यापुढे
पंचायत समित्यांनाही
जादा
अधिकार देण्याचा मानस
-ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
ग्रामीण भागाच्या
विकासाचा चेहरा म्हणजे ग्राम विकास-पालकमंत्री
कोल्हापूर,
दि. 22 (जिमाका) : राज्यातील पंचायत
समित्या अधिक सक्षम करण्यासाठी यापुढे पंचायत समित्यांनाही जादा अधिकार देण्याचा
मानस ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे बोलताना व्यक्त केला.
जिल्हा परिषद अधिकारी
व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या
हस्ते आणि पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस परेड आज
झाले, त्यावेळी ते बोलत होते. समारंभास खासदास धैर्यशिल माने, जिल्हा परिषद
अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपाध्यक्ष सतीश पाटील आदीजण उपस्थित
होते.
पंचायत राज व्यवस्था अधिक मजबूत आणि
सक्षम करण्याच्या दृष्टीने ग्राम विकास विभागाचे काम सुरु असल्याचे सांगून
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पंचायत राज व्यवस्थेने जिल्हा परिषद,
पंचायत समिती आणि ग्राम पंचायत स्तरावर अधिकाराचे विकेंद्रीकरण झाले असून या
व्यवस्थेमुळे ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची संधी गाव पातळीपर्यंत मिळाली आहे.
15 व्या वित्त आयोगात पंचायत समित्यांनाही अधिकचा निधी देवून त्यांना काही अधिकार
देण्याचा शासनाचा मानस असल्याचेही ते म्हणाले.
कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यातील एक
आदर्श व अग्रेसर जिल्हा परिषद बनविण्याचा आपला मानस असल्याचे सांगून ग्रामविकास
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावा गावात विकास कामे
करुन गावे विकासाद्वारे अधिक समृध्द आणि स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी
जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही योगदान गरजेचे आहे. अधिकारी,
कर्मचाऱ्यांनी आपण जनतेचे सेवक आहोत ही भुमिका जोपासून जिल्हा परिषदेचे कामकाज
अधिक पारदर्शी आणि लोकाभिमुख करावे. विकास कामामध्ये कसलीही हयगय खपवून घेतली
जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तीन दिवसाच्या या क्रीडा स्पर्धामध्ये
खेळाडूंनी खिलाडू वृत्ती जोपासून आपले नैपुन्य विकसित आणि वृंध्दीगत करावे, असे
आवाहनही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
ग्रामीण भागाच्या
विकासाचा चेहरा म्हणजे ग्राम विकास-पालकमंत्री
ग्रामीण भागाच्या सर्वांगिण
विकासामध्ये ग्राम विकास यंत्रणनेचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे स्पष्ट करुन
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासाचा चेहरा म्हणून आज ग्राम
विकास यंत्रणेकडे पाहिले जात आहे. ही यंत्रणा अधिक गतीमान आणि सक्षम करुन ग्रामीण
भागाचा विशेषत: गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी सर्वानीच कटिबध्द होवू या. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम
करण्यावर राज्य शासनाचा अधिक भर असून गावांना मोठा निधी आणि अधिकार प्राप्त झाले
आहेत. या निधीचा योग्य पध्दतीने विनियोग करण्याच्या दृष्टीने पंचायत समितीस्तरवरही
कुशल, तांत्रिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची यंत्रणा निर्माण करणे गरजेचे असल्याचे ते
म्हणाले.
जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित
केलेल्या क्रीडा स्पर्धामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कला गुणांना निश्चितपणे वाव
मिळेल. या यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी जनतेची कामेही अधिक गतीमानतेने करावी,
असे आवाहनही पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केले.
प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन
मित्तल यांनी स्वागत करुन क्रीडा स्पर्धेची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष
बजरंग पाटील यांनी पाहुण्यांचा सत्कार करुन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सुरुवातीला
दिपप्रज्वलन, क्रीडा ध्वजारोहण आणि क्रीडा
ज्योत प्रज्वलनाने मंत्री महोदयांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ करण्यात
आला. यावेळी मेन राजाराम हायस्कुलचे सहायक प्रा. बाबासाहेब माळवे यांनी खेळाडूंना
क्रीडा शपथ दिली. खेळाडूंच्या संचलनाने क्रीडा स्पर्धेची शान वाढवली. शेवटी उप
मुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी आभार मानले. समारंभास विषय
समित्यांचे तसेच पंचायत समित्यांचे
सन्माननीय सभापती, खाते प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, सदस्या आणि अधिकारी, कर्मचारी
आणि क्रीडा प्रेमी नागरिक उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल,
कबड्डी, खो-खो, धावणे, बॅडमिंटन, कॅरम, थाळी फेक, गोळा फेक अशा सांघिक व वैयक्तिक
खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धामध्ये एकूण 2540 अधिकारी, कर्मचारी
सहभागी झाले आहेत.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.