गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

मास्क न वापरणाऱ्या रेशन दुकानदाराला दीड हजाराचा तर अन्य दोघांना प्रत्येकी 500 चा दंड महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांची कारवाई



       कोल्हापूर, दि. 16 (जि.मा.का) :-  मास्क न वापरणाऱ्या श्री राजारामपुरी ग्राहक सहकारी संस्था लि. संस्थेचे सरकार मान्य रास्तभाव धान्य दुकानदारास दीड हजार रुपयाचा तर अन्य दोघांना प्रत्येकी 500 रुपयाचा दंड महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज केला .
        महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी हे आयसोलेशन रुग्णालयाकडे भेटीसाठी जात असताना उद्यमनगर येथील श्री राजारामपुरी ग्राहक सहकारी संस्था लि. संस्थेचे सरकार मान्य रास्तभाव धान्य दुकानामध्ये दुकानदार रवींद्र आनंदराव पाटील हे विना मास्क त्यांना दिसून आले. या दुकानामध्ये अन्य दोघेही विना मास्क उभे होते.तात्काळ याची दखल घेत आयुक्तांनी प्रत्येकी 500  या प्रमाणे जागेवर दुकानदाराला दीड हजार रुपयाचा दंड करुन पावती दिली.
            आयसोलेशन रुग्णालयाकडून भेट देवून परतत असताना जवाहरनगरमधील सीटी मेडिकोमध्ये विना मास्क खरेदीसाठी आलेले विजय शंकर बुडके यांनाही आयुक्तांनी 500 रुपये दंड ठोठावला. मोहनदास व्हटकर हे घराबाहेर विना मास्‍क बसले होते त्यांनाही आयुक्तांनी 500 रुपये दंड ठोठावून पावती दिली.
            सर्वांनी सक्तीने मास्क वापरले पाहिजे, असे आवाहन करुन आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, भाजी विक्रेत्यांनी मास्कसह हाती मोजेही वापरले पाहिजेत. आज केवळ  500 रुपये दंडावर भागले आहे. उद्यापासून दंड तर करुच आणि पोलीस गुन्हेही दाखल करु असा इशाराही आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी दिला आहे.
0 0 0 0 0 0



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.