इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५


एमआरईजीएस मधून विहिरी पाणंद रस्त्यांची कामे घ्या
- खासदार राजू शेट्टी  
जिल्हा दक्षता संनियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर, दि. 21 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सर्व कार्यान्वित यंत्रणांनी विहिरी तसेच पाणंद रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यावी,अशी सूचना खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे बोलतांना केली.
 केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांची अंमलबजावणी, प्रगती आणि संनियंत्रण यांचा आढावा घेण्यासाठी सर्किट हाऊस येथील शाहू सभागृहात समितीचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस समितीचे सहअध्यक्ष खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, जिल्हाधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे नूतन प्रकल्प संचालक डॉ. हरीष जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
 जिल्ह्यास यंदा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत 500 विहिरी घेण्याचे उद्दिष्ट असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी या कामी सक्रीय व्हावे, असे आवाहन करुन खासदार राजू शेट्टी म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत अधिकाधिक कामे घेण्याचे नियोजन सर्व विभागांनी करावे. प्रामुख्याने पाणंद रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावीत. सध्या पाणंद रस्त्यांसाठी 20 फुटाची असलेले बंधन 15 फुटावर आणावे, यासाठी या बैठकीत ठरावही मंजूर करण्यात आला. जिल्ह्यात सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत 19 गावामध्ये 25 कामे सुरु असून याकामांवर 772 मजूर काम करीत आहेत. या योजनेंतर्गत सेल्फवर मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करुन ठेवण्यात आली असून मंजूरांची मागणी येताच ही कामे तात्काळ सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.
 स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण जिल्हा येत्या मार्च अखेर हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान गतिमान करण्याची सूचना खासदार राजू शेट्टी यांनी केली. जिल्ह्यात 171 गावे हागणदारीमुक्त झाली असून गगनबावडा तालुका हागणदारीमुक्त तालुका म्हणून जाहिर झाला आहे. जिल्ह्यात पाच तालुके डिसेंबरअखेर हागणदारीमुक्त करण्याचे प्रयत्न असून येत्या मार्च अखेर संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा मानसही या बैठकीत व्यक्त करण्यात आला. सांसद आदर्श योजनेतील सोनवडे खुर्द, पेरीड आणि रोजगोळी खुर्द या तीन गावांचा सर्वांगिण विकास करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी आपापल्याकडील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच या तीन गावामध्ये शौचालय नसलेल्या 386 कुटुबांना शासन योजना, लोकसहभाग आदी उपक्रमातून शौचालय उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी या बैठकीत केली.
 पाणलोट विकासाचा कार्यक्रम अधिक दर्जेदारपणे राबविला जावा, या कामांमध्ये हलगर्जीपणा आणि गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देऊन खासदार राजू शेट्टी म्हणाले, पाणलोट विकासाच्या कार्यक्रमातून शेती विकासाला प्राधान्य मिळत असून या कामास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. जिल्ह्यात 47 पाणलोट असून यामध्ये 11 तालुक्यांचा समावेश आहे. यासाठी 524 गावांमध्ये पाणलोटाची कामे सुरु असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
 तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या बैठकांना सर्व कागदपत्रे आणि माहितीसह उपस्थित राहावे, अन्यथा संबंधितावर कारवाई केली जाईल, अशी सूचनाही खासदार राजू शेट्टी यांनी या बैठकीत केली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कायपालट योजनेतून आमुलाग्र बदल करण्यात आला असून लोकसहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उप केंद्रांना 192 लाखाचा निधी उपलब्ध झाला असून या निधीतून जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उप केंद्रांची अंर्तबाह्य सुधारणा करण्यात आली असून पुरेसा औषधसाठा, स्वच्छता आणि अन्य सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामीण जनतेची सोय झाली असल्याचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदान यांनी सांगितले.
या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनाचा कार्यक्रम, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, निर्मल भारत अभियान, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजना, इंदिरा आवास योजना, डाक विभागाकडील योजना, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, सांसद आदर्शग्राम योजनेसह अन्य केंद्र शासन पुरस्कृत योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्ह्यातील पंचायत समितीचे सभापती, समितीचे अशासकीय सदस्य तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी अध्यक्षांचे स्वागत केले. प्रारंभी शहीद कर्नल संतोष महाडिक यांना दोन मिनिटे स्तभ्दता पाळून आदरांजली वाहण्यात आली.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.