सोमवार, ७ मार्च, २०२२

संतती नियमनाबाबत आरोग्य अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा संपन्न

 



 

कोल्हापूर, दि. 7 (जिमाका): आधुनिक संतती नियमनाच्या पध्दती आणि त्याचे तांत्रिक पैलु, लाभार्थी केंद्रीत संप्रेषण, लैंगिक आणि प्रजनन आरोग्य या दोहोंचा समाज आणि सेवा प्रदाता यांच्याशी सहसंबंध या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा नुकतीच हॉटेल सयाजी येथे पार पडली. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि पाथफायंडर इंटरनॅशनल दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व  जिल्हास्तरीय अधिकारी यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेस आरोग्य व बांधकाम समिती सभापती वंदना जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्स्क डॉ.व्ही.पी.देशमुख, पाथफायंडर इंटरनॅशनलच्या मुख्य तांत्रिक सल्लागार स्त्रीरोग तज्ञ डॉ.अनुपमा राव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. यु.जी. कुंभार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.एफ.ए.देसाई, सहा.जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ.यु.एम.मदने  हे उपस्थित होते.

 

श्री. चव्हाण म्हणाले, मागील दोन्ही कोविड लाटेत कुटुंब नियोजन कार्यक्रम गतीने राबविता आला नाही. मात्र आता कोवीड प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे  हा कार्यक्रम राबविण्यास सर्वांनी गती घ्यावी. सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड काळात चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा दिली, त्याबददल सर्वांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. प्रसुतीच्या 92 टक्के प्रसुती नैसर्गिक होणे व केवळ 8 टक्के प्रसुती सीझेरिअन पध्दतीने होणे आपे‍क्षित आहे. त्यामुळे सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी जास्तीत-जास्त प्रसुती होण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विशेष नियोजन करावे. 

 

देशात दरडोई उत्पन्नात कोल्हापूर हा दुस़-या क्रमांकावर असूनही  जिल्ह्यात बालक-बालिका लिंग प्रमाणात पिछाडीवर असल्याने त्याही विषयावर आपण सर्वांनी काम करणे आवश्यक आहे. पाथफायंडर संस्थेमार्फत जिल्ह्यामध्ये आधुनिक संतती प्रतिबंधाच्या तात्पुरत्या पध्दतीसाठी जनजागृती होत आहे. या पध्दतीचा वापर तसेच कुटुंब नियोजन नसबंदी शस्त्रक्रिया व पुरुष नसबंदी इत्यादी बाबत सर्वांनी सहकार्य करावे, असे मतही श्री.चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.

 

आरोग्य व बांधकाम सभापती श्रीमती जाधव म्हणाल्या, मुलीची शारिरीक व मानसिक वाढ पूर्ण होण्यासाठी मुलीचा विवाह 21 वर्षानंतर होणे आवश्यक आहे.

 

           डॉ.साळे म्हणाले, लोकसंख्या नियंत्रणासाठी तसेच जन्मदर कमी करण्यासाठी आधुनिक साधनांचा वापर करुन कुंटूंब मार्यादित ठेवावे. डॉ.अनुपमा राव यांनी उपस्थित वैद्यकीय अधिका-यांना अधुनिक संतती नियमनाच्या पध्दती आणि त्याचे तांत्रिक पैलु यांवर मार्गदर्शन केले.  पाथफायंडर राज्य समन्वयक  डॉ. बलराम जाधव यांनी आभार मानले.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.