शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०

जिल्ह्यात मनेरगाची 694 कामे मंजूर; 135 कामे सुरु



कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) :  जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार  हमी योजना (मनरेगा) अंतर्गत 694 मंजुरी देण्यात आली असून 135 कामे सुरु आहेत. ज्या मजुरांना मनरेगा अंतर्गत काम करावयाचे आहे त्यांनी ग्रामस्तरावर प्रामसेवक, तालुकास्तरावर तहसिलदार किंवा गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन  रोहयो उपजिल्हाधिकारी श्रीमती स्मिता कुलकर्णी यांनी केले आहे.
लाकडाऊन कालावधीत ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कामे सुरू करणेस परवानगी दिली आहे.  लाकडाऊनमध्ये मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निकषानुसार सामाजिक अंतर पाळून सदरची कामे ग्रामपंचायत निहाय सुरू होणार आहेत.   यासाठी जिल्ह्यात सिंचन विहारीची  14, जनावरांचे गोठे 147, शौचालय बांधकाम  235, नाडेप कंपोस्टिंग  28, शौषखड्डा बांधकाम  233 आणि  रस्त्याची 47 कामे मंजूर करण्यात आल्याची माहिती श्रीमती कुलकर्णी यांनी दिली.
जिल्हा परिषद  व पंचायत समितीच्या बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायत विभागामार्फत प्रत्येक गावात ही कामे सूरू करण्यात येत असून मजुराना  प्रत्येक दिवयासाठी  रू. 238/- इतकी मजुरी दिली जाणार आहे. मनरेगाची कामे गावनिहाय सुरू करणेची तयारी पंचायत समितीने केली आहे. त्यानुसार गटविकास अधिकारी तसेच विविध शासकीय यंत्रणाच्या अधिकान्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. मंजूर केलेल्या कामापैकी अथवा नवीन कामे सूरू करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही  केल्या  आहेत.
मनरेगाच्या कामांवर काम करताना कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये  यासाठी सामाजिक अंतर ठेवणे,  मास्क पुरवठा करणे, कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर ठेवण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीकडे देण्यात आली  आहे. तसेच  ग्रामपंचायत पातळीवरील ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक तसेच कंत्राटी तांत्रिक सहायक यांनी  मजुर लाभार्थीशी संपर्क साधून त्यांचे अर्ज प्राप्त करुन घेण्याबाबत सूचना रोहयो उपजिल्हाधिकारी श्रीमती कुलकर्णी यांनी दिल्या आहेत.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.