कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : कर्मवीर
दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत समाज कल्याण कार्यालयास जमिन
खरेदी करावयाची आहे. ज्या जमिन मालकास शासनाने निश्चित केलेल्या जमिनीच्या
दरानुसार किंवा जिरायत जमिन कमान 5 लाख प्रति एकर व बागायत जमिन कमाल 8 लाख रूपये
प्रति एकर प्रमाणे विक्री करण्यास तयार आहेत, अशा जमिन मालकांनी जमिनीच्या 7/12 व
आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याणचे
सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत अनुसूचित
जाती व नवबौध्द भूमीहिन शेतमजूर कुटूंबांना कसण्याकरिता 2 एकर बागायती किंवा 4 एकर
जिराईत जमिन 100 टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येते. जमिन कसण्यास अयोग्य,
डोंगर उताराची, खडकाळ व नदी पात्राजवळच्या क्षारयुक्त व क्षारपड जमिन असू नये.
जमिन सलग असावी.
या योजनेंतर्गत ज्या गावात
जमिन उपलब्ध होईल त्याच गावातील अनुसूचित जातीचे, दारिद्रय रेषेखालील, भूमीहिन,
त्याच गावचा रहिवाशी असलेले व 18 ते 60 वयातील त्याच गावातील पात्र लाभार्थ्यांची
निवड करण्यात येईल. त्या गावात लाभार्थी उपलब्ध नसल्यास लगतच्या इतर गावातील पात्र
लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. लगतच्या गावातही लाभार्थी उपलब्ध न झाल्यास
तालुकास्तरावरील पात्र लाभार्थ्यांचा विचार करण्यात येईल. यामध्ये अंतिमत: परिस्थितीनुसार
आवश्यक निर्णय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेईल, असेही श्री.
कामत यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.