गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

बँक ग्राहक सेवा केंद्रे व पोस्टामार्फत आतापर्यंत 17 कोटींचे वितरण - अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहुल माने



बँक खात्यातून कोणताही लाभ परत जाणार नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नये
कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) :  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये जिल्हयातील जनतेची आर्थिक कोंडी होऊ नये यासाठी जिल्हयातील 405 बँक ग्राहक सेवा केंद्रे तसेच 674 ग्रामीण डाक सेवकांच्यामाध्यमातून आतापर्यंत 1 लाख 22 हजार ग्राहकांना 17 कोटींचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहुल माने यांनी दिली. 
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यांत जमा होणारी रक्कम कोणत्याही प्रकारे परत जाणार नसल्याचे स्पष्ट करुन श्री. राहुल माने म्हणाले की, बँक खात्यात जमा होणारी रक्कम आपल्या खात्यात सुरक्षित असल्याने ग्राहकांनी बँकेत गर्दी करु नये,  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत ज्या महिलांची प्रधनमंत्री जनधन योजनेंतर्गत बँकामध्ये बचत खाती आहेत, अशा खात्यांमध्ये एप्रिल, मे आणि जून 2020 या तीन महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला 500 रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत, त्यापैकी एप्रिल 2020 च्या रक्कमा महिलांच्या बचत खात्यामध्ये जमा झाल्या आहेत.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यांत जमा होणारी रक्कम तसेच शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जमा होणारी रक्कम, गॅसचे अनुदान, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत रक्कम तसेच विविध पेन्शनर्स यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम संबंधित ग्राहकांना बॅकांच्या ग्राहक सेवा केंद्रातून काढता यावी यासाठी जिल्हयात उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्हयातील 405 बँक ग्राहक सेवा केंद्रामधून 1 लाख 20 हजार ग्राहकांना 15 कोटीची रक्कम वितरीत करण्यात आली आहे.  जिल्हयातील 674 ग्रामीण डाक सेवकांच्यामाध्यमातून आतापर्यंत जवळपास 2 हजार ग्राहकांना 2 कोटींचे वितरण करण्यात आले आहे.
`           प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत तसेच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आलेले पैसे  ग्राहकांना-शेतकऱ्यांना आता पोस्टाच्या शाखेमधून किंवा ग्रामीण डाक सेवकाच्या माध्यमातून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून जी बचत खाती आधार क्रमांकाशी जोडलेली आहेत अशा खात्यावरील रक्कम  बायोमेट्रिक मशीनद्वारे पोस्ट ऑफिस किंवा ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता इतर सर्व बँकातील खातेधारक ज्यांच्या खात्यात आधार क्रमांक जोडलेला आहे, असे लाभार्थी पोस्ट ऑफिसमधून पैसे काढू शकतील, पोस्ट ऑफिसमधून या प्रकारचे पैसे काढण्याची मर्यादा प्रतिदिन दहा हजार रुपये (रु.10000/-) असणार आहे. 
जिल्हयात 535 पोस्टकार्यालये कार्यरत असून त्यापैकी 439 ग्रामीण भागामध्ये पोस्ट कार्यालये कार्यरत आहेत. या ग्रामीण पोस्ट कार्यालयामधुन 674 प्रशिक्षित ग्रामीण डाकसेवक आधार क्रमांक आधारित रक्कम अदा करण्यासाठी कार्यरत आहेत. आधार क्रमांकाशी जोडलेल्या कुठल्याही बँकेच्या बचत खात्यावरील व्यवहार या ग्रामीण डाक सेवकांकडून करता येणार आहेत. पोस्ट ऑफिसतर्फे या सुविधा सद्या उपलब्ध असलेल्या बँक शाखा, एटीएम, व्यवसाय समन्वयक ग्राहक सेवा केंद्र व्यतिरिक्त राहतील. आपले खात्यावर व्यवहार करण्यासाठी खातेदाराला त्याचे आधार कार्ड क्रमांक, बँक पासबूक व मोबाइल क्रमांक ग्रामीण डाक सेवकास  द्यावा लागेल. या व्यवस्थेमुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना व प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे साभार्थी खातेदार या सर्वांची मोठी सोय होणार आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ग्रामीण डाक सेवकांनी आधार क्रमांक आधारित रक्मकम अदा करण्याची सेवा सुरू केल्या आहेत. 
तरी सर्व बँकांचे लाभार्थी, महिला व शेतकरी खातेदार ग्राहकांनी त्यांच्या खात्यावरुन रक्कम काढण्यासाठी  बँक शाखा, एटीएम, बीसी ग्राहक सेवा केंद्र तसेच पोस्ट बँक या सुविधेचा विस्थापितरित्या लाभ घेऊ शकता. कोणत्याही प्रकारे बँक शाखांमध्ये होणारी गर्दी टाळावी. शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन  कालावधीमध्ये सामाजिक अंतर व स्वच्छतेच्याबाबतीत काळजी घेऊन कोरोना विषाणूपासून स्वत:चा बचाव करावा. अत्यावश्यक असलेस आपली रक्कम खात्यावरून काढण्यासाठी या सुविधांचा लाभ घ्यावा. आपली रक्कम बँक खात्यामध्ये सुरक्षित असून कोणताही लाभ परत जाणार नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही श्री. माने यांनी केले आहे.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.