◆पुरबाधित गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची केली पाहणी
◆ पूरबाधित शेतकरी व नागरिकांशी साधला संवाद
◆गारगोटी प्रशासकीय इमारतीमध्ये आढावा बैठक
कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : यंदाच्या पूर परिस्थितीचा
फटका जिल्ह्यातील अनेक गावांना व शहरातील काही भागाला बसला. यात नागरिकांचे मोठ्या
प्रमाणावर नुकसान झाले. भविष्यात पुरामुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी पूर
बाधित सर्व नागरिकांचे येत्या तीन वर्षात शासकीय जमिनीवर पुनर्वसन करण्यात येईल,
यावर्षी 30 टक्के, पुढील वर्षी 30 टक्के व त्यापुढील वर्षी उर्वरित सर्व
नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही कोल्हापूर
जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
भुदरगड
तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन यासंदर्भात गारगोटी
प्रशासकीय इमारतीमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीस
आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार के.पी.पाटील,
पंचायत समिती सभापती आक्काताई नलवडे, उपविभागीय अधिकारी संपत खिलारी,
तहसीलदार अश्विनी अडसूळ, गट विकास अधिकारी सरिता पवार, पदाधिकारी, अधिकारी,
पूरबाधित नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, पूरपरिस्थितीमध्ये प्रशासनाने बाधित
नागरिकांचे जलदगतीने स्थलांतर केल्यामुळे जीवितहानी टाळता आली. भुदरगड तालुका
कोरोनामुक्त होण्यासाठीही प्रशासनाने चांगले काम केल्याचे सांगून ते म्हणाले,
अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे आणि भूस्खलनामुळे नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी
उपाययोजना करणे गरजेचे आहे. ओढ्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. अतिवृष्टी व
पुरामुळे नुकसान झाल्याचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याबरोबरच कोणावर अन्याय
होणार नाही, याची खबरदारी घ्या. घरे, शेतीपिकांबरोबरच विहिरीच्या नुकसानीच्याही
नोंदी घ्याव्यात. बाधित लाभार्थ्यांचे पुनर्वसन करताना त्यांना प्रधानमंत्री आवास
योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने यादी
करा.
पूरबाधित गावातील नागरिकांचे गतीने
पूनर्वसन करण्यावर भर देणार असून यासाठी नागरिकांचेही सहकार्य गरजेचे आहे. पूर
बाधितांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाचे प्राधान्य आहे, असे सांगून
भूस्खलनाचा धोका असणाऱ्या नागरिकांची गायरान जमिनीवर तात्काळ तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करा, अशा
सूचना त्यांनी दिल्या.
आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले,
भुदरगड परिसरात दरवर्षी होणाऱ्या प्रचंड पावसामुळे दरडी कोसळणे, रस्ते खचणे,
घरांची पडझड होत आहे. नद्यांप्रमाणे ओढ्याची पुररेषा निश्चित करणे आवश्यक आहे.
डोंगराळ भागात राहणाऱ्या इथल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या भागातील भौगोलिक
परिस्थितीनुसार कायमस्वरुपी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.
भुदरगड, आजरा तालुक्यातील
बहुतांशी गावे डोंगराळ भागात आहेत. अतिवृष्टी, पुराबरोबरच भूस्खलनाचा धोका या
भागात अधिक आहे. यादृष्टीने उपाययोजना होणे गरजेचे आहे, असे उपविभागीय अधिकारी संपत खिलारी यांनी सांगितले.
यावर्षीच्या
पूरपरिस्थितीमध्ये भुदरगड तालुक्यातील 26 गावे बाधित झाली होती. येथील 408 कुटूंबाचे स्थलांतर करण्यात आले
होते, यातील 1 हजार 702 नागरिकांचे तर लहान मोठ्या 772 जनावरांचे सुरक्षित ठिकाणी
स्थलांतर करण्यात आले होते. बाधित 408 कुटुंबांना धान्यवाटप करण्यात आले.
पुरग्रस्तांची आरोग्य तपासणी करुन आवश्यक औषधपूरवठा करण्यात आला. कोरोना
परिस्थितीच्या अनुषंगाने पुरग्रस्त नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्या करुन घेण्याबरोबरच
प्राधान्याने लसीकरण करण्यात आले आहे. तालुक्यात कुर, कोणवडे, शेणगाव या गावांना
पुराचा अधिक फटका बसला असून तालुक्यातील पुरामुळे झालेल्या घर पडझडीचे व सानुग्रह
अनुदानाबाबतचे पंचनामे पूर्ण झाले असून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरु असल्याची
माहिती तहसीलदार अश्विनी अडसूळ-वरुटे यांनी यावेळी दिली.
पालकमंत्री
सतेज पाटील यांनी केली भुदरगड, आजरा तालुक्यातील पूरबाधित गावांची पाहणी
यंदाच्या पूर परिस्थितीमध्ये
भुदरगड, आजरा तालुक्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या तालुक्यांतील
नुकसानग्रस्त भागाची आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाहणी करुन पूरबाधित
नागरिकांशी संवाद साधला. या पाहणी दौऱ्यात भुदरगड तालुक्यातील कूर, कोणवडे, शेणगाव
या गावांना भेटी दिल्या. तर आजरा तालुक्यातील उत्तुर, साळगाव, गजरगाव या गावांना
भेटी देऊन पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी आमदार
राजेश पाटील, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार श्री. विकास अहिर, गट
विकास अधिकारी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पुरामुळे झालेल्या घरांची
पडझड, पोल्ट्रीचे नुकसान, ऊस, भात व अन्य पिकांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.
तसेच पुरबाधितांच्या अडचणींबाबतची निवेदने स्वीकारली.
भुदरगड व आजरा तालुक्यात पूर, अतिवृष्टी व भूस्खलनामुळे
झालेल्या नुकसानीची व प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या पंचनाम्याच्या
सद्यस्थितीची माहिती घेतली. बाधित शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या
व्यथा जाणून घेतल्या. पुरबाधितांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करुन दिली जाईल, असे
आश्वासन देवून प्रशासकीय यंत्रणेला सूचना केल्या.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.