सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत जिल्ह्यात 5 लाखावर कुटुंबांची बँक खाती -अग्रणी बँक अधिकारी एम. जी. कुलकर्णी


     कोल्हापूर दि.19:  प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 5 लाख 13 हजार 854 कुटुंबांची बँक खाती काढण्यात आली असून, 3 लाख 62 हजार 316 खातेदारांना रुपे कार्ड देण्यात आले असल्याची माहिती बँक ऑफ इंडीया या अग्रणी बँकेचे अग्रणी बँक अधिकारी एम.जी. कुलकर्णी यांनी आज येथे बोलतांना दिली.
      जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांचे बँक खाते काढण्याची प्रक्रिया प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत प्राधान्यक्रमाने राबविण्यात येत असल्याचे सांगून अग्रणी बँक अधिकारी एम.जी. कुलकर्णी म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाचे बचत खाते असावे, यासाठी 15 ऑगस्ट 2014 पासून जिल्ह्यात विशेष मोहिम  बँकांच्या सहकार्याने राबविण्यात आलीे असून, जिल्ह्यात बँक खाती काढलेल्या 5 लाख 13 हजार 854 कुटुंबांपैकी 3 लाख 52 हजार 579  ग्रामीण भागातील कुटुंबे असून 1 लाख 51 हजार 275 शहरी भागातील कुटुंबांचा समावेश आहे. 
     प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत शुन्य बॅलन्सवर बँक खाते काढले जात असून 1 लाखाच्या अपघाती विम्याचे या योजनेत संरक्षण दिले असून त्याचा कसलाही प्रिमियम खातेदारास भरावा लागणार नसल्याचे सांगून अग्रणी बँक अधिकारी एम.जी. कुलकर्णी म्हणाले, खातेदारास बँक पुस्तकाबरोबरच रूपे डेबीट कार्डही खातेदारास दिले जात असून आतापर्यंत 3 लाख 62 हजार 316 खातेदारांना रुपे कार्ड देण्यात आले आहे.  मात्र हे कार्ड 45 दिवसातून विमा संरक्षण मिळण्याकरिता एकदा आर्थिक अथवा गैरआर्थिक कामासाठी वापरणे गरजेचे आहे. तसेच व्यवस्थीत खाते व्यवहार करणाऱ्या खातेदारांना कमीत कमी 1 हजार ते जास्तीतजास्त 5 हजारापर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट कर्ज सुविधेचा अंतर्भाव आहे. सदर उघडलेली बँकखाती ही शासनाच्या विविध अनुदान योजनासही सहाय्यभूत होणार असल्याचेही त्यंानी सांगितले.
 प्रधानमंत्री जन धन योजना ही सर्वसामान्य माणसासाठी अतिशय उपयुक्त योजना असल्याचे सांगून अग्रणी बँक अधिकारी एम.जी. कुलकर्णी म्हणाले, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला बँक खात्यांनी जोडण्याचा संकल्प असून हे बँक खाते नागरिकाच्या घरी जावून बँक प्रतिनिधीमार्फत तसेच विविध ठिकाणी शिबिरे घेऊनही बँक खाती उघडली जात आहेत. या योजनेमुळे सर्वसामान्य लोकांना बँक खाते तर मिळतच आहे, शिवाय त्यांना सन्मान देऊन त्यंाना बँकींग क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.