कोल्हापूर,
दि. 5 (जिमाका): संभाव्य पूर परिस्थितीबाबत पशुसंवर्धन विभाग दक्ष असला तरी पशुपालकांनी
आपल्या जनावरांचे योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची दक्षता घ्यावी
तसेच चारा व पशुखाद्याची योग्य ठिकाणी साठवणूक करावी. यावर्षी संभाव्य पुरामुळे
बाधित होणाऱ्या गावातील पशुपालकांची जनावरे स्थलांतराअभावी पुरात वाहून गेल्यास व
पशुपालकांचा हलगर्जीपणा सिध्द झाल्यास अशा पशुपालकाविरुध्द केंद्र शासनाच्या
प्राणी क्लेष प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश संबंधित
ग्रामपंचायतींना देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय.
ए. पठाण यांनी दिली.
स्थलांतरित, छावणीतील जनावरांकरिता ग्राम स्तरावर चारा वाटप
समितीचे गठण करण्यात आले आहे. याबरोबरच अतिरिक्त मनुष्यबळाबाबत नियोजन असून महिला
अधिकारी, कर्मचारी यांच्या दिमतीस अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. यावर्षी
संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी पूर बाधित होऊ शकणाऱ्या कुक्कुट शेड
धारकांनी शेडमधील सर्व कुक्कुट पक्षी विक्री करावी किंवा कुक्कुट शेड रिकाम्या
ठेवाव्यात. यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार
कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यात कार्यरत विविध सेवाभावी संस्था, गोशाळा,
पांजरपोळ, सहकारी दूध संस्था यांनी छावणी उभारणी संदर्भात अटी व शर्तींचा मसुदा
संबंधित तहसिल कार्यालयातून उपलब्ध करुन घ्यावा, असेही श्री. पठाण यांनी
पत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.