमध्ये राजर्षी शाहूंचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा या पुस्तिकेचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगून प्रशासन व जनसहभाग यांच्याद्वारे राजर्षी शाहूंचे कार्य आणि विचार लोकांपर्यंत अधिक व्यापक पध्दतीने पोहोचविण्यासाठी वर्षभर असे कार्यक्रम सुरु राहतील असे सांगितले.
            महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी महपालिकेतर्फे सुरु करण्यात आलेल्या राजर्षी शाहू शिष्यवृत्ती व अन्य उपक्रमांबद्दल माहिती दिली.
            यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. आभार विवेक आगवणे यांनी मानले. सुत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले.


0000000

नवऊर्जा उत्सवातून जनतेस ऊर्जा मिळेल जिल्ह्यातील जनतेने लाभ घ्यावा -पालकमंत्री चंद्रकांत पाटील





नवऊर्जा उत्सवाचा शानदार शुभारंभ: भाविक व पर्यटकांना धार्मिक व सांस्कृतिक पर्वणी

          कोल्हापूर दि. 21 :- नवऊर्जा उत्सवातून कोल्हापूरवासियांना निश्चितपणे सकारात्मक ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन या नवऊर्जा उत्सवास जिल्ह्यातील जनतेने भेट घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्राचे महसूल तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले.
            कै. भालचंद्र चिक्कोडे ग्रंथालयाच्यावतीने येथील निर्माण चौकामध्ये नऊ दिवसांसाठी आयोजित केलेल्या नवऊर्जा उत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, महापौर हसिना फरास, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधिक्षक संजय मोहिते, प्रसिध्द कलादिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई, सौ. अंजली चंद्रकांत पाटील, दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाई, संदिप देसाई यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
            नवऊर्जा उत्सवामध्ये अतिभव्य अशा एकाच छताखाली कोल्हापुरातील नवदुर्गासह एकूण 13 देवतांचे एकत्रित दर्शन नागरिकांना होणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या नवऊर्जा उत्सवाचे खास वैशिष्टे म्हणजे, श्री अंबाबाईचा मळवट भरलेल्या चेहऱ्याचे आकर्षक आणि भव्य प्रवेशव्दार, मोठमोठ्या हत्तींच्या मूर्ती, प्रवेशव्दारावर भव्य मंगलकलश, दीपमाळा आणि प्राचीन मंदिराच्या भव्य भिंत्ती हे आकर्षण आहे. नवऊर्जा उत्सवांतर्गत एकाच छताखाली कोल्हापुरच्या नवदुर्गासह त्र्यंबोली, कात्यायनी, तुळजाभवानी आणि श्री अंबाबाईचे अनोखे दर्शन होणार आहे. यापैकी पाच देवतांच्या मुर्तीचे दर्शन हायड्रोलिक तंत्राने केले जात आहे, हे सर्वांर्थाने खास आकर्षण आहे. याबरोबरच आदिशक्ती श्री अंबाबाईचे महात्म्य सांगणारे बॅले नृत्य आणि 32 हजार चौरस फुटांचा भव्य सेट तसेच मान्यवर सेलेब्रिटींच्या उपस्थितीत होणाऱ्या या उत्सवास कोल्हापूर जिल्ह्यासह नजीकच्या जिल्हयातील जनतेने तसेच पर्यटकांनी भेट देऊन नवदुर्गा दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले..
            नवऊर्जा उत्सवानिमित्त उद्योग, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखणीय योगदान दिलेल्या 27 कर्तुत्ववान महिलांचा सन्मान केला जाणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, दररोज तीन महिलांचा या उत्सवामध्ये सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असून नवऊर्जा उत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी सुवर्णपदक विजेती नेमबाज पट्टू अनुष्का रविंद्र पाटील, स्वयंसिध्दा संस्थेच्या सौम्या तिरोडकर आणि प्रसिध्द उद्योजिका ग्यानी बठेजा यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नवऊर्जा उत्सवाची संकल्पना आणि मांडणी-उभारणी करणारे प्रसिध्द कलादिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई यांचा सत्कारही पालकमंत्री चंद्रकांत पाटील हातातील घडयाळ तर सौ. अंजली पाटील यांनी गळयातील चेन देऊन केला. पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन श्री. देसाई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
            प्रसिध्द कलादिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाले की, श्री अंबाबाई देवीची सेवा करण्याची संधी नवऊर्जा उत्सवानिमित्त मला मिळाली असून कोल्हापुरकरांनी दिलेली ही सेवीची संधी आणि भेट आयुष्यभर जतन करु.
            याप्रसंगी सुप्रसिध्द गायिका श्रावणी रविंद्र यांनी सरस्वती स्तवन गाऊन श्री अंबाबाईच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. तसेच टीव्हीवरील नावाजलेल्या काही मालिकामधील टायटल शाँग गाऊन प्रेक्षकाकडून दाद मिळविली. गायिका श्रावणी रविंद्र यांचा सत्कार सौ. अंजली चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
            प्रारंभी कै. भालचंद्र चिक्कोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिक्कोडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात नवऊर्जा उत्सवाची संकल्पना विषद केली. या नवऊर्जा उत्सवाचा जिल्हयातील तसेच नजीकच्या जिल्हयातील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या समारंभास माजी आमदार बजरंग देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, नगरसेवक सत्यजीत कदम, नगरसेवक किरण नकाते, आनंत खासबागदार यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बी न्युजचे संपादक चारुदत्त जोशी यांनी केले.

0000000

राजर्षी शाहू शिक्षण क्रांतीदिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरी व चित्ररथाने शहर दुमदुमले राजर्षी शाहूंच्या पुतळ्यास पालकमंत्र्यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन रॅलीची सुरुवात








        कोल्हापूर, दि. 21 : 21 सप्टेंबर या राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिनानिमित्त आज शहरातून शालेय मुला मुलींची प्रभात फेरी आणि विविध शाळांनी काढलेल्या सजीव चित्ररथांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. सामाजिक परिवर्तनासाठी केवळ शिक्षण ! समाज सुधारक राजा शाहू महाराज! शिक्षण कार्य हेच महान कार्य! शिकलेला माणूस कधीही कमजोर नसतो अशा विविध घोषवाक्यांनी, हालगी आणि लेझिम पथक, झांज पथक, पोलीस बँडने सारा परिसर दुमदुमून गेला.
            राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने 21 सप्टेंबर या राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिनानिमित्त काढण्यात आलेल्या चित्ररथ व प्रभात फेरीचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याहस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दसरा चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, डॉ. जयसिंगराव पवार, अशोक चौसाळकर, शिवाजी विद्यापीठाचे सह कुलसचिव विलास नांदवडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, निवासी उप जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
            21 सप्टेंबर 2017 रोजी राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिनास 100 वर्षपूर्ण होत असून यानिमित्त राजर्षी शाहूंचे कार्य आणि विचार जनतेपर्यंत पोहोचावे म्हणून राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट व शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 21 ते 23 सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आज या कार्यक्रमास विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने आणि चित्ररथ रॅलीने सुरुवात करण्यात आली.    
            दसरा चौकातून सुरु झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीस, चित्ररथ रॅलीत जिल्ह्यातील विविध शाळा, हायस्कुलमधील विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शालेय मुलींनी सादर केलेल्या लेझिम खेळांने उपस्थितांच्या नजरा खिळवून ठेवल्या. पोलीस बँड हे या रॅलीतील मुख्य आकर्षण होते. शालेय झांज पथकाने परिसर दुमदुमून टाकला. ही प्रभात फेरी व चित्ररथ रॅली आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महापालिका, सीपीआर हॉस्पिटल मार्गे जावून या रॅलीचा शाहू स्मारक भवन येथे समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये शालेय मुला मुलींची राजर्षी शाहू महाराज यांनी सक्तीच्या व मोफत शिक्षणासाठी केलेल्या कायद्यास 100 वर्ष होत असून त्या निमित्त शिक्षणाचे महत्व आणि राजर्षी शाहूंचे शिक्षणाचा कायदा या अनुषंगाने विविध घोषवाक्याचे फलक हे एक वेगळे आकर्षण होते.
            राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिनानिमित्त दसरा चौक येथून निघालेल्या प्रभात फेरी व चित्ररथ रॅलीमध्ये शहर व जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी, विद्यार्थींनी आणि मान्यवरांचा सहभाग लक्षणीय होता. आजच्या प्रभात फेरी व चित्ररथ रॅलीमध्ये प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांचे सजीव चित्ररथ सहभागी झाले होते. यामध्ये वि.स.खांडेकर  प्रशालेने शाहू महाराजांचे शिक्षण‍ विचार, मुस्लिम हायस्कुलने शाहू महाराजांचे शिक्षण, प्रायव्हेट हायस्कुलच्या चित्ररथामध्ये शिक्षणाचे सार्वत्रिकरण, राजाराम हायस्कुलच्या चित्ररथामध्ये शाहूंचे जन्मस्थळ, महाराष्ट्र हायस्कुलने लेक वाचवा, देश वाचवा चित्ररथ, उषा राजे हायस्कुलने लोक शिक्षण गरजेचे, साई हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजने प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे, स.म. लोहिया हायस्कुलने शाहू महाराजांच्या कार्यावर आधारी चित्ररथ, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कुलने कुस्ती तसेच देशभुषण हायस्कुलने शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या घरी या विषयावर सजीव चित्ररथ तयार केले होते. या सजीव चित्ररथांना पाहण्यासाठी नागरीकांनी जागो जागी गर्दी करुन चौका चौकात त्यांचे स्वागत केले.
            या शालेय मुलांच्या प्रभात फेरी व चित्ररथ रॅलीच्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, शाहू स्मारक भवनचे कृष्णाजी हारुगडे, वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डींगचे गणी आजरेकर, कादर मलबारी यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी- विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

00 0 0 0 0

बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

महसूल कार्यालयांचा कार्पोरेट लूक होणार विभागातील नगरपालिकांमध्ये झिरो पेंडन्सी उपक्रम राबविणार - महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी झिरो पेंडन्सीमधील उत्कृष्‍ट कार्याबद्दल कोल्हापूरचे कौतुक




            
कोल्हापूर, दि. 20 :  झिरो पेंडन्सीच्या यशस्वी वाटचाली पाठोपाठ आता पुणे महसूल विभागातील सर्व महसूल कार्यालयांना कार्पोरेट लूक देण्याबरोबरच विभागातील 60 नगरपालिकांमध्ये  झिरो पेंडन्सी उपक्रम सुरु करण्याचा मानस पुणे विभागाचे महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केला.
            कोल्हापूर जिल्हा महसूल प्रशासनाने राबविलेल्या झिरो पेंडन्सी उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी,अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
            झिरो पेंडन्सी पाठोपाठ आता महसूल कार्यालयांना कार्पोरेट लूक देण्याचा प्रयत्न असून सर्व अधिकाऱ्यांनी येत्या मार्च अखेर सर्व कार्यालये कार्पोरेट बनविण्याच्या दृष्टीने नियोजन करुन कार्यवाही हाती घ्यावी अशी सूचनाही महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केली. यामध्ये कार्यालयांतर्गंत पुर्नबांधणी, उत्तम फर्निचर, अभ्यागतांसाठी बैठक व्यवस्था या सर्व प्रक्रियेतून सामान्य माणसाचे काम सुसह्य कसे होईल यावर अधिक लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
            पुणे विभागातील सर्व महसूल कार्यालयांमध्ये 1 जूनपासून हाती घेतलेल्या झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून कोल्हापूर जिल्ह्याने 86.41 टक्के झिरो पेंडन्सी केल्याबद्दल जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आणि कोल्हापूर महसूल प्रशासनाचे कौतुक करुन महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याने जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालयतील सर्व दप्तरे सहा गठ्ठा पध्दतीने लावली आहेत.  सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त रोज दोन तास जादा वेळ देऊन झिरो पेंडन्सी उपक्रम यशस्वी करुन दाखविल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.
            यापुढील काळात झिरो पेंडन्सीमुळे सामान्य माणसाला दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त करुन चंद्रकांत दळवी म्हणाले, झिरो पेंडन्सीचे उत्तम काम झाल्याने जनमाणसाचा प्रशासनाबाबतचा दृष्टीकोन निश्चितपणे बदलेल, यापुढील काळात लोकांची कामे तात्काळ निर्गती लागतील. झिरो पेंडन्सी कामांतर्गत मंडल निहाय आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणांची तात्काळ निर्गती करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिली.
            पुणे विभागातील 60 नगरपालिकांमध्ये झिरो पेंडन्सी उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असून यासाठी विभागातील नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांची कार्यशाळा येत्या 23 सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. या उपक्रमांतर्गंत नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
            जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी कोल्हापूर जिल्ह्याने हाती घेतलेल्या झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल अभियानाची सविस्तर माहिती दिली, ते म्हणाले या अभियानांतर्गंत कोल्हापूर जिल्ह्यात 13 लाख 29 हजार 297 अभिलेखे अद्ययावत करण्यात आले. तर 5 लाख 45 हजार 647 इतक्या फाइल्स अभिलेख कक्षाकडे पाठविण्यात आल्या तर 7 लाख 83 हजार 650 फाइल्स अद्ययावत करण्यात आल्या आहेत.  30 वर्षाच्यावरील 8 लाख 24 हजार 458 फाइल्स नष्ट करण्यात आल्या आहेत. नष्ट केलेल्या कागदपत्राचे वजन 31 टन 3664 किलो भरले. ही कागदपत्रे नष्ट करण्यात आली आहे. तसेच शुन्य प्रलंबितता आणि दैनंदिन निर्गत प्रकरणांच्या दिनांक 31 मे 2017 रोजी प्रलंबित असणाऱ्या संख्या 45509 निश्चित करण्यात आलेली होती. त्यापैकी दिनांक 16 सप्टेंबर 2017 अखेर 41200 प्रकरणे निर्गत करण्यात आलेल्याचेही  जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले.
            याबैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी अशोक पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) अरविंद लाटकर, भुसंपादन अधिकारी श्री. हादगळ, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई, विधी अधिकारी वैभव इनामदार यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेच्या विशेष निधीमधील कामांना मान्यता
            कोल्हापूर महानगरपालिकेस राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या विशेष निधीतील कामांना यावेळी मान्यता देण्यात आली. यमाध्ये सागरमाळ येथील क्रिकेट मैदानातील सुविधांसाठीच्या प्रस्तावावर यावेळी सविस्तर चर्चा करुन मान्यता देण्यात आली. केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या करण्यात आलेल्या सुशोभिकरणाच्या कामाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई यांच्यासह सर्वसंबंधित अधिकारी उपस्थित होते.

0  0 0 0 0  0