◆ तृतीयपंथीयांना शासन आणि प्रशासनाच्या प्रत्येक विभागाचे सहकार्य मिळेल
◆ कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन
कोल्हापूर,
दि. 23 (जिमाका): तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन आणि
जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तृतीयपंथी व्यक्तींनी
शासकीय योजनांच्या लाभासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा, असे आवाहन करुन यासाठी तृतीयपंथीयांना
प्रत्येक विभाग निश्चित सहकार्य करेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी
दिले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाच्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण
कार्यालयाच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता
पर्व अंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवन येथे 'तृतीयपंथी सर्वसमावेशक एक दिवसीय कार्यशाळा' घेण्यात
आली, यावेळी जिल्हाधिकारी श्री. रेखावार बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक
तिरुपती काकडे, सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम
कुमार पाटील, तृतीयपंथीयाच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय सदस्य
श्रीगौरी सावंत व मयुरीताई आळवेकर, तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाच्या
राज्य व जिल्हा सदस्य ॲड. दिलशाद मुजावर, जिल्हा प्रतिनिधी अमृता सुतार तसेच तृतीयपंथी
मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कंत्राटी पध्दतीने नोकरी देण्यात येणाऱ्या तृतीयपंथी
गौरी पोवार यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, तृतीयपंथीयांची वैयक्तिक, शैक्षणिक,
आर्थिक माहिती घेवून त्यांना त्यांच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार कौशल्य शिक्षण देण्यात
आले असून यापुढेही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे, जेणेकरुन त्यांना
रोजगार उपलब्ध करुन देता येईल. जिल्ह्यातील दोन तृतीयपंथीयांना कंत्राटी तत्वावर नोकरी
देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, तृतीयपंथी व्यक्तींची स्वतंत्र
ओळख कायद्याने मान्य झाली असून निवडणूक व अन्य प्रक्रियेमध्ये त्यांना स्वतंत्र स्थान
देण्यात येत आहे. तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा
प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यासाठी आवश्यक ती
कागदपत्रे सादर करावीत, असे सांगून समाजात सन्मानाने जगायचे असेल तर आत्मविश्वास बाळगा.
स्वत:मध्ये बदल करा. कष्ट करुन आत्मसन्मानाने व स्वाभिमानाने जगा, यासाठी प्रशासन निश्चितच
सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.
तृतीयपंथीयाच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय सदस्य
श्रीगौरी सावंत म्हणाल्या, तृतीयपंथीयांच्या काही महत्वाच्या गरजा आहेत, त्या पूर्ण
होण्यासाठी ते आक्रोशातून भावना व्यक्त करताना दिसतात. जीवन जगताना ‘पैसा’ ही प्रत्येकाची
गरज आहे. आर्थिकदृष्ट्या तृतीयपंथीयांनी सक्षम होण्यासाठी अधिकाधिक योजनांची निर्मिती
व्हायला हवी. तृतीयपंथीयांना समाजासोबत समाजातच रहायचं आहे, पण समाजाने त्यांना सन्मानाची
वागणूक द्यावी. त्यांना ओळखपत्र देण्याबरोबरच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून द्यावा.
तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण मंडळाच्या राज्य व जिल्हा
सदस्य ॲड. दिलशाद मुजावर म्हणाल्या, समाजाच्या प्रगतीसाठी तृतीयपंथीयांना समाजाच्या
मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. तृतीयपंथीय समाजाच्या बदलाची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यात
होत आहे, ही चांगली बाब आहे.
तिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे म्हणाले, तृतीयपंथीयांनी रोजगाराचे
परंपरागत साधन बदलून कौशल्य प्रशिक्षण घेवून व्यवसाय करावेत. शासकीय योजनांची माहिती
घेवून त्याचा लाभ घ्यावा, जेणेकरुन आर्थिक स्थैर्य प्राप्त होवून त्यांचे समाजातील
जीवनमान उंचावेल. यासाठी प्रशासन नेहमीच सोबत राहिल.
सहायक आयुक्त विशाल लोंढे प्रास्ताविकात म्हणाले, तृतीयपंथीयांना समाजाच्या
मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येत
आहेत. यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या वतीने सर्वसमावेशक सर्वेक्षण अर्ज
तयार करण्यात आला असून त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. यावेळी
तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजनांबाबत मान्यवरांनी विचार
व्यक्त केले.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.