मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

बँक ऑफ इंडियाकडून मृत खातेदार तलाठ्याच्या वारसांना 30 लाखांची मदत




       कोल्हापूर, दि. 11 (जि.मा.का.) :  जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑप इंडियाकडून  मृत खातेदार तलाठी  जयंत चंदनशिवे यांच्या वारसांना आज 30 लाख रुपयांची मदत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे, अग्रणी जिल्हा प्रबंधक राहूल माने उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत तलाठी पदावर कार्यरत असणारे दिवंगत जयंत चंदनशिवे यांचे वेतन खाते बँक ऑफ इंडियाच्या बीओआई सॅलरी प्लस या योजने अंतर्गत गगन बावडा शाखेत होते. कर्तव्य बजावत असताना दुचाकी अपघातामधे  त्यांचा मृत्यू झाला. बँकेच्या बीओआई सॅलरी प्लस योजनेमधे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तीस लाख रुपयांच्या अपघाती मृत्यू विम्याची सुविधा अंतर्भूत आहे. खातेदारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क यासाठी आकारले जात नाही. या सुविधेमुळे बँकेने त्यांच्या वारसदारांना तीस लाख रुपयांचा विम्याचा लाभ प्रदान केला. त्याचबरोबर बँकेने परिवाराला प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजने अंतर्गत दोन लाख रुपयांचा अपघाती मृत्यू विमा व रुपे कार्ड अंतर्गत एक लाखाचा विमा देखील प्रदान केला आहे.
            यावेळी बॅंकेचे विभागीय व्यवस्थापक श्री. देशपांडे म्हणाले, घरातील अर्थार्जन करणा-या व्यक्तिच्या मृत्यूमुळे होणा-या आर्थिक, मानसिक व भावनिकनुकसानाची  कोणत्याही प्रकारे भरपाई करता येत नाही. परंतु या विमा रकमेमुळे संबंधित परिवाराला काही प्रमाणात नक्कीच मदत मिळेल.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.