कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्याकरिता
पीक कर्जाचे वार्षिक उद्दिष्ट्य 2 हजार 480 कोटीचे असून 31 ऑगस्ट 2020 अखेर 1 हजार
892 कोटी इतकी उद्दिष्टपूर्ती करून राज्यात कोल्हापूर प्रथम स्थानावर राहिला आहे.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँक,सर्व राष्ट्रियकृत
बँक, खासगी बँक आणि यंत्रणेचे अभिनंदन
केले. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा स्वत:हून दुप्पट उद्दिष्ट घेऊन यापुढे सर्वांनी
कामकाज करावे आणि जिल्ह्याचा मानांकन नेहमीच प्रथम स्थानी ठेवावा, अशी अपेक्षा
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केली.
जिल्हास्तरीय सल्लागार व
आढावा समितीची बैठक आज गुगलमिटच्या सहाय्याने घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी
अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी सर्वांशी संवाद
साधून आढावा घेतला. जिल्हाधिकारी म्हणाले, प्रलंबित असणाऱ्या कामकाजाबद्दल
सर्वांनी नियोजन करून तसा आराखडा पाठवावा. पुढच्या सहा महिन्यात यावर काम व्हायला
हवं. बीएलबीसीच्या बैठकीत आमदार, स्थानिक लोकप्रतिनीधी यांना निमंत्रीत करावे आणि
बँकांनी विविध योजनांच्या कर्ज वाटपाची यादी बैठकीत सादर करावी.
बँकेत येणाऱ्या
ग्राहकासाठी आपण सेवा देत आहोत. ही आस्था ठेवून ग्राहकांना चांगली वागणूक देवून
सुसंवाद ठेवावा. याविषयी क्षेत्रीय स्तरावर प्रबोधन करण्यात यावे. राष्ट्रिय
बँकांविषयी तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही जिल्हाधिकारी
श्री. देसाई यांनी केली.
आमदार प्रकाश आबिटकर
यांनीही सूचना मांडल्या. ते म्हणाले, बीएलबीसीमध्ये स्थानिक लोकप्रतिनीधींना
निमंत्रीत करावे. ग्राहकांना राष्ट्रिय बँकांनी सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी. शासनाच्या
विविध कर्ज योजनांचा लाभ गरजूंना देवून नवे उद्योजक तयार करावेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. मित्तल म्हणाले, सर्व बँकांनी तालुकानिहाय उद्दिष्टांची पूर्तता करून
अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा. याचा आढावा मुख्यालयाने आठवड्याला
घ्यावा. ज्या बँकांचा सीडी रेशो 60 टक्क्याच्या खाली आहे त्यांनी हा रेशो 60
टक्क्याचा वर जाण्यासाठी काय नियोजन केले आहे याबाबतचा खुलासा 15 दिवसात द्यावा.
अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहूल माने यांनी सुरूवातीला आढावा दिला. ते
म्हणाले, 30 जून 2020 पर्यंत पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत 10 लाख 78 हजार 33 खाती
उघडण्यात आली आहेत. 7 लाख 72 हजार 136 खात्यामध्ये रूपे कार्ड प्रदान करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री जीवनसुरक्षा विमा योजनेतंर्गत 4 लाख 74 हजार 700 खाती उघडण्यात आली
आहेत. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेतंर्गत 1 लाख 84 हजार 308 खाती उघडण्यात
आली आहेत. अटल विमा योजनेतंर्गत 58 हजार 347 खाती उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री
मुद्रा योजनेतंर्गत जून 2020 अखेर 7 हजार 842 लोकांना 113.129 कोटीचे अर्थसहाय्य
करण्यात आले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक मनोज मून, नाबार्डचे जिल्हा
विकास व्यवस्थापक नंदू नाईक यांच्यासह सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक, महामंडळाचे
जिल्हा व्यवस्थापक सहभागी झाले होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.